Tuesday, April 6, 2010

अरुणोदय झाला: ३

वाट लागली
नोम चोम्स्की नावाचे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मूल प्रथम भाषा शिकते तेव्हा त्याच्याकडे अगदी थोडी माहीती असते, अगदी थोडे नियम माहीत असतात, व तेवढ्याच बळावर व बाहेरच्या विश्वाचे संपर्क न्याहाळत ते त्याच्या मनाने भरारी घेते व काही एक ठरवून ती भाषा शिकते. ही काही माहीती नसताना, धडाडीने निष्कर्ष काढणे, हा मुलाचा ( माणसाचा ) जात्याच स्वभाव असतो व पुढेही सर्व ज्ञान-विज्ञानातली प्रगती, नवीन शोध ते ह्याच स्वभाव-गुणाने करते.
कदाचित दिलेल्या प्रमाण भाषेतलाच एखादा शब्द घेऊन मग त्यातूनच वेगळा अर्थ काढण्याची खोड मग माणसाला लागली असली पाहिजे. शिवाय माणसे एखादा गट बनविला की पटकन लक्षात येईल असे कोड-नाव ठेवतात.ह्यात काही जुजबी कोड असतात व्यंगांवरून . जसे : लंगडा, डुचका, मोटू, लंबू वगैरे. अशाच खोडी मुळे मूळ अर्थ वेगळाच असलेला शब्द मग लोक वेगळ्याच अर्थाने वापरू लागतात, रूढ करतात. जसे : वाट लागणे. सुरुवातीला "दिंडी वाटेला लागली", "तो मग चांगल्या वाटेला लागला", "तो मुंबईच्या दिशेने वाटेला लागला", असल्या वाक्य़ांवरून "इच्छित स्थळी जाण्यासाठी वाट धरणे "असा चांगला अर्थ असणार. त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थाने मग काही लोक म्हणू लागले असतील की "मला त्या रस्त्याने जाताना खूपच अडचणी आल्या, अगदी नकोसे झाले.", ह्यालाच मग हे लोक म्हणू लागले : वाट लागली.

--अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२
अरुणोदय झाला ! : २

डावे, उजवे

शिल्पकार जेव्हा एखाद्या दगडाकडे पाहतो तेव्हा त्याला दगड दिसत नाही, तर त्यात कोरायचे कल्पिलेले शिल्प त्याला दिसते. मग तो त्याच्या कुसरी प्रमाणे त्या दगडातून नको असलेला भाग छिन्नीने काढून टाकतो. उरते त्याला आपण शिल्प म्हणतो.
हे नको असलेला "दगड" काढून टाकणे आपण भाषेच्या वापरातही करत असतो. हे आपण आपल्या मनानेच करत असतो. त्यामुळे व्याकरण एक सांगते व आपण वापर करतो भलताच. एखाद्या शब्दाचा अर्थ असतो एक व आपण त्याला फिरवून करतो भलताच. कधी कधी तर शब्दाचा जो प्रमाण अर्थ आहे त्याला बदलून आपण त्याच्याविरुद्ध अर्थाचा शब्द रूढ करतो. कै.प्रा.भगवंत देशमुखांना हे खूप खटके. मला ते एकदा म्हणाले, अहो, "अपरोक्ष " म्हणजे (रूढ अर्थ जरी असला "माझ्या माघारी, माझ्या डोळ्याआड") तरी प्रमाण भाषेत व कोशात तो आहे "डोळ्या देखत, समक्ष". म्हणजे अगदी विरुद्ध. आणि "परोक्ष" चा अर्थ कोशात आहे : "डोळ्याआड". हे आपण अगदी एखाद्या खटयाळ मुलासारखे उलट करीत, वापरीत असतो. बंडखोर मुलाला आपण बैस म्हटले तर तो मुद्दाम उभा राहतो. त्याच प्रमाणे ही बंडखोरी आपण करतो. कोणी तरी एक सुरू करतो आणि मग सगळेच त्याचे बघून तसे करू लागतात. शिवाय आपण त्याचे समर्थनही करतो की सर्व-संमतीने हा अर्थ असेल तर आपण बदलूयात ना अर्थ !
ही बंडखोरी फक्त आपण मराठीच करतो असे नाही. अमेरिकेत घराबाहेर गाडी "पार्क" करण्याची जी जागा असते, त्याला ते लोक म्हणतात "ड्राईव्ह-वे" आणि गाडी चालवण्याच्या रस्त्याला म्हणतात "पार्क-वे".
बर्‍याच वेळा काही गोष्टी आपल्याला मुळातूनच समजलेल्या नसतात. जसे दिशा . परवा वास्तुशांतीला आलेल्या भटजीने आम्हालाच विचारले की पूर्व कुठल्या बाजूला आहे ? आता आमची पूर्व व भटजींची पूर्व अशा काही दोन वेगळ्या दिशा असतात का ? सगळ्यांनाच लहानपणी शिकविलेले असते की सूर्याकडे तोंड करून उभे राहिले असता चेहर्‍यासमोरची पूर्व, मागची पश्चिम, उजव्या हाताला दक्षिण व डाव्या हाताल उत्तर ( आता हे मी कसे लक्षात ठेवले ते सांगतो.डाउ व ऊद, म्हणजे सूर्याकडे तोंड तर उजव्या हाताला दक्षिण व डाव्याला उत्तर.शिवाय मास्तर चुकीचा हात दाखवला तर त्यावर छडी मारत म्हणून धाकाने ऊद लक्षात ठेवायचे नाही तर खा छडी.). आता मुख्य चार दिशांची ही गत तर ईशान्य़, आग्नेय, नैऋत्य, वायव्य ह्यांची बातच नको. दशदिशा आम्हाला कळल्याच नाहीत तर पूर्व कोणती व पश्चिम कोणती हे आम्हाला कसे माहीत ? आम्ही पश्चिमेची नक्कल जरूर करतो पण आम्हाला पश्चिम दिशा माहीतच नसते. म्हणूनच आजच्या मुलांना नकाशात पूर्व कुठे आहे असे विचारले तर ते हमखास पश्चिम दाखवतात.
असेच आहे डावे उजवे . सुरुवातीला लक्षात ठेवण्याची युक्ती म्हणून सांगत की आपण जेवतो तो उजवा हात. व ढुंगण धुतो तो डावा. आजकाल पॉटी ट्रेनिंगच्या धसक्याने आया इतक्या मेटाकुटीला आलेल्या असतात की त्यांना वाटते येईल ह्याला ओळखता नंतर. मग तो हमखास रिक्षावाल्याला ( मोठा झाल्यावर ) डावीकडे जायचे असले तर म्हणतो "राइट". ( मग रिक्षावाला ओरडतो की राइट्ला नो एन्ट्री आहे ). काय "डावे-उजवे" आहे, हे आजकालच्या पिढीला न कळण्या मागे हेच अज्ञान असावे. मराठी भाषेने आता जायचे तरी कुठल्या दिशेने असा प्रश्न आला की मग दिशांचे ज्ञान पाहता "खाली, वर" ह्या दोनच दिशा ( दशदिशांपैकी ) शिल्लक राहतात. वर गेले तरी भाषेचे मरण, खाली गेले तरी गाडले जाऊन मरण !

अरूण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२