Sunday, March 18, 2012



अरुणोदय झाला--२८

पानसिंग तोमार,
बोलीचा खुमार !

    हिंदी सिनेमाचे एक चांगले असते की तो कोणाला कशासाठी आवडतो तर कोणाला कशासाठी !
    मला हा सिनेमा बोली भाषेच्या खुमारी साठी आवडला.
    पानसिंग तोमार हा सैन्यात जातो. खायला मुबलक मिळते म्हणून सैन्यातल्या स्पोर्टस्‌ मध्ये रनिंग मध्ये प्राविण्य मिळवतो. इकडे त्याची शेती बळकावल्या जाते म्हणून तो बागी बनतो. चंबळचा डाकू बनतो. सिनेमाची गोष्ट एका पत्रकाराच्या मुलाखतीने उलगडत जाते. हाडाचा स्पोर्टमन जसा शर्यत पूर्ण केल्याविना रहात नाही त्या प्रमाणे हा शेवटी शरण न येता पोलिसांशी लढताना प्राण ठेवतो. सिनेमा जे खेळाडू हलाखीने मेले त्यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे.
    आता बोली भाषेच्या खुमारी बद्दल. संवाद लेखकाने कमालीच्या प्रांजळपणाने संवाद थेट चंबळच्या बोलीतच ठेवले आहेत व इरफान ह्या नटाने त्याला त्याच्या नेहमीच्या तुसड्या फेकीने चांगलाच न्याय दिला आहे. एक साधे उदाहरण: मुलाखत घेणार्‍या पत्रकाराला तो मटण खाऊ देत नाही ( कारण पत्रकार मोटा असतो ) पण त्याला आइस-क्रीम विथ गुलाबजाम देतो. गरम गुलाबजाम आईसक्रीम बरोबर खाण्याच्या विदेशी लज्जतीचे बहारदार वर्णन करताना तोमार म्हणतो : एकै स्वाद है, लेकिन डबल मिजाज है !
    साध्या साध्या माणसांनाही विचारांचे गारूड कसे मोहवून अचाट कामे करून घेते तेही ह्या सिनेमात फार नजाकतीने दाखविले आहे. जसे सगळे जण पानसिंग तोमार ह्याला शेवटी शरणागती पत्कर असे सांगत असतात. पोलिटिकल करेक्टनेस प्रमाणे ते रास्तही ठरते. पण पानसिंग म्हणतो हम ठहरे पगबाधा रनर ( स्टीपल-चेस रेसचा रनर), हमार लक्ष्य फिनिश लाइन. भले जिते या हरे, रेस तो पूरी करनीही है ! एक साधे तत्व, पराकोटीच्या वेडेपणाला भाग पाडते !
    असेच सैन्याधिकारी त्याची चौकशी करीत असताना त्याला विचारतात की त्याच्यापैकी कोणाला पोलिसांनी कधी पकडलेले होते काय ? म्हणजे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ? तर पानसिंग कौतुकाने म्हणतो, पोलिस पकडही नही पाये ! म्हणजे पकडल्या जातो तो चोर व पकडल्या जात नाही तो नेता असाच जनमानसाचा कौल दिसतो !

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
----------------------------------------------------