Saturday, May 10, 2014

“नीच” राजनीती !
एखाद्या शब्दाचा अर्थ काढताना त्यातल्या अक्षरांनाही काही अर्थ असतो का ? बघू या .
“न” हे अक्षर मराठीतले अनुनासिक आहे. मराठीत अ ते अ: हे बारा स्वर व क, ख ,...ते ज्ञ ही ३६ व्यंजने अशी एकूण ४८ अक्षरे आहेत. म्हणजे दर शंभर अक्षरात एखादेच अक्षर पुन्हा येण्याची शक्यता अवघी दोन टक्क्याची आहे. पण कोणतेही लिहिणे वा बोलणे तपासले तर त्यात सगळ्यात जास्त येणारी अक्षरे आहेत अनुनासिके. जसे आपण म्हटले की “संध्याकाळी येणारी डेक्कन क्वीन वेळेवर येणार आहे का ?” तर ह्या २२ अक्षरात अनुनासिके ( अनुस्वार, णा, न , न , णा ) येतात ५ , म्हणजे प्रमाण पडते २२%. असे अनेक उतारे तपासले तर १८ ते २०% टक्के हे अनुनासिकांचे वापरातील सातत्याचे प्रमाण दिसेल . ह्या शिवाय फोनोलॉजी ह्या विषयात सोनोरीटी स्केल मध्ये असे दाखवतात की सर्वात मोठ्याने ऐकू येतात ते स्वर व त्यानंतर य र ल हे द्रव व त्यानंतर अनुनासिके. म्हणजे श्रवणसुलभतेसाठी अनुनासिके फायद्याची ठरतात .
जेव्हा आपण कोणाला शिव्या घालण्याचे ठरवतो तेव्हा त्याचा भरपूर उपमर्द करण्याचा आपला मानस असतो . तेव्हा जास्त वापरातील व मोठ्याने ऐकू येणारी अनुनासिके वापरणे हे रास्त धोरण ठरते. शिवाय “न” ह्या अक्षरात नकारात्मकता ठासून भरलेली आहे हे कोणाच्याही लक्षात येतेच. त्यामुळे शिवी द्यायची तर ती  “नी” पासून असावी हे साहजिकच म्हणायला हवे.
आता राहता राहिले दुसरे अक्षर “च”. मराठीत ह्या अक्षराची एक वेगळीच खुमारी आहे. “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मागणीत “च” नसता तर आचार्य अत्रे म्हणायचे तसे चव्हाण मधले “च” काढले तर जे राहते ( “वहाण” ) तेच मारावे लागले असते. तंत्रशास्त्रात च ह्या अक्षराचे दैवत “इच्छाशक्ती” आहे व म्हणूनच “नीच” मध्ये प्रतवारी करणार्याची इच्छाशक्ती प्रकर्षाने दिसून येते.
त्यामुळेच “नीच” ही फार परिणामकारक शिवी होते व म्हणूनच ती फार झोंबते !

------------------------------------  

Friday, May 2, 2014

वाट लागली
नोम चोम्स्की नावाचे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मूल प्रथम भाषा शिकते तेव्हा त्याच्याकडे अगदी थोडी माहीती असते, अगदी थोडे नियम माहीत असतात, व तेवढ्याच बळावर व बाहेरच्या विश्वाचे संपर्क न्याहाळत ते त्याच्या मनाने भरारी घेते व काही एक ठरवून ती भाषा शिकते. ही काही माहीती नसताना, धडाडीने निष्कर्ष काढणे, हा मुलाचा ( माणसाचा ) जात्याच स्वभाव असतो व पुढेही सर्व ज्ञान-विज्ञानातली प्रगती, नवीन शोध ते ह्याच स्वभाव-गुणाने करते.
कदाचित दिलेल्या प्रमाण भाषेतलाच एखादा शब्द घेऊन मग त्यातूनच वेगळा अर्थ काढण्याची खोड मग माणसाला लागली असली पाहिजे. शिवाय माणसे एखादा गट बनविला की पटकन लक्षात येईल असे कोड-नाव ( संकेत ) ठेवतात.ह्यात काही जुजबी कोड ( संकेत ) असतात व्यंगांवरून . जसे : लंगडा, डुचका, मोटू, लंबू वगैरे. अशाच खोडी मुळे मूळ अर्थ वेगळाच असलेला शब्द मग लोक वेगळ्याच अर्थाने वापरू लागतात, रूढ करतात. जसे : वाट लागणे. सुरुवातीला "दिंडी वाटेला लागली", "तो मग चांगल्या वाटेला लागला", "तो मुंबईच्या दिशेने वाटेला लागला", असल्या वाक्य़ांवरून "इच्छित स्थळी जाण्यासाठी वाट धरणे "असा चांगला अर्थ असणार. त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थाने मग काही लोक म्हणू लागले असतील की "मला त्या रस्त्याने जाताना खूपच अडचणी आल्या, अगदी नकोसे झाले.", ह्यालाच मग हे लोक म्हणू लागले : वाट लागली.
हे झाले “वाट” ह्या शब्दाला आलेल्या नकारात्मक अर्थाचे अंदाज बांधणे. पण ह्याला  पुरावा शोधायचा तर लोकांचा ह्या शब्दाचा वापर कसा होतो ते पाहणे. आता वर्तमानपत्रातले हे शीर्षक पहा “खोदकामामुळे मुंबईकरांची “वाट” !” आता ह्यात वाट ही चक्क नकारात्मकच आहे .
एखाद्या शब्दाचे संचितच असे असते की ते नकारात्मक होतात. त्या शब्दाची ते वाटच लावतात !

-------------------------------------------------------