Friday, December 30, 2016

धाकड २०१६

धाकड २०१६

काल “दंगल” पाहिला तेव्हा त्याच्यातल्या हरियाणवी बोलीची काही वैशिष्ट्ये चांगलीच लक्षात राहिली. त्यात धाकटी मुलगी पतियाळाच्या क्रीडा संकुलासंबंधी बोलतांना म्हणते की तिथे तर सगळ्या “धाकड”च मुली येत असतील ना ? धाक देणाऱ्या धाकड. किंवा मराठीत आपण ज्यांना धडधाकट म्हणतो तशा. ह्याच अर्थाच्या वळणाने गेले वर्ष २०१६ तसे धाकडच म्हणावे लागेल !

सबंध गेले वर्षभर भरवशाच्या म्हशिंनी टोणगे दिले, तेही जगभर ! हिलरी बाई येता येता हरल्या, तेही ट्रम्पसारख्या टोणग्या कडून. ब्रिटनसारख्या भरवशाच्या देशाने युरो सोडले. काश्मिरात दंगल माजली. अतिरेक्यांनी कहर केला. भारताने सीमेपार जावून चोप दिला. आणि सरतेशेवटी जगात कुठे झाली नसेल अशी नोटबंदी झाली !

वर्ष तसे धाकातच गेले !

--------------------------

 

Monday, December 26, 2016

श्रेष्ठ मौखिक

श्रेष्ठ मौखिक

साहित्यात श्रेष्ठता जर लोकप्रियतेवरून ठरवायची तर अनेक लोकांना जे मुखोद्गत ( पाठ ) आहे त्यावरून ठरवू गेले तर आजचे बहुतेक साहित्यिक बादच होतील. चांगले चांगले मान्यवर साहित्यिक हे त्यांच्या मृत्यू पश्चात केवळ आठ दहा वर्षेच लोकांच्या लक्षात राहतात. त्यांचे साहित्य ( कथा, कविता, लेख वगैरे ) तर फारच थोडे दिवस लोकांच्या ध्यानात राहते. ते पाठ तर नसतेच.

त्याउलट “शुभम् करोति कल्याणं” हे काव्य कोणाचे आहे, ते मूळ संस्कृत आहे का मराठी, हे आपल्या काही लक्षात नसते, पण काव्य पाठ असते. तशाच काही कविता व लोकगीते. आपण आपल्या साहित्य वाचनात अनेक प्रकार वाचतो, पण नेमके हेच कसे पाठ राहते ? अनेकांच्या अनेक वर्षे लक्षात राहणे, टिकणे हा निकष लावला तर हे काव्य प्रकार श्रेष्ठ नाहीत का ?

आजही वारकरी पंढरपूरला वारीला जातात हे दृश्य त्यातल्या भक्तीभावापेक्षा त्यांच्या पाठ असलेल्या तुकारामाच्या अभंग म्हणण्याने, एका वेगळ्याच, उच्च कोटीतले वाटतात. हे अभंग मग इतके वर्षे टिकून आहेत, ते असे म्हटल्या गेल्यानेच ना ?

ज्ञानपीठ वा अकादमी पुरस्कारापेक्षा आपली कविता वर्षानुवर्षे लोकांनी म्हणत राहावी असे कोणत्या कवीला वाटणार नाही बरे ? हीच मौखिकाची श्रेष्ठता !

----------------------