Tuesday, May 3, 2011

अरुणोदय झाला----२०
कवी का गीतकार ?
आपल्याकडे फारा दिवसांपासून एक वाद आहे की ग.दि.मा. वा जगदीश खेबुडकर ह्यांना कवी म्हणायचे की गीतकार ? कोण मोठा ? कवी का गीतकार ?
भाषाशास्त्रात "रेजिस्टर ऑफ लॅंग्वेज" नावाचा एक शैलीप्रकार आहे. जसे: समजा आपण कोणाला प्रेमपत्र लिहितो आहे तर त्याची भाषाशैली अगदीच वेगळी, मृदू, मुलायम, रोमॅंटिक, खाजगी अशी असते. आणि समजा एक वकील एक नोटीस लिहितो आहे, तर त्याच्यातली भाषाशैली ही खासच थेट वळणाची, नेमकी व कोरडी असते. आता कादंबरी, लघुकथा, कविता, गीते, निबंध, लघु-निबंध, संशोधनपर निबंध वगैरे साहित्याचे वेगवेगळे वाण आपण पाहतो. प्रत्येकाची शैली ही खास वेगळीच असते व ती त्या त्या वाङमयप्रकाराला साजेशीच असते, असावी लागते. ह्या पैकी आजच्या वादाला घेऊ : कविता आणि गीते.
गीते अर्थातच, गेय असावी लागतात. अर्थात एक अपवाद म्हणून कधी कधी अजिबात न गाता येणारी गीतेही गाजून जातात. पण ते अपवादच. ( वेस्ट-इंडीज येथे कॅलिप्सो गाण्यांची परंपरा आहे. दरवर्षी कार्निव्हलला स्पर्धा आयोजून ते एक कॅलिप्सो-किंग व कॅलिप्सो-क्वीन निवडतात. त्या गाण्यात एक चायनीज माणूस एक विचित्र गाणे, जे अजिबात गाता येत नव्हते, गायला. त्याला चायनीज कॅलिप्सो-किंग म्हणत लोकांनी प्रचंड हास्यकल्लोळ केला. गाता न येणारं गीत हा तसा विनोदच ! ). गीतात गेयतेसाठी छोटे छोटे शब्द, सोपा अर्थ असलेले शब्द, आणि यमके, अनुप्रास, असे आवाजी अलंकार ह्यांचे प्राबल्य असते. कित्येकवेळा केवळ गीतासाठी काही विचित्र आवाज असलेले शब्दही योजतात. जसे: किशोरकुमारचे डुडलींग--डिडली ए---या--हू--वगैरे. गीतांची योजना सिनेमात वा भावगीतात एक प्रकारचा मूड, भाव, वातावरण, निर्माण करण्यासाठी असते. त्यामुळे त्यात अगम्य शब्द, अर्थ न निघणारे शब्द, असून चालत नाही. शिवाय काही काही कठोर आवाजाचे शब्द वापरता येत नाहीत. वीरश्रीची गीते असतील तर त्यात वेगळेच साहस निर्माण करणारे शब्द वापरावे लागतात.
त्या मानाने कवितेला काही बंधने नसतात. कविता कशीही करू शकता. पूर्वी वृत्तात कविता करणे आवश्यक असे. किंवा भक्तिभावाच्या कविता अभंग वा ओवी ह्या वृत्तातच असत. आजकाल असे काही बंधन नसते. आजकाल बहुतेक कवितेचा मामला हा मुक्तछंदात कुठल्याही निर्बंधाविना असतो. शिवाय कवितेचा अर्थ समजलाच पाहिजे असे बंधनही नसते. किंबहुना जेवढी कविता दुर्बोध तेवढा तिचा दर्जा चांगला, असा सामान्यांचा संशय असतो. कवितेला मूड, भाव, वातावरण निर्मिती वगैरेचेही उत्तरदायीत्व नसते. कविता फक्त असावी लागते. कशी का असेना. ह्या वर्णनावरून सगळी गीते ही कविता ह्या प्रकारात मोडू शकतात पण सगळ्या कविता गीतात घेता येत नाहीत. काही मोजक्याच कवितांना गीतेही म्हणता येईल.
संगीतकाराच्या चाली बरहुकूम, ताल-लयाला धरून, गीते लिहिणे, हे सर्जन प्रक्रियेत खूपच कसबाचे काम आहे. त्यामानाने कविता जन्माला घालणे हे फारच सोपे काम असते. ( म्हणूनच कुठल्याही साहित्य-संमेलनात कवी व काव्य-वाचनवाले प्रचंड प्रमाणात असतात, दुसर्‍या कुठल्याही साहित्यप्रकाराच्या तुलनेत.). ते सगळ्यांनाच जमणे फार अवघड. तसेच गीते समजणे, त्यांचे रसग्रहण करणे हे जरा कौशल्याचे काम आहे. गेयतेचे अंग सगळ्याच ऐकणार्‍यांना असते, असे नाही. बहुसंख्यांना त्यात फारसे गम्य नसते.
साहित्याचे प्रयोजन तुम्हाला अभिव्यक्ती करू देण्याचे असते. तुम्ही तुम्हाला काय वाटते ते लिहू शकाल, ते साहित्य. गीते लिहिणे हे खूपच कसबाचे व कठिण काम खरेच, पण ते एका विशिष्ट हेतूपायी योजलेले सर्जन असते. ते कविते सारखे सहजी स्फुरलेले व सर्जकाला मुभा देणारे असत नाही. त्यामुळे ते अटी-तटी-चेच ठरवण्याचा सामान्यांचा कल असतो. पूर्वी मात्रा-वृत्तात कविता लिहिणे हे सर्जनापेक्षा कसबाला वाव देणारे असे. म्हणूनच ते आता बाद करण्यात आले आहे. चित्रकलेत सुद्धा हुबेहुब रेखाटण, हे ज्यास्त कुसरीचे काम आहे, ते दिसायलाही मोहक असते. पण आजकालच्या आधुनिक चित्रकलेत म्हणूनच त्याला मानाचे स्थान देत नाहीत. आडव्या-तिडव्या रेघा, रंगांचे वाट्‌टेल तसे पुंजके व मन मानेल तो विषय ( तोही समजेलच असा काही नेम नाही ), असे आजकालच्या चित्रकलेचे झाले आहे. ह्याच कला मुळे ( ट्रेंड ह्या अर्थी ), साहित्यात बंधने असलेले अविष्कार, आजकाल मान्यता पावत नाहीत. हे इतके टोकाला जाते की वाचकाला कधी कधी एखाद्या कलाकृतीला कथा म्हणावे, निबंध म्हणावे, का कादंबरी म्हणावे असा संभ्रम पडू शकतो.( जसे श्याम मनोहर यांच्या कादंबर्‍या ). पण ज्यांच्याकडे साहित्याची व्यवस्था सोपविलेली असते त्यांना ह्या संभ्रमापेक्षा सर्जकांच्या मुक्त आविष्काराचे ज्यास्त अप्रूप असते व महत्वही असते व त्याचीच तळी ते उचलून धरतात. ते त्यांच्या सोयीचे असते.
पण सुदैवाने साहित्य हा प्रकार अजून तरी कोणा एका गटाकडे गेलेला नाहीय. त्यामुळे आपल्याला वाखाणायचे तर आपण एखाद्या गीतकाराला अप्रतीम कवी म्हणू शकतो व तसा सन्मानही देऊ शकतो. तो तसा ग.दि.माडगूळकर व जगदीश खेबुडकर ह्यांना रसिकांनी दिलेला आहेच. साहित्याचे शास्त्र गुंडाळून ठेवून ! तर काय हे दोघेही फार मोठे गीतकार व कवी आहेतच !

--------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment