Friday, May 2, 2014

वाट लागली
नोम चोम्स्की नावाचे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मूल प्रथम भाषा शिकते तेव्हा त्याच्याकडे अगदी थोडी माहीती असते, अगदी थोडे नियम माहीत असतात, व तेवढ्याच बळावर व बाहेरच्या विश्वाचे संपर्क न्याहाळत ते त्याच्या मनाने भरारी घेते व काही एक ठरवून ती भाषा शिकते. ही काही माहीती नसताना, धडाडीने निष्कर्ष काढणे, हा मुलाचा ( माणसाचा ) जात्याच स्वभाव असतो व पुढेही सर्व ज्ञान-विज्ञानातली प्रगती, नवीन शोध ते ह्याच स्वभाव-गुणाने करते.
कदाचित दिलेल्या प्रमाण भाषेतलाच एखादा शब्द घेऊन मग त्यातूनच वेगळा अर्थ काढण्याची खोड मग माणसाला लागली असली पाहिजे. शिवाय माणसे एखादा गट बनविला की पटकन लक्षात येईल असे कोड-नाव ( संकेत ) ठेवतात.ह्यात काही जुजबी कोड ( संकेत ) असतात व्यंगांवरून . जसे : लंगडा, डुचका, मोटू, लंबू वगैरे. अशाच खोडी मुळे मूळ अर्थ वेगळाच असलेला शब्द मग लोक वेगळ्याच अर्थाने वापरू लागतात, रूढ करतात. जसे : वाट लागणे. सुरुवातीला "दिंडी वाटेला लागली", "तो मग चांगल्या वाटेला लागला", "तो मुंबईच्या दिशेने वाटेला लागला", असल्या वाक्य़ांवरून "इच्छित स्थळी जाण्यासाठी वाट धरणे "असा चांगला अर्थ असणार. त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थाने मग काही लोक म्हणू लागले असतील की "मला त्या रस्त्याने जाताना खूपच अडचणी आल्या, अगदी नकोसे झाले.", ह्यालाच मग हे लोक म्हणू लागले : वाट लागली.
हे झाले “वाट” ह्या शब्दाला आलेल्या नकारात्मक अर्थाचे अंदाज बांधणे. पण ह्याला  पुरावा शोधायचा तर लोकांचा ह्या शब्दाचा वापर कसा होतो ते पाहणे. आता वर्तमानपत्रातले हे शीर्षक पहा “खोदकामामुळे मुंबईकरांची “वाट” !” आता ह्यात वाट ही चक्क नकारात्मकच आहे .
एखाद्या शब्दाचे संचितच असे असते की ते नकारात्मक होतात. त्या शब्दाची ते वाटच लावतात !

-------------------------------------------------------

No comments:

Post a Comment