Sunday, February 17, 2013

वाचकांचा धाक !

----------------------------------------------------
अरुणोदय झाला---२९
-------------------
वाचकांचा धाक !
----------------------------
    तुम्ही जेव्हा एखादे नवे मासिक सुरू करता तेव्हा अगदी व्यवस्थापन-शास्त्राप्रमाणे मार्केट-सर्वे करता . वाचकांना काय हवे ते विचारता व त्याप्रमाणे त्या मासिकाला बेतता. आता वाचकांची आवड जर नवीन मासिक सुरू करण्यात एवढी महत्वाची असेल तर चालत्या मासिकातही वाचकांची बदलती अभिरुची तेव्हढीच महत्वाची मानली पाहिजे.
    कवितारती मासिक ( खरे तर अनियतकालिक ) पाहिले तर ते बा.भ.बोरकरांच्या स्मृतीत सुरू झाले होते अशी ठळक नोंद अजूनही त्या मासिकावर आढळेल. त्या मासिकात कविता आठ दहा पाने व तीस-चाळीस पाने समीक्षा असे रूप सुद्धा वाचकांच्या प्रतिसादावरूनच झाले असावे.
    चित्रकार दलाल ( व मुळगावकर)  हे एकेकाळी तमाम महाराष्ट्रातल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर असत. कारण त्यांची चित्रे लोकांना भावत. मग ती वाचकांची अभिरुची म्हणून समजा तशी संपादकांनी आपापल्या मासिकांवर छापली तर तो वाचकांच्या अभिरुचीचा मरातबच मानला पाहिजे. एका चित्राने नवभारत किंवा भाषा आणि जीवन ह्यांचा खप वाढणार असेल तर काय हरकत आहे ? वैशालीतही आज जे पदार्थ आहेत तेही गिर्‍याइकांच्या पसंदीनेच केव्हातरी रुजवलेले होते ना ?
    एकेकाळी लघुकथा प्रचंड लोकप्रिय होत्या. त्याप्रमाणे कित्येक मासिके त्या छापीत. आज बदलत्या अभिरुचीमुळे बरीच मासिके लघुकथा छापत नाहीत. तसेच राशी-भविष्यांचे दाखवता येईल. गिरीश कुबेर एरव्ही वैज्ञानिक आविर्भाव आणतात पण लोकसत्तेत अजून राशी-भविष्य येतेच ना ?
    माझी आजी, आई ह्या नऊवारी साड्या नेसत असत. त्यांच्या डोळ्यादेखत पाचवारी आल्या, गेल्या, पंजाबी ड्रेस आले, जीन्स आल्या. समाज अभिरुचीचा एवढा मान ठेवतो तर एका मासिकाने एवढे टोकाच्या भूमीकेचे का असावे ?
---------------------------------------

No comments:

Post a Comment