Friday, March 5, 2010

मौखिक परंपरेचे मुख !
तुकाराम महाराजांच्या काळी जो वारकरी संप्रदाय होता,त्याची म्हणतात मौखिक परंपरा होती. म्हणजे जे काही संप्रदायाचे ज्ञान, नियम, रीती-रिवाज होते,ते कुठे लिखित स्वरूपात नव्हते तर सर्व तोंडी होते. जसे भजन, कीर्तन वगैरे सर्व मुखाने म्हणण्याचे प्रकार होते. अशी ही मौखिक परंपरा.
त्याच वेळी दुसरा एक महानुभावी संप्रदाय होता. तो वारकर्‍यांपेक्षा प्रगत होता.पण त्यांचे साहित्य,नियम,रूढी वगैरे सर्व मोडी लिपीत लिखित स्वरूपात होते.ह्या कठिण प्रकारापायी हा संप्रदाय लवकर लयाला गेला. मौखिक परंपरेमुळे वारकरी संप्रदाय बराच टिकला, वाढला.
आपल्याला वाटते, आज जग किती पुढे गेले आहे,सगळे कसे नीट,संगतवार लिहून ठेवलेले असते. मोठमोठे करार व्यवस्थित कलमे घालून लिहून ठेवलेल्या बाडातून असतात. सगळ्यात मोठ्ठा करार कोणता ? " आय डू " किंवा "शुभ लग्न सावधान" म्हणून होणारे लग्न ! का हा मोठ्ठा करार ? कारण ह्या करारान्वये संतती निर्माण करीत लोक एक नवीन पीढी तयार करतात. ह्यापेक्षा मोठी निर्मिती ती काय ? आणि कसा असतो हा करार ? तोंडी ! आणि त्याला कायद्याच्या सर्व बाबी लागू होतात. चालू आहे ना मौखिक परंपरा !
वीस पंचवीस वर्षापूर्वी शेअर बाजार,सट्टे बाजार हे सर्व तोंडी चालत. खूप दाटी होई. दलालांना लटकण्यासाठी बस मध्ये असतात तसे चामड्याचे पट्टे असत. मोठ्ठ्याने ओरडत, खाणाखुणा करीत हे सर्व चाले.मोठ मोठे लिलाव कसे होतात ? ( आयपीएल चा लिलाव आठवा ) बोली तोंडी लावावी लागते. लिलाव करणारा म्हणतो, दस लाख एक बार, दस लाख दो बार, दस लाख तीन बार, सोल्ड ! खल्लास इकडचा बंगला तिकडे ! निवडणुकींचे,क्रिकेटचे,सट्टे फोन वरून, तोंडीच असतात.
प्रत्येक माणूस भाषा शिकतो तो आईच्या तोंडून आपल्या तोंडी, मौखिक परंपरेने. गाणी तर बोलून चालून सगळा तोंडी मामला. हुशार मुलाला शिकवाल ते तोंडपाठ असते.पूर्वी परीक्षाही तोंडी असत. अजूनही डॉक्टरीची अवघड परीक्षा तोंडीच असते. पीएचडीचे डिफेन्स नावाचे भाषण व प्रश्नोत्तरे तोंडीच असतात. ग्रेट ग्रेट गुरू, लेक्चर्स देतात तोंडी. निवडणुका जिंकल्या जातात तोंडी भाषणांनी. देश चालवल्या जातो, लोकसभेत, तोंडी. माणसाचे सर्व महत्वाचे व्यवहार, जसे, शिक्षण, प्रेम, संसार, गुजगोष्टी, आरडाओरडा, त्रागा, आवाहने, आव्हाने,ऑफिसातल्या मीटींग्ज, रस्त्यावरची गजबज, मुलांचे संगोपन, नातेवाईकांशी संवाद, वगैरे ,तोंडीच होतात. म्हणजे मौखिक परंपरा आपण अजून पाळतोय तर !
आयटी ( संगणक ) युगामुळे सगळे संगणकाच्या भाषेत सांगितले तरच लवकर कळते. मौखिक परंपरा किती महत्वाची माहीती आहे ? अहो संगणकात सगळ्यात मोठी फाईल साऊंड बाइट्सचीच होते. म्हणजे मौखिक परंपराच ग्रेट !
---अरुण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

Thursday, March 4, 2010

भारवाही तंत्राची मंत्र-गीता !
माझ्या नातवंडांना जेव्हा मी त्यांच्या आई-वडिलांचे ( म्हणजे आमच्या मुलांचे ) पहिली दुसरीतले पेपर दाखवतो तेव्हा, उलटे बी, डी, त्रिकोणात उगवलेल्या फुलाचे फ्लॉवर-पॉट,वगैरे बालसुलभ चुका पाहून त्यांना खूप हसू फुटते व मग दिवसभर नातवंडे त्यांच्या आई-वडिलांची खिल्ली उडवत राहतात. आता भले ते खूप हुशार आहेत, पण लहानपणी ते ही चुका करतच शिकले होते हा बोध मग नातवंडांना होतो.
"आऊटलायर्स" नावाच्या नुकत्याच आलेल्या माल्कम ग्लॅडवेल च्या पुस्तकात तर त्याने मांडलेय की जीनीयस अशी कोणी व्यक्ति नसते तर ज्याला खूप सराव होतो, तोच मग जीनीयस होतो. आता सचिनचेच बघा ! काय प्रचंड मेहनत ! त्याची ९३ शतके झळाळतात पण त्याने किती नाना तर्‍हेचे लाखो चेंडू सरावात झेलले ते आपल्याला माहीत नसते. गणिताचे तर हे नेहमीचे ठरलेलेच आहे. जितका सराव ज्यास्त तितका गणित कमी लचका तोडते. हुसेन आता प्रसिद्ध चित्रकार आहे पण किती असंख्य सिनेमाची पोस्टर्स त्याने रंगविली असतील ते तोच जाणे. तर सरावाची महती अशी !
तुकाराम महाराजांच्या गाथेची अशीच करावी तितकी मोजदाद कमीच भरेल. दोन लाख तीन हजार सातशे पन्नास शब्द, चार हजार पाचशे चौर्‍यांशी अभंग, एकूण २५६७० खंड किंवा चौक आणि हे सगळे वयाच्या बेचाळिस वर्षाच्या आत ! प्रत्येक चौकात एक यमक जोडी म्हणजे २५६७० यमके ह्या कवीने निर्माण केली. किती सराव, कसा हातखंडा !
आता इतका हातखंडा असलेला कवी अगदी सुरुवातीला कच्चा होता, असे कोणी म्हटले तर त्याचे कोण मानणार ? कुसुमावती देशपांडे ह्या खूप विद्वान बाई. त्यांनी साहित्य अकादेमी साठी "A History of Marathi Literature" नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात तुकारामासंबंधी लिहिले आहे :His first important work was Mantra Geeta. It was written after years of suffering and spiritual contemplation.Tukaram had studied sacred works and also composed some abhangas before he attempted this interpretation of Geeta. However, it was not a work of quality of the Jnaneshwari. It is tentative, more an expression of views of Tukaram and of contemporary conditions than than an elucidation of the Geeta. It is also unsophisticated and downright in its style, with the unadorned language of everyday usage..." सरावाने कवी महाकवी होतो हे जरी आपल्याला मंजूर असले तरी ते तुकाराम महाराजांना लागू करायला धीर होत नाही. आणि आजकाल तर हा विचार आधी कोणाची कोणती जात आहे त्यावरून ठरविला जाण्याची शक्यता. जे तुकाराम भक्त आहेत ते तर लागलीच म्हणतात की हा वेगळा तुकाराम आहे. हा कोणी नगरचा तुकाराम होता देहूचा नव्हे !
खुद्द तुकाराम महाराज लीनतेने म्हणतात :फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥ पण तुकाराम भक्तांना वाटते हा काही सन्मान नाही, असे कसे असेल ? पण सुरुवातीची रचना कच्ची असणे, ह्यात सरावाचा व नंतरच्या प्रतिभेचा बहुमानच आहे. शिवाय हे किती जिवंत कलाकाराचे दर्शन आहे. मला तरी वाटते, हाच खरा तुकाराम आहे, कारण ह्यात भारवाही तंत्राची मंत्र-गीताच सांगितली आहे !

--अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२
न कळे कृपावंता माव तुझी !

संत तुकाराम महाराज गजल लिहीत होते असे म्ह्टले तर दचकायला होईल. पण गजलेचे तंतोतंत कसब वापरीत त्यांनी एक गजल लिहिली आहे. ही देवाच्या सर्वांठायी असण्याविषयी असून माया ( माव ) कशी आपल्याला हे समजण्या पासून वंचित करते हे सांगणारी आहे.
ह्याचे हिंदीत भाषांतर केले तर गजल सहज दिसून येते. मूळ रचना अशी :
" कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
हिंदीत किंवा उर्दूत भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !


----अरूण अनंत भालेराव
३ मार्च २०१०

Tuesday, March 2, 2010

न कळे कृपावंता माव तुझी !

संत तुकाराम महाराज गजल लिहीत होते असे म्ह्टले तर दचकायला होईल. पण गजलेचे तंतोतंत कसब वापरीत त्यांनी एक गजल लिहिली आहे. ही देवाच्या सर्वांठायी असण्याविषयी असून माया ( माव ) कशी आपल्याला हे समजण्या पासून वंचित करते हे सांगणारी आहे.
ह्याचे हिंदीत भाषांतर केले तर गजल सहज दिसून येते. मूळ रचना अशी :
" कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
हिंदीत किंवा उर्दूत भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !


----अरूण अनंत भालेराव
३ मार्च २०१०