Thursday, September 29, 2016

षटशब्दी , षटकर्णी : ११

षटशब्दी, षटकर्णी : ११

अगदी मोजक्या शब्दात सांगता येणे हे मोठे कसब आहे. एकदा दारू-बैठकीत हेमिन्गवे ह्या लेखकाला आव्हान देण्यात आले की कमीत कमी शब्दात गोष्ट सांगायची. आजतागायत त्याने सहा शब्दात लिहिलेली ही गोष्ट सर्वोत्कृष्ट मानल्या जाते : “For sale: baby shoes, never worn.”

“विकणे आहे : बाळाचे बूट, न घातलेले”
----------------------------------------------------

षटशब्दी, षटकर्णी : ११

मराठा तितुका मेळवावा ; नाना मोर्च्यांत खेळवावा !

-------------------

Wednesday, September 28, 2016

षटशब्दी,षटकर्णी ! : ८

षटशब्दी, षटकर्णी ! : 8
------------------------------
भूक मिटली, तहान मिटली, पुढे काय ?

--------------

षटशब्दी,षटकर्णी

षटशब्दी, षटकर्णी

अगदी मोजक्या शब्दात सांगता येणे हे मोठे कसब आहे. एकदा दारू-बैठकीत हेमिन्गवे ह्या लेखकाला आव्हान देण्यात आले की कमीत कमी शब्दात गोष्ट सांगायची. आजतागायत त्याने सहा शब्दात लिहिलेली ही गोष्ट सर्वोत्कृष्ट मानल्या जाते : “For sale: baby shoes, never worn.”

“विकणे आहे : बाळाचे बूट, न घातलेले”
----------------------------------------------------

षटशब्दी, षटकर्णी : १

वारीत सापडलेल्या विजोड चपलांवर पांडुरंग उभा !

-------------------

Sunday, September 18, 2016

नो म्हणजे नो !

"नो म्हणजे नो !”

पिंक सिनेमा पाहिला आणि महत्व ठसले ते “नो म्हणजे नो” ह्या तत्वाचे. स्त्रियांना “नो”ची ताकद जाणवून देणारा हा सिनेमा अवश्य पाहण्यासारखा आहे.

तसेच ह्यावरून “नो” ह्या शब्दाविषयी भाषाशास्त्रीय कुतूहल जागे व्हायला हवे. शब्दांना अर्थाच्या अनेक छटा असतात. “हो” म्हणजे सकारात्मक अर्थ असला तरी तो जरा मोघमच असतो. हो म्हणजे किती प्रमाणात सहमत हे नक्की नसते. पण नाही/नको चे तसे नाही. त्याची नकारात्मक छटा नेहमीसाठीच नाही अशी परिपूर्ण असते.
    आजकाल सकारात्मक विचार करण्याचे खूपच प्रस्थ आहे. तशात कोणी "नाही", "नको", अशी नकार-घंटा लावली की आपल्याला वाटते की हे सगळे नकारार्थी आहे. हा नकारार्थ मराठीत "न" ह्या वर्णाने येतो. शब्दकोशात न-पासून सुरू होणारे शब्द पाहिले तर मोजून खात्री करून घ्यायची सुद्धा गरज भासत नाही इतके ह्या वर्णाचे नकार देणे डोळ्यात भरते. "न" पासून सुरू होणारे शब्द , शब्दकोशात आहेत एकूण:२६०३. पैकी नकारात्मक भाव दाखवणारे शब्द भरतात: ३९०. म्हणजे हे प्रमाण: १५ टक्के इतके प्रभावी आहे. त्यामुळे शब्दात न आला की तो त्याचा अर्थ नकारात्मक करतो, हे ज्यास्त संभवनीय होते. गंमत म्हणजे हे इतर भाषातही लागू पडते. जसे इंग्रजीत नो, नॉट, नेव्हर वगैरे किंवा हिंदीत नही, ना, वगैरे. आजकाल चांगल्या पालकत्वासाठी "हे करू नको, ते करू नको", असे नकारात्मक बोलू नये, असे म्हणतात. पण कोणाला रस्ता दाखवताना कसे जावे हे जसे महत्वाचे असते तसेच कुठे जाऊ नये हेही सांगणे महत्वाचे असते. म्हणूनच जगदगुरू तुकाराम महाराजांच्या गाथेत "न" असलेले शब्द ८० टक्के अभंगात दिसतात. कित्येक सकारात्मक अर्थ असणारे शब्दही नकार वापरूनच केलेले आढळतात ( जसे: नि:शेष, निष्कलंक, निर्द्वंद्व, निरभ्र, निर्दोषी, वगैरे.).
    "हे माझे एवढे वाचाना. तुम्हाला आवडले नाही तर मी परत लिहितोना". "बघाना"; असे आजकाल एक आर्जवासारखे आपण म्हणत असतो. हे इतके रूढ होते आहे की आपण इंग्रजीलाही असे प्रत्यय लावून आजकाल बोलायला लागलो आहोत. जसे: स्पीकना, सी टु इट ना, गो ना वगैरे.
    हे क्रियापदाला असे शेवटी ना लावणे ही आपल्या मराठीची सध्याची ढब आहे. क्रियापदावरून जर आज्ञा, हेतू, उद्देश, उपदेश वगैरे कळाले तर त्याला व्याकरणात क्रियापदाचे "अर्थ" म्हणतात. जसे: १)स्वार्थ ( उदा: तो घरी गेला ) २) आज्ञार्थ : ( उदा: रांगेत उभे राहा ) ३) विध्यर्थ : ( उदा: मुलांनी आईवडिलांचे ऐकावे ) ४) संकेतार्थ : ( उदा: पाऊस आला तरी सहल जाईलच. ). आता विचाराना, बोलाना, कराना, गा ना , या ना, खा ना, जा ना, खेळाना, उघडाना, ह्या सगळ्या शब्दात आपण जो "ना" लावतो तो प्रथमदर्शनी नकारात्मक दिसतो खरा पण ते एक प्रकारचे आर्जव, विनंती असून त्यात नकारात्मकता नसते. शिवाय आपण तो लावून एकप्रकारे आदरच दाखवतो. त्यामुळे केवळ विनंतीच नाही तर आदरार्थी "अर्थ" करणारा हा प्रत्यय आहे. हाच ना आपण जर शब्दाच्या सुरुवातीला लावला तर मात्र नकारी शब्द तयार होतात. जसे: नालायक, नामंजूर, नाराज, नाउमेद, वगैरे. असेच नि हा नकारी प्रत्यय सुरुवातीला लावून सकारात्मक शब्दही आपण बनवत असतो. जसे: निरोगी, निनावी, निकोप, निर्जंतुक वगैरे.
    वेदकालापासून आपण देवाचे वर्णन जिथे नेति नेति ( न इति, असा नाही, असा नाही ) अशा नकारी शब्दांनी करतो तिथे आता क्रियापदाला शेवटी ना लावून आपण आदर, विनंती करायला लागलो हे चांगल्याच अर्थाचे आहे !

नो म्हणजे नो हा अर्थ मात्र हा शब्द इमाने इतबारे पोचवतो !

---------------------------------------

Saturday, September 17, 2016

चला वेड पाघरून पेडगावला जाऊ या ...

-------------------------------------------------------
चला वेड पांघरून पेडगावला जाऊ या.....
----------------------------------------
राम जेठमलानी ह्यांना कमीत कमी आसारामांच्या वकीलपत्राचे १० कोटी तरी मिळाले असतील. आता एवढया खर्चाने ते काय सांगू पाहात आहेत ?
तर, वेड हे इतके सर्वव्यापी असेल ? तुम्ही ही पोस्ट वाचणारे पाचवी व्यक्ती असाल तर तुम्ही त्यातलेच एक असू शकाल. कारण पाचात एकाला वेड लागलेले असते.
प्रथम वेड ह्या गोष्टीबद्दल जो धब्बा ( टॅबू ) आहे तो घालवू या. सोप्या मार्गाने. टेड ह्यांचे अनेक शैक्षणिक व्हिडीओ आहेत, त्यापैकी एका वेडाबाईने शहाणे झाल्यावरचा हा व्हिडीओ पहा. ( खाली दिला आहे, त्यावर क्लिक करून पहा, ८ मिनिटांचा आहे. ).
खर्‍या खोट्याच्या भानगडीत न पडता आता जगातले जे टॉपचे १० मानसिक रोग आहेत, त्यांची ही जंत्री वाचा :
१) ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स:
ह्या रोगात लहान बाळांची वाढ नीट होत नाही. त्यांना पाहण्यात फोकस न होण्याने अडथळे येतात. ऑटिझम असलेली मुले इतर मुलांसारखी धसमुसळी नसून हळूबाई असतात. त्यांच्या वाढीत ह्यामुळे अनेक अडथळे येतात. अमेरिकेत ह्याने अनेक बालके ग्रासलेली असून दोन जुळ्यामधल्या एकाला ऑटिझम झालेले मी स्वत: तिथे एका घरातले मूल पाहिलेले आहे.
२) स्कीझोफ्रेनिया :
भास होणे, लोक आपल्याविरुद्ध कट करताहेत, आपल्याबद्दलच बोलत आहेत असे वाटणे, दोन प्रकारची व्यक्तिमत्वे एकाच व्यक्तिमत्वात असणे, लोकांबद्दल संशय येणे वगैरे. देवराई सिनेमात ह्याबाबतची सर्व माहीती मिळते.
३) बायपोलर डिसऑर्डर:
अतिउत्साह ( मॅनिक ) ते निरुत्साह ( डिप्रेशन ) असे मूडस्‌ सारखे बदलत जाणे. ह्या पायी व्यक्तींतल्या संबंधावर परिणाम होणे, शाळेत अभ्यासावर परिणाम होणे वगैरे.
४) पॅनिक डिसऑर्डर :
हार्ट ऍटॅक सारखीच ह्यात ह्रदयाचे ठोके/धडधड वाढते , अशक्तपणा येतो, ओकार्‍या येतात, श्वास कोंडतो, घाम येतो, हाताला झिणझिण्या येतात, छातीत दुखते वगैरे हे ऍटॅक्स खरे असून प्रचंड भीतीपायी आलेले असतात.
५)  OCD, PTSD, GAD वगैरे ऍंक्झायटी डिसऑर्डर्स
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर ( OCD ) : ह्यात अगदी सारखे एकच विचार मनाला कोरत राहतो. कोणाला स्वच्छतेचे इतके भूत मानगुटी बसते की ते सारखे सगळे स्वच्छ करीत राहतात, सारखे हात धुतात, वगैरे. आपले वागणे आपला ताबा घेते.
पोस्ट-ट्राउमॅटिक-स्ट्रेस-डिसऑर्डर ( PTSD ) : एखाद्या "हादसा" नंतर काही काळाने जे बचावलेले असतात त्यांना त्यावेळी वाटलेली भीती काही काळानंतर वाटत राहते व ती मन पोखरत राहते, ताण देते.
जनरल-ऍंक्झायटी-डिसऑर्डर ( GAD ) : नेहमीच्याच काळज्या पण त्या सातत्याने सारख्या वाटत राहतात ( सहा महिने तरी ) . त्यांना सारखे काही तरी भयाण घडणार आहे असे वाटत राहते. माणसे चिंतोबा बनतात व स्वत:ला त्रास करून घेतात.
६) फोबिया
सभेत बोलण्याची भीती ते सापांची भीती, अशा अनेक भीतीपायी माणसे ताणात राहतात. कित्येकांना उंचावर गेल्यावरची भीती, तर काहींना बंद खोल्यांची भीती तर काहींना आपली वर्तणूक लोक पाहताहेत त्याची भीती वाटत राहते. ही भीती कित्येक आठवडे टिकते.
७) ADHD अटेंशन-डेफिसिट-हायपर ऍक्टिव्हिटी-सिंड्रोम
स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा हा रोग आहे. कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही आहेत हे पाहून लक्ष वेधण्यासाठी मग पोरे/माणसे हायपर होतात, एकाजागी टिकत नाहीत, सारखे काहीना काही करीत राहतात.
८) ईटींग डिसॉर्डर्स
ह्यात नर्व्हस मुले जास्त खायला लागतात, गलेलठ्ठ होतात तर ज्यांना ऍनोरेक्सिया होतो त्यांना न खाण्याचे वेड लागते व ती मुले शेवटी अशक्त होऊन मरतात.
९) पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स
काही मुलांना लोक नावे ठेवतील त्याची भीती वाटते व ते कोणासमोर जाण्याचेच टाळतात, बुजरे होतात, तर काही मुले इतरांचा विचारच न करता धसमुसळी व आक्रमक होतात. आत्महत्येस प्रवृत्त होणारी मुले ही अशीच इंपल्सिव्ह होतात तर काही ह्यामुळे अस्थिर होतात.
१०) मूड-डिसऑर्डर्स
मनाची भावना बराच काळ टिकली तर त्याला मूड म्हणतात. ह्यात डिप्रेशन येणे हे मोठे प्रकरण आहे. एकटेपणाच्या भावनेतून हे डिप्रेशन येते. लोक आपल्याला स्वीकारत नाहीत ह्या भावनेतूनही हे मूडस्‌ ताण देतात, खिन्न करतात. ह्या मुळे अडचणीवर मात करताना नेटाने प्रयत्न होत नाहीत व माणूस गर्तेत जातो.
------------------------------------------------------






<iframe width="560" height="315" src="//www.youtube.com/embed/mbbMLOZjUYI" frameborder="0" allowfullscreen></iframe>

स्वीटहार्ट

-------------------------------
स्वीटहार्ट
-----------------
"ए पर्सन इन रोमॅंटिक रिलेशन विथ" असा ढोबळ अर्थ असला तरी अर्थ म्हणजे वापर ( meaning is use ) ह्या न्यायाने, स्वीटहार्टचा वापरातला अर्थ वेगळाच होतो. ह्याचा नेमका अर्थ "स्वीटहार्ट-कॉन्ट्रॅक्ट" ह्या एका कायदेशीर बाबीवरून समजतो. कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये "समतोल" ( दोन्ही पक्षांना समान फायदे असावेत)  असावा, असे कायद्याचे एक कलम आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर विलंबाला दंड (पेनाल्टी ) असेल , तर त्याउलट समतोलासाठी, काम लवकर झाले तर त्यासाठी इन्सेंटिव्ह ( प्रोत्साहन ) असायला हवेत असे कॉन्ट्रॅक्टचे नियम सांगतात. समजा प्रोत्साहन नसेल आणि नुसता एकतर्फी दंडच असेल तर काय होते ? तर ते कॉन्ट्रॅक्ट "स्वीटहार्ट-कॉन्ट्रॅक्ट" होते. म्हणजे प्रत्यक्षातल्या "स्वीटहार्ट"ला जसा समतोलाचा न्याय लागू होत नाही, सगळे तिच्याच कलाने होते, तसे दोन पक्षांपैकी एका पक्षालाच ह्यात फायदा होतो व म्हणून कायद्यात त्याला स्वीटहार्ट-कॉन्ट्रॅक्ट म्हणतात व ते कायदेशीर होत नाही. ( अर्थात भारतात हे कोणी पाळीत नाही, पण कायद्याच्या दृष्टीने हे अन्यायकारक समजतात) .
ह्याच अर्थछटेच्या फरकाने अमेरिकेत ( वा पश्चिमेत ) प्रेयसीला वा बायकोला "स्वीटहार्ट" म्हणण्याची चाल आहे. म्हणजे तिला असे आपण भासवतो की बाई, सगळे तुझ्याच कलाने मी घेत आहे. तू स्वीटहार्ट आहेस. नुसत्या प्रियकर/प्रेयसीत हा अर्थ येत नाही !
----------------------------------

Tuesday, September 6, 2016

बिग बँग कडे !

बिग बँग कडे !

---------------------

म्हणतात की विश्व निर्माण झाले तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाला, बिग बँग ! त्यानंतर सगळे निवले. जेव्हा हा बिग बँग झाला तेव्हा जीव सृष्टी नव्हती म्हणतात. कदाचित म्हणूनच लोकांना मोठ्ठ्या आवाजाचे आकर्षण असावे !

आपल्या ढोल ताशांच्या आवाजाचे काय घेवून बसलात ? तुम्ही परदेशातल्या कनसर्टस् ऐकल्या तर जीवाचा थरकाप उडेल, इतका प्रचंड मोठा आवाज ! आणि त्याही वर किंचाळून दाद देणे !

आजकाल कुठलीही सभा, संमेलन असू दे, आवाज ऐकू येत नाहीय असे तर कधीच होत नाही. पूर्वी सिनेमा दाखवणारा आवाज चालू करायचा विसरायचा व मग पब्लिक ओरडायचे “आवाज !” अन् आवाज चालू व्हायचा. आवाज आवाज असे ओरडावे लागल्याचे कित्येक वर्षात स्मरत नाही.

सूर्याच्या प्रकाशात जशी एक उर्जा असते, तशीच आवाजात उर्जा असते. माझा असा संशय आहे की ज्या लोकांनी बिग बँग पाहिलेला नाही त्यांची अशी चाल असावी की सर्व विश्वातून एव्हढा आवाज व्हावा की त्याने परत एकदा बिग बँग व्हावा !

एरव्ही बायकांचे बोलणे किती नाजूक, पण आताशी....  

........बेबी को बेस पसंद है !

----------------------------

परंपरा आणि युरिनोमीटर

परंपरा आणि युरिनोमीटर

------------------------------

मध्ये एका मित्राने मला “मंडालेचा राजबंदी” जे लोकमान्य टिळकांवरचे पुस्तक भेट दिले होते. आपण म्हणतो की लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा निर्माण केली. तर प्रत्यक्ष टिळक रोजच्या वागण्यात काय परंपरा पाळीत असतील ते पुस्तकात शोधावे ह्या दृष्टीने मी ते वाचत होतो.

काळ्या पाण्याच्या शिक्षेत असताना नातेवाईक तेव्हा तुरुंगात येउन भेटणे अशक्यच. त्यांची चौकशी केवळ पत्रानेच व्हायची. त्यातही सेन्सोर वगैरे भानगडी. तर एके ठिकाणी ते चौकशी करतात की त्यांच्या पत्नीची तब्येत कशी आहे ? हे ते मोघम विचारीत नाहीत तर नेमके विचारतात की त्यांच्या लघवीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे ? त्यावर असेही सांगतात की आपल्या माडीवर एक युरिनोमीटर आहे त्याने हे मोजता येईल.

आता आजकाल आपण वैद्यकीय क्षेत्राबाबत एव्हडे चोखंदळ व आपल्याला हे युरिनोमीटर काय आहे हे माहीत नाही ? ज्या मित्राने पुस्तक दिले होते त्याचा भावूच योगायोगाने एका लॅबचा कर्ता होता. त्यालाच विचारले तेव्हा कळले की हे काचेचे छोटेसे उपकरण आहे. ह्यात लघवीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ( १.०० ते १.०३ ) मोजतात. ही वाढलेली असेल तर किडनीज नीट काम करत नाही आहेत ते कळते. ( खाली ह्याची सविस्तर माहिती दिली आहे ).

तर लोकांना गणेशोत्सवाची परंपरा घालून देणारे लोकमान्य स्वतः वैज्ञानिक दृष्टी कसे बाळगून होते हे इथे किती स्पष्ट दिसते ना ?

----------------------------

https://en.wikipedia.org/wiki/Urinometer

Monday, September 5, 2016

आवाज कुणाचा ?

आवाज कुणाचा ?
-----------------------
तुम्ही ऐकले असेल की वाचेचे परा, पश्यंती, मध्यमा,व वैखरी असे प्रकार मानतात. त्यापैकी वैखरी ही आपण बोलतो ती भाषा किंवा तसे आवाज. परा मध्ये अगदी प्रारंभीचे (आदि) आवाज येतात. जेव्हा सर्व विश्व स्थिर होते तेव्हा आवाज शक्य नव्हता कारण आवाज ( sound) ही एक लाट ( wave form ) आहे आणि त्या कंपनासाठी काहीतरी फिरायला ( motion ) हवे. आपली   प्ऋथ्वी जेव्हा फिरायला लागली तेव्हा बिग बँग होऊन मोठ्ठा आवाज आला. आपल्याला अर्थचा आजचा आवाज ऐकायचा असेल इंटरनेटवर असे संकेत स्थळ आहे. त्यावर जावून हा आवाज ओम् सारखा आहे का हे ऐकता येते.( ओम हा आदि नाद आहे असे मानतात. ). हे आवाज जसे "परा" मध्ये येतात तसेच पंचमहाभूतांचे आवाजही त्यात येतात. जे लोक सिनेमात आवाज देतात त्यांना विचारले तर कळेल की भडकलेल्या आगीचा आवाज रिं रिं रिं असा येतो जो शनीच्या मंत्रात ओम र्हिं र्हिं ...असा येतो. मध्यमा मध्ये चित्रांचे/प्रतिमांचे रूपांतर आवाजात होते. अमेरिकेतले एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन ( v s ramchandran)एक ह्यासाठी एक उदाहरण देतात. आपण जर विचारले की किकी व बुबा हे शब्द काय दर्षवतात व दोन चित्रे दाखवली ज्यात एक काटेरी काटेरी व दुसरे ढगाळ ढगाळ असे तर शंभर टक्के लोक काटेरी चित्र म्हणजे किकी असे दाखवतात. हेच मध्यमा मध्ये घडते. आवाजांचे अनुकरण करणारे शब्द असेच चित्र उभे करतात. जसे: कावळा, ककू, गडबड, धडाड, धबधबा वगैरे. अभिनवगुप्त ह्यांचे ह्यावर तंत्रशास्त्र सविस्तर माहिती देते. मंत्रात असेच परिणाम कारक आदि आवाज असतात व त्यांचा अर्थ असतो. आपल्या दळणवळणात ( communication) ७० टक्के आवाज हे शब्द नसतात. जसे: वडिलांनी नुसते हां केले तरी ते चूप बसायला सांगताहेत हे लहान मुलालाही कळते. आवाजांना अर्थ असतो तो असा. असो !

Sunday, September 4, 2016

गुरू साक्षात !

---------------------------
गुरू साक्षात !
---------------------
आपण गुरू का करतो ? ह्याविषयी आजच्या टाइम्स ऑफ इंडियात एक चांगला लेख आला आहे. ( लेखक स्वामी अग्निवेष व थंपू ) . ह्या लेखात महात्मा गांधीजींच्या एका विचाराचे विस्तृतीकरण केलेले आहे. महात्मा गांधींचा विचार असा की, जर योग्य गुरू नसेल तर अर्धाकच्चा गुरू करून आपण आपल्या गळ्यात धोंडा बांधून घेऊ नये. तसा सकृदर्शनी विचार योग्यच आहे. पण आपल्याकडच्या सध्याच्या वातावरणात हा गोंधळ निर्माण करणारा आहे. कसा ?
वारकरी संप्रदायात माळ गुरूकडून घालून घेण्याची परंपरा आहे. कोण असतात हे गुरू ? हे काही मोठे ज्ञानी, तपस्वी असे लोक नसतात तर, आजूबाजूला असलेल्यांपैकी ज्यांनी नियमित पंढरपूरच्या वार्‍या केलेल्या आहेत, जे नेमाने भजन कीर्तन करतात असे रोजच्या व्यवहारात साधारण पदावर वावरणारे हे लोक असतात. ज्यांना भजन करावे वाटते त्यांना हे भजनाचे शास्त्र, परंपरा, जुजबी नियम हे समजावून सांगतात. ज्यांना तुकारामाची गाथा वाचायचीय त्यांना कोणती प्रत घ्यावी, अडले तर त्याचा अर्थ कोठे शोधावा वगैरे अगदी प्राथमिक बाबी हे गुरू सांगत असतात. आसाराम बापू किंवा रजनीश वगैरे बुवांच्या सारखे कोटी कोटी लोक शिष्य असलेले हे गुरू नसतात. तसेच ज्यांनी अशा गुरूंकडून माळ घालून घेतली आहे तेही काही आपले व्यवहार थांबवून ह्यांच्या पायी कायमचे शरण आलेले नसतात. मुख्य म्हणजे वारकर्‍यातल्या ह्या गुरूंचे मोठे आश्रम वा सत्संग होत नसतात. ते बिचारे साधकासारखेच व्यवहाराचा गाडा ओढणारे चारचौघांसारखे असतात. फक्त त्यांनी साधकाची अवस्था पूर्वीच स्वीकारलेली असते किंवा ते एकप्रकारचे ज्येष्ठ साधकच असतात. शिवाय वारकरी संप्रदायात गुरूला शरण जाऊन आपली साधक-अवस्था गुंडाळून ठेवावी अशी प्रथा नसून वारकरी एकमेकांच्या पायाच पडतात. म्हणजे साधनेत कोणी श्रेष्ठ, ज्येष्ठ, वा कनिष्ठ असा भेदभाव असत नाही. निदान प्रथा तरी तशा जोपासलेल्या असतात. त्यामुळे असंख्य भक्तांना आपल्या मर्जीप्रमाणे करायला लावून गडगंज आश्रम उभारणे, श्रीमंती ट्रस्ट निर्माण करणे असे प्रकार वारकरी गुरू करूच शकत नाहीत. मग हे वारकरी गुरू तरी का करतात ?
आम्ही जेव्हा पुण्याला इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये प्रथम राहायला गेलो होतो तेव्हा तिथे प्रत्येक मजल्यावर एक खोली एका सीनीयर स्टुडंट साठी दिलेली असायची. न समजणारे अवघड विषय, कुठले प्रश्न महत्वाचे, कुठले शिक्षक चांगले वगैरे अनेक भेडसावणारे प्रश्न ते नवख्या विद्यार्थ्याला समजावून सांगत असत. आणि हे सगळे त्यांच्यात असून ते साधत असत. वारकर्‍यांचे गुरू हे असेच सीनीयर स्टुडंट सारखेच असतात. वारकरी संप्रदायातले मर्म ते त्यांच्यात राहून, स्वत: साधकच राहून, नवख्यांना सांगत असतात. गुरू म्हणजे मार्गदर्शक व्हावा तो असा सहजी वारकर्‍यात होतो.
त्यामुळे गुरू करूच नये असा विचार करण्याची गरज नाही. किंवा कुठल्याही कायद्याखाली वारकर्‍यांच्या गुरूंना लागलीच अटक करण्याचीही गरज नाही. उलट आपण जे व्यवहारात ज्या ज्या लोकांकडून शिकत असतो ते आपले गुरूच असतात ते पटवणारी ही प्रथा असून आपण असेच एकमेकांना शिकवत एकमेकांचे गुरुत्व करायला हवे. हे खरे साक्षात गुरू !
-------------------------------------------

Friday, September 2, 2016

चला, गाडी गाडी खेळू....

--------------------------------
चला, गाडी गाडी खेळू....
-----------------------
कशावरून कोणाला काय सुचेल ह्याचा काही नेम नसतो. व्यवस्थापनशास्त्रासारख्या रुक्ष विषयातले एक प्रसिद्ध व्यक्ति पीटर ड्रकर ह्यांनी व्यवस्थापनशास्त्रातले निर्णय हे कसे असावेत ह्याबाबत मोटार कार चालवण्यातले निर्णय घेणे, हे उदाहरण म्हणून दिले आहे . भाराभर आकडे व आलेख न मांडता निर्णय कसे चटकन्‌ घ्यावेत हे सांगताना ते म्हणतात, आपल्याला आपल्या गाडीची रुंदी माहीत नसते, रस्त्याची रुंदी माहीत नसते, समोरून येणार्‍या ट्रकची रुंदी माहीत नसते, तरीही आपण अंदाज वर्तवत रस्त्यातून गाडी अलगद काढीत जातो. तसेच भाराभर आकडे जमा न करता केवळ गट-फीलींगने आपल्याला निर्णय घेता यावेत. ( जसे गाडीला जास्त खरचटेल तसे आपले निर्णय जास्त बिनघोर होत जातील ! ).
अशाच प्रकारे चालत्या गाडीला खीळ का घालू नये ? तर प्रथम बैलगाडीला खीळ कशी घालीत ते पाहू. बैल गाडीच्या चाकांना १०/१२ पाती ( spokes ) असतात. जिथे चाक फिरते त्याच्या जवळ गाडीच्या खाली एक आडवे दांडके असे, जे बाहेर सरकवले की गाडीच्या चाकाला "खीळ" बसून चाक चक्क जाम होई. पण हे करताना ते दांडके क्षणात बाहेर काढणे जरूरीचे असते. नसता ते नुसतेच चाकाला घासत राहते व खीळ बसत नाही. असेच कुठल्याही चालत्या संस्थेचे असते. तिला पटकन्‌ दांडके घालून खीळ घालू म्हटले तर ते शक्य होत नाही. मग तिला हळू हळू ह्या ना त्या प्रकारे ब्रेक लावत आधी वेग मंदावावा लागतो. किंवा मग तिचा वेग कायम ठेवून तिची दिशा थोडी बदलणे हे जास्त सोपे होते व त्याने अपघातही टाळता येतात. जेव्हा गाडीचे ब्रेक निकामी (फेल) होतात तेव्हा असेच करावे लागते व तज्ज्ञ लोक तर सांगतात की दुसरी एखादी उभी गाडी पाहून चक्क तीवर ठोकर द्यावी. ह्याच न्यायाने जर चालत्या गाड्याला खीळ घालणे दुरापास्त असेल व अपघात करून का होईना गाडा थांबवायचा असेल तर मग "शीळ" वाजवत गाड्याला अजून वेगाने जायला प्रोत्साहन देत, अपघाताला उद्युक्त करणे, हाही एक मार्ग होऊ शकतो. पण जरा दुष्ट !
---------------------------------------