Thursday, February 10, 2011

अरुणोदय झाला---१५
बनाना रिपब्लिक
जरा कुठे गोंधळ, गडबड, माजली की आजकाल हमखास शब्द वापरला जातो की हे कायद्याचे राज्य आहे का "बनाना रिपब्लिक"? काय आहे बनाना रिपब्लिक ?
बनाना म्हणजे केळी. केळी नेहमी घडात असतात. घड आठ दहा डझनांचा तरी असतो. एकटे केळ घडात असते तोंवर बिनधोक असते. एकटे पडले की ते सोलल्या जाते, खाल्ल्या जाते. ह्याच मानसशास्त्राचा अवलंब करून बरीच राज्ये अशी चालविली जातात की खरे राज्य लष्कराच्या एका प्रमुखाचे असते. बाकी लष्कर-प्रमुख त्याला मदत करतात, एकी ठेवतात. जणु केळ्यांचा घडच. ते त्यांच्यातल्या कोणाला एकटे न पडू देता आपला कार्यभाग साधतात. सर्व नीती, वागणे असे असते की सगळे एकमेकाला साह्य करीत व्यवस्था चालू ठेवतात.
अमेरिकेत पूर्वी केळी जमेकाहून, ग्वाटेमाला, होंडुरास इथून येत. ह्या केळींच्या निर्यातीवरच तिथले राज्य चाले. ह्यात मग जमीनदार लोक महत्वाचे असत. ७५ टक्के जमीन एक दोन टक्के लोकांकडे असे. बहुजन शेतकरी अगदी नगण्य जमीनीचे मालक असत. केळीची लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणात होई. त्यासाठी जमीनदार वर्ग ठरवील तसे सरकार वागे. हा व्यवहार इतका प्रचंड व महत्वाचा झाला की अमेरिकेने हे जमीनमालक रशियन-धार्जिणे होऊन त्यांना मिळतील असे दाखवून ग्वाटेमालाचे राज्य उलथूनही पाडले होते.
अमेरिकेचा एक लेखक ओ.हेनरी ह्याने प्रथम त्याच्या कथांत बनाना रिपब्लिक हा शब्द वापरला होता. नंतर प्रसिद्ध नोबेल पुरस्कार-प्राप्त कवी पाब्लो नेरुदा ह्यांनीही "बनाना" नावाची प्रसिद्ध कविता लिहिली होती.
सगळा देश मिळून शेतीचा व्यवसाय करतोय, त्याचे उत्पन्न येईल ते म्होरके लोक आपापसात वाटून, लुटून घेतात, व देशाला जे कर्ज वगैरे होते त्यात मात्र त्यांचा सहभाग नसतो, असे बनाना रिपब्लिकचे धोरण असते.
सध्याच्या घोटाळ्यांच्या संदर्भात, शेतकर्‍यांच्या कष्टानंतरही होत राहणार्‍या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, व हताश कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीला पाहून आपले "बनाना रिपब्लिक" कधी होतेय ह्याची चिंता आहे का ? काय म्हणता ? झालेय आधीच !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com