Wednesday, March 23, 2016

चला “वेगळे” होऊ या !
सगळ्यांच्या रंगात एकरंग होऊन झाले की मग आपला रंग “वेगळा” असावा असे वाटायला लागते. हे म्हणजे एक प्रकारे लपाछपी खेळल्यासारखे आहे. लपायचे असले की आजूबाजूच्या रंगात मिसळून जायचे व कंटाळा आला, जेलस्  झाले  की “वेगळे” व्हायचे.
“वेगळा” हा शब्दच वेगळा आहे. ह्यात गळ्यात गळे घालून एकत्र नांदणे दर्शविणारे “गळा” आहे, तर झटक्यासरशी वेगळे कसे व्हावे हे सांगणारा “वेग” आहे. शिवाय “वे” ह्या संस्कृत अक्षराने वेणीची वीण वा वेणीचे पेड हे कसे एकमेकात गुंतलेले असतात ( वेगळे नसतात ) तसे हे गळ्याशी कसे गुंतलेले आहे ते दाखवणारे एकजीवपण आहे. आणि तरी हे “वेगळे”पण आहे !
मराठवाडा पहिल्यांदा निझामाच्या हैद्राबाद राज्यात होता. तिथे तेलुगु, कानडी व उर्दू ह्यांची चलती. मराठी लोकही नेहमी उर्दू बोलत. मराठीला लपून राहावे लागे. मग महाराष्ट्रातल्या मराठीची जेलसी वाटायला लागली, हे लोक कसे मराठी नाटके बघतात, मराठी कार्यक्रम करतात वगैरेचे आकर्षण वाटू लागले, हैद्राबाद पासून वेगळे व्हावे असे वाटू लागले.
झालो वेगळे, तर काय गंमत इथली वऱ्हाडी मराठी वेगळी, पुण्या-मुंबईची मराठी वेगळी असे बारकावे आता ठळक जाणवू लागले, त्यांची प्रगती डोळ्यात खुपू लागली, जेलसी वाटू लागली. त्यांच्याबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलो खरे, पण हाती काही लागले नाही, असे दिसो आले. आता वाटायलय, नग, वायलच बर !
बा म्हणायचा ब्रिटीषच बरा होता. तर मग आता त्यानं स्वातंत्र्य सैनिक बनून आणलेलं स्वातंत्र्य परत कराव का ? आणावं का पारतंत्र्य ? पारतंत्र्यात निदान मला पारतंत्र्य-सैनिकाची पेन्शन तरी गावल !
तसच, परत जावं का निझामाच्या राज्यात ? नकोच हे इथलं विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व त्यांची प्रगती. आंध्र व तेलंगण काय टपलेले आहेतच. सहज घेतील एव्हढे पाच जिल्हे ! उर्दू तर आपल्याला येतेच !
चला “वेगळे” होऊ या !

--------------------------------------  

No comments:

Post a Comment