Tuesday, October 18, 2011

मु.पो.कुसुमाग्रज व भाषांतराचे पक्षी:
फारा वर्षानंतर एका अभिजात कार्यक्रमाला जायला मिळाले. दि.१५ आक्टोबरला ( २०११) यशवंतराव चव्हाण सभागृहात कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे कुसुमाग्रजांच्या कवितांवर कवी सौमित्र ( नट, किशोर कदम) व गुलजार ह्यांच्या कवितावाचनाचा हा कार्यक्रम होता. खालचे प्रेक्षागृह भरल्याने वरच्या बाल्कनीत बसावे लागले. अर्थात बाल्कनीही भरली हे या कार्यक्रमाचे दिसणारे यशच.म्हणतात की हा चौथाच कार्यक्रम होता आणि असे बरेच व्हावेत असे वाटावे इतका ह्रद्य !
स्टेजवर गुलजार व कुसुमाग्रजांचे भव्य चित्र, आणि दोन पोडियम्स इतकाच नेटका रंगमंच होता व तो फारच प्रभावी जाणवत होता. प्रेक्षकात डॉक्टर जब्बार पटेल, गुरू ठाकूर व मुंबईच्या धकाधकीतून निवांतपणा काढणारे रसिक होते. कवी सौमित्र कुसुमाग्रजांची कविता अतिशय भावोत्कटतेने वाचीत व नंतर गुलजार त्याचे हिंदी-उर्दूतले भाषांतर पेश करीत, काही स्पष्टिकरणेही देत. असे एका भाषेतले कवितेचे पक्षी मु.पो, कुसुमाग्रज ह्या कवीच्या गावाहून भरारी घेत गुलजार ह्यांच्या कवितेच्या गावी सुखेनैव पोंचत व दोन्हीही कवी किती प्रचंड ताकदीचे होते त्याचा प्रत्यय येई. मध्ये मध्ये सौमित्र त्यांना काही कविताविषयक, सृजनविषयक, तत्वज्ञानविषयक प्रश्न विचारीत व त्यांची चपखल उत्तरे तितक्याच लीलया गुलजार देत. असा मन खिळवून टाकणारा हा कार्यक्रम फारच वेधक झाला. अखेर गुलजार म्हणाले तसे, अनेक कवींचे मुशायरे टाळून एकाच कवीची कवने व तिची भाषांतरे ह्यांचा मरातब करणारी ही मराठी अभिरुची त्यांना तसेच प्रेक्षकांना अपार भावली.
कवितांच्या निवडीबद्दल सौमित्रांचे, अमृता सुभाष ह्यांचे अवश्य अभिनंदन करायला हवे. कारण कुसुमाग्रजांची आपल्या मनात असलेली प्रतिमा गर्जा जयजयकार, पृथ्वीचे प्रेमगीत, आगगाडी व जमीन, जालीयनवाला बाग, जा जरा पूर्वेकडे, वेडात मराठे वीर दौडले सात, टिळकांच्या पुतळ्याजवळ वगैरे शालेय जीवनात भेटलेल्या शिरवाडकरांना ( कुसुमाग्रज) दाट ओळखीची होती. त्यात समकालीन कवी जी जीवनावरची, नात्यांवरची, मृत्यूवरची तत्वज्ञानात्मक भाव-कवने रचतात तशाच कविता निवडून त्यांची भाषांतरे पेश करण्याने एका ज्ञानपीठ विजेत्या कवीची भारदस्त बाजू पहायला मिळाली. शिवाय मूळ कवितेचे लगेच भाषांतर पेश करण्याने ती कविता मनावर चांगली पक्की कोरल्या जायची हेही वाखाणण्यासारखे झाले. कविता वाचनाच्या निमित्ताने सृजनाचे व आयुष्याच्या तत्वज्ञानाचे जरा रंगतदार दर्शन झाले. मृत्यूबद्दल सौमित्रांनी विचारलेल्या प्रश्नावर गुलजारांनी एक काव्यमय कल्पना सांगितली. त्यांना मृत्यू आजाराने शय्येवर यायला नको आहे, क्षणात चिंध्या करणार्‍या अपघाताने यायला नको आहे, तर कविता लिहिता लिहिता पेनमधली शाई संपून जावी तसा यायला हवा आहे. कवी गुलजारांची भाषांतरे चपखल तर होतीच, शिवाय एका थोर कवीने दुसर्‍यासमोर किती प्रांजळपणे नतमस्तक व्हावे ह्याचा आदर्श दाखविणारी होती. त्यांच्या एका कवितेवर प्रेक्षकांची दाद आल्यावर ते म्हणाले की ही दाद मूळच्या कुसुमाग्रजांना आहे ! केव्हढी ही विनम्रता व किती देखणी !
आजकाल आपल्याच नात्यांबद्दल विमनस्क करणारी भावना दाखवणारी एक कविता मोठी बोलकी होती. कवीने मोठ्या मशागतीने रोप लावले आहे व त्याची निगराणी केली आहे. पण आता ते झाड उन्हपावसात बहरत असताना कवीला आता त्याच्याशी संबंध तुटल्यासारखा वाटतो आहे. आणि तरीही तो म्हणतो की हे बहरणे, निसर्गाचे कवतिक वगैरे त्या झाडाच्या मुळांतून जमीनीच्या कुशीत जाणारे आहे. आजकालच्या पोटच्या मुलांना अंतरणार्‍या पालकांना ह्या कवित्तेचे तत्वज्ञान क्षणभर हेलावून सोडते. तसेच म्हातारपणी एकटेपणाचे दु:ख सोसणार्‍या पुरुषांची व्यथा कवीने सात चमच्याच्या स्टॅंड ह्या हलक्या-फुलक्या वाटणार्‍या कवितेने छान रेखाटली आहे. घरची मालकीण असती तर तिच्या देखरेखीत सातवा चमचा हरवला नसता ह्या अगदी सोप्या, घरगुती निरिक्षणाला पुष्टी देत जेव्हा कवी म्हणतो की तर मग मीही हरवलो नसतो, तेव्हा एकटेपणाची हळहळ साक्षात समोर उभी राहते. ह्या कवितेच्या भाषांतरादरम्यान गुलजारांनी एक छान उत्तर दिले. सौमित्रांनी विचारले होते की तुम्हाला निसर्गाच्या रूपांचे सुचते कसे ? त्यावर गुलजार म्हणाले की निसर्गाचे सोडा, इथे कुसुमाग्रज तर निर्जीव अशा चमच्याच्या स्टॅंडला जिवंत करीत आहेत ! सृजनाला अजून वेगळी दाद ती काय असावी ? सृजनाबाबत एक कवी म्हणून सौमित्रांना कुतुहूल असणे स्वाभाविक. मग ते विचारतात की तुम्ही चालीवर गीते कशी लिहिता. ह्यावर ते सांगतात की दोनशे वर्षांपासून अशीच रीत चालत आली आहे. प्रक्रीया समजली नाही पण रीत अशीच हे उमगले.
कुसुमाग्रजांच्या ज्वलंत राजकीय उपरोधाची खूण पटविणारी एक कविता, महात्मा गांधींच्या सरकारी भिंतींवर टांगले असण्याची, नेहमीप्रमाणे भरघोस दाद मिळवती झाली. शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दु:खाची किंवा कंगालपणाची खिल्ली न उडवता त्याचा मानमरातब ( डिग्निटी ) कुसुमाग्रज "कलोजस" ह्या कवितेत कसा सांभाळतात ते गुलजारांनी कवितेच्या भाषांतरात अप्रतीमपणे बोलून दाखविले. कुर्ल्याच्या चाळीत एका बंदिस्त खोलीत त्या गरीबाला, कंदिलात, एका सूर्यनारायणाचे कसे दर्शन होते व तो कलोजस कसा घनगंभीर होतो हा अनोखा रसास्वाद गुलजार इथे आपल्याला शिकवून जातात. पुराने घर खचले तरीही उभारीने, ताठ कण्याने, लढणार्‍या शिष्यावरची कविता "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा" ह्यात गुलजार कुसुमाग्रजांचे नेमक्या व मोजक्या शब्दात चित्र उभारण्याचे कसब आवर्जून दाखवतात. "बायको मात्र वाचली" एवढे म्हणण्याने बाकीची हलाखी आपल्यापुढे साक्षात उभी राहते असे जेव्हा गुलजार निदर्शनास आणून देतात तेव्हा एका कवीचे रसग्रहण कसे असते त्याचा नमूनाच पहायला मिळतो.
कवी सौमित्र म्हणजेच कसलेले नट किशोर कदम व गुलजार हेही थेटर सिनेमातले, व कुसुमाग्रजही थोर नाटककार, तेव्हा नाटकावरची कविता नसती तर चुकचुकल्यासारखे झाले असते. "नट" नावाची एका नटाच्या अखेराची अप्रतीम कविता अशीच रंगते. रिकाम्या प्रेक्षागृहात रिकाम्या खुर्च्यांकडे प्रयोगाअंती पहात हा नट आशा करतो की जे प्रेक्षक माझी स्मृती घेऊन गेले आहेत त्यांच्यात अंशा अंशाने तरी मी वाटला गेलो आहे ह्याचे मला समाधान आहे. अशा कार्यक्रमानिमित्त धावपळीतल्या रसिकांना थोर कवींचे अंश अशाच रितीने आपल्यात झिरपले असावेत अशी सुखद जाणीव होते, जी "मु.पो.कुसुमाग्रज, भाषांतराचे पक्षी" ह्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मिळणारी पोचपावतीच आहे जणु.

------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

Wednesday, July 27, 2011

---------------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला----२४
हीना रब्बानी खार !
भारतीय माणूस, मग तो मुस्लिम असो वा हिंदू, पाकीस्तानवर जरा खार खाऊनच असतो. पाकीस्तानशी बोलणी करताना त्याला नेहमीचे सर्व हातखंडे पाठ झालेले असतात. आम्ही मुंबई हल्ला काढला की त्यांनी समझौता एक्स्प्रेस काढायची, आम्ही घुसखोर काढले की त्यांनी बलुचिस्थान मध्ये होणारे हल्ले काढायचे. काश्मीर तर नेहमीचाच प्रश्न असतो. तशात पाकीस्तानने हीना रब्बानी खार ह्या ३० वर्षीय सुंदरीला परराष्ट्रमंत्री म्हणून भारतात पाठवावे हा खरेच एक मास्टरस्ट्रोक म्हणता येईल अशी चाल आहे. आणि त्यात एक प्रकारचे अप्रतीम काव्यही आहे. कसे ? अहो, ज्या पाकीस्तानावर आपण कायम खार खाऊन असतो त्यांनी त्यांचा परराष्ट्रमंत्रीच "खार" नावाचा पाठवावा ? म्हणजे हे अगदीच जशास तसे झाले !
शिवाय नेमेचि येतो मग पावसाळा सारख्या नेमाने होणार्‍या शांततेच्या बैठकी किती कंटाळवाण्या व्हायच्या. आणि आता पहा बरे ! बाईंवरून नजर हटत नाही इतके सौंदर्य ! किती माफक आणि भारी साजश्रृंगार ! १७ लाख रुपायांची म्हणे नुसती पर्स आहे. बिर्किन्स नावाच्या ब्रॅंडची आणि गॉगलही काय सुरेख, डोळ्यांना म्हटले तर लपवणारा, म्हटले तर खुलवणारा ! उंचनीच बाई, बोलतेही किती आर्जवी ! पाकीस्तानचे आता ऐकायला हरकत नाही !
आता भारतानेही ह्यापासून धडा घ्यायला हवा व आपला परराष्ट्रमंत्री असाच देखणा ठेवायला हवा. जर शशी थारूर ह्यांना परत आणू शकत नसतील तर त्यांची नववधू सुनंदा पुष्कर ही ह्या हीनाला तोडीस तोड होईल ! राहूलने स्वत: जरी अजून लग्न अथवा नारीवलय जवळ केलेले नसले तरी जरा देखणे लोक राजकारणात ठेवावेत म्हणजे आपल्या देशाचा टीआरपी जरा तरी वाढेल. हिलरी क्लिंटन बाईंचे नित्यनूतन बदलणारी केशभूषा पाहून सोनियांनीही जरा स्फूर्ती घ्यायला हरकत नाही.
माणसांचा तसाच देशांचा मूळ स्वभाव काही जाता जात नाही म्हणतात. पाकीस्तानाचा स्वभाव पहिल्यापासूनच उलटे बोलण्याचा, उलटे करण्याचा आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. मग ह्या "हीना रब्बानि खार" बाईला नेमताना त्यांच्या मनात नेमके उलटे नसेल ह्याचा काय भरवसा ? काय असेल ह्या बाईच्या उलटे ?--- हीना रब्बानि खार--ह्याच्या उलटे काय होते बरे ? अरेच्चा ! ते होते : रखा निब्बार नाही ! निब्बर नाही म्हणजे मऊ आहे, हेहि चांगलेच आहे म्हणायचे ! उलटे अथवा सुलटे बाईच जिंकते की !

-------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, July 13, 2011

कवितांच्या प्रतिमा--प्रतिमांच्या कविता
कै.पु.शि.रेगे ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताच्या अंकात ( कविता-रती मार्च-जून २०११ ) प्रा.गंगाधर पाटील ह्यांचा एक "गाणारं झाड" नावाचा रेगे यांच्या आठवणींवरचा लेख आहे. त्या लेखात त्यांनी रेगे ह्यांना कशा काही कविता "दिसत" असत व ते लगेच त्या टिपून घेण्यासाठी रात्री उशाशी कागद-लेखणी ठेवीत असत असे सांगितले आहे. चक्क दिसलेली कविता व जोडून मोडून केलेली कविता ह्या संबंधी आपल्याला नेहमीच कुतुहूल असते. काही प्रमाण असो वा नसो, एक असे वाटत असते की जी कविता अशी "दिसते" ती दैवीच म्हणावी लागेल. ( मराठीतल्या विदुषी दुर्गा भागवत ह्या ग्रेस ह्यांच्या कवितांना असेच विशेषण लावीत. ). अशा दैवी कवितात कोलेरिज ह्यांच्या "कुबला-खान" ह्या शंभर ओळींच्या कवितेला सर्वात उच्च स्थान असावे, कारण ती म्हणे त्यांना शीर्षकासह दिसली होती. ह्यावर लगेच इस्लामवादी म्हणतील की मोहमंद पैगंबराला अपरिचित अशा भाषेत ज्या कविता दिसल्या ( म्हणजे आजचे कुराण ) त्यांनाच हे स्थान द्यावे, कारण त्या नुस्त्याच टिकल्या नाहीत तर त्यामागे आज एव्हडी प्रचंड संस्कृती उभारलेली आहे .
महाराष्ट्र काव्यभूषण श्री.मंगेश पाडगावकर सांगतात की त्यांना अकस्मात कवितेची एक ओळ सुचते व ती बरेच दिवस त्यांचा पिच्छा पुरवते व मग ते त्या ओळीतल्या भावनेनुसार त्याची चारोळी, वात्रटिका, गजल, सुनीत, भावगीत, गीत किंवा कविता अशी कलाकृती करतात. त्यांना प्रसंग, चित्र, देखावा दिसतो असे ते म्हणत नाहीत. कवी ग्रेस ह्यांना मात्र रात्री अपरात्री देखावे, दृश्ये दिसतात व त्यांच्या ते कविता करतात. असेच पु.शि.रेगे ह्यांना प्रसंग, देखावे दिसले व त्यावर त्यांनी कविता रेखल्या असे प्रा.गंगाधर पाटील ह्यांनी मांडले आहे. शास्त्रीय ( मेंदू बाबत ) दृष्टीने माग काढला तर असे आढळते की आपल्या मेंदूत विचार करण्याची काही कळच नाही.आपण एक तर साठवलेल्या आठवणी माघारी काढू शकतो किंवा येत असलेले अनुभव अगोदर असलेल्या अनुभवांशी पडताळून त्यांना योग्य कप्प्यात साठवू शकतो. पण आपल्याला स्वप्ने पडतात, चित्रे दिसतात हे तर नाकारता येतच नाही. स्वप्ने वा चित्रे दिसणे हे आपल्या मेंदूला खूपच सोयीचे आहे. कारण चित्रांऐवजी येणारे विचार जर शब्दात आले असते तर एखादे स्वप्न वाचायला आपल्याला कैक दिवस लागले असते. ( आपला लिहिण्याचा वेग असतो ४०/५० शब्द दर मिनिटाला, तर वाचण्याचा वेग असतो ८०/९० शब्द दर मिनिटाला. मनात वाचण्याचा वेग असतो १५०/१६० शब्द दर मिनिटाला. ) त्या मानाने अनेक शब्द लागणार्‍या वर्णनाचे एक चित्र ( फ्रेम ) धरले तर आपल्या पाहण्याचा वेगच असतो २४ फ्रेम्स दर सेकंदाला. म्हणजे क्षणात आपण कित्येक शब्दांचे चित्र ( फ्रेम ) वाचू शकतो, पण चित्राच्या भाषेत. आता ही चित्रेच म्हणजे प्रतिमा, असे धरले तर, ज्या कवींना कविता दिसतात असे मानले तर कवितेतल्या प्रतिमा ह्याच त्यांना दिसलेल्या प्रतिमा असे होईल. त्या प्रतिमा आपणही त्यांच्या कवितेतून पाहू शकतो.
नेमकेपणासाठी आपण पु.शि.रेगे ह्यांचीच अशी कविता-रतीने ह्या अंकात छापलेली ( मुखपृष्ठामागे ) एक कविता घेऊ :
पक्षी गात नाही
आपल्या सीमांची कक्षा घोषित करतो.

सिंह डरकाळ्या फोडीत नाही
आपली हुकुमत कुठं कुठं आहे ते बजावून सांगतो.

हत्ती झाडांना अंग घाशीत नाही
आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवून देतो.

मी कविता करीत नाही
माझ्या मनाची आणि तुझ्या धांव घेतो.

ह्या कवितेतल्या प्रतिमांची ( कवीला दिसलेल्या चित्रांची ) जंत्री केली तर तीत अशी चित्रे दिसतात : १) गाणारा पक्षी २) डरकाळ्या फोडणारा सिंह ३) झाडांना अंग घासणारा हत्ती ४) कविता करणारा कवी ( मी ) ५) पक्षी सीमा घोषित करतो आहे ६) सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय ७) हत्ती आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवतोय ८) कवी आपल्या मनाची व प्रेयसीची धांव घेतोय. ह्यातील १) ते ४) ही चित्रे अगदी सरळ-साधी चित्रणे आहेत तर ५) ते ८) चित्रे ही पहिल्या गटातील (१ ते ४) चित्रांचा अर्थ लावणारी चित्रे आहेत. सकृदर्शनी कवीने नुसती चित्रे सादर केली आहेत असे दिसते. पण जरा काळजीपूर्वक पाहिले तर प्रत्येक चित्रावर त्याने आपला तर्क चालवलेला आहे व त्याचा अर्थ दिला आहे असे दिसेल. जसे: गाणारा पक्षी नुसते गात नाहीये तर तो आपल्या सीमा घोषित करतो आहे. डरकाळ्या फोडणारा सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय. झाडांना अंग घासणारा हत्ती आपल्या वावर-प्रदेशाच्या खुणा ठरवतोय. कवी कविता करीत नाहीय तर त्याच्या मनाची व प्रेयसीची धांव घेतो आहे.
कोणाही जाणकार प्राणी-मित्राला विचारले तर सिंहाचे, हत्तीचे ( एव्हढेच काय कुत्र्यांचेही ) हे आपली सत्ता-प्रदेश इतरांना दाखवून देण्याचे प्रघात आहेत, असे कळेल. म्हणजे हे नैसर्गिक आहे हे ठाम झाले. इथे कवी क्रमा क्रमाने आपल्याला ह्या तर्काला बांधून शेवटाला घेऊन जातो व म्हणतो की असेच माझी कविता ही कविता नसून तुझे व माझे प्रदेश दाखवणे आहे. शिवाय हे किती नैसर्गिकही आहे, सुंदर आहे. हे रेगे ह्यांचे प्रामाणिकपणे आपल्याला दिसलेल्या चित्रांचे दाखवणे आहे की नेटाने तर्क लढवून कविता ही त्यांच्या व प्रेयसीचे प्रदेश दाखवणे आहे हे पटवणे आहे ? आता ही काही लबाडी म्हणता येणार नाही. प्रख्यात विदुषी मार्जोरी बोल्टन ह्यांच्या "ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या पुस्तकातल्या "इंटेलेक्च्युयल फॉर्म:द टू मेन पॅटर्न्स ऑफ इमेजरी" ह्या प्रकरणातले हे वाक्य पहा (पृ.११२ ) : "तर्कसंगती हे जागृत मनाचे लक्षण आहे व भावनेच्या विरोधी आहे. श्रेष्ठ कवितेत भावनेचा भडिमार असून त्याचबरोबर सुसंबंद्ध आंतरिक तर्कही असेल. तर्काची सुसंगती ही चांगल्या कवितेच्या रचनेचा महत्वाचा भाग असतो, व तो प्रतिमांच्या अनाकलनीय परिणामांपेक्षा जोरदार असतो. " ह्या अंगाने, प्रत्येक प्राणीमात्र आपल्या वावर-सत्तेच्या प्रदेशाच्या खुणा दाखवीत असतो, हे ह्या कवितेतल्या तर्कामागचे मूलसूत्र होते.
प्रत्येक संबंधात (रिलेशन) त्यातल्या घटकांना आपला स्वतंत्र प्रदेश ( स्पेस ) लागतो हे आता जवळ जवळ मान्यच झाले आहे. ह्या स्वतंत्र वावराला वाव मिळाला नाही तर संबंध विकोपाला जातात हे कोणत्याही कौटुंबिक कोर्टात न जाताही आपण मान्य करू इतके ते पटण्याजोगे आहे. असे असताना कवीने असे जर म्हटले असते की माझ्या कवितेत तुझे प्रदेश व माझे प्रदेश असे मी दाखवतोय तर ते ह्या तर्क-संगतीची पुढची कडी झाले असते. रेगे ह्यांच्या वैयक्तिक चरित्रातही ते रास्त ठरते. जसे : बायको सरिताबाईंचा एक प्रदेश, जर्मन प्रेयसी केठ ह्यांचा एक प्रदेश, मुलाबाळांचा एक प्रदेश, मित्रांचा एक वगैरे. पण ते जेव्हा शेवटच्या ओळीत म्हणतात की माझ्या कवितेत मी माझ्या मनाची व तुझ्या ( मनाची ) धांव ( ओढ ) घेतोय तर ते ह्या प्रादेशिक रचना करण्याच्या तर्काविरुद्ध जाते. प्रियकर प्रेयसी ह्यांचे मनोमीलन हे रोमॅंटिक व आदर्श खासच असते पण मग त्यासाठी सिंह, हत्ती हे आपले वेगळे प्रदेश करतात ( इतरांपासून ) ही तर्काची दोरी रास्त ठरत नाही.
कवी भले म्हणो की मी माझ्या मनाची व तुझ्या मनाची धांव घेतोय पण वाचकरूपी तिसर्‍या अंपायरला विचारलेत तर तो धांव-चित ( रन-आऊट) झालाय असाच निर्णय द्यावा लागेल. कारण ह्या कवितेत केवळ प्रतिमांचा खेळ असता, नुसती पक्षी, सिंह, हत्ती ह्यांची चित्रे असती, तर कसल्याही निर्णयाचे कवीचे म्हणणे चालले असते. त्याला समीक्षकांप्रमाणे वाचकही अप्रतीम म्हणते झाले असते. पण ह्या कवितेत तर्क हीच मोठी प्रतिमा आहे व शेवटचे चित्र हे तर्क-विसंगत ठरते !

----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

-----------------------------------------------------

Sunday, June 5, 2011

-------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला----२२
अलिप्त नग्नता
नग्नता ह्या विषयाला नागडे उघडे करण्याबद्दल श्री. संजीव खांडेकर ह्यांचे अभिनंदन करायला हवे ( संदर्भ: लोकसत्ता : दि.५ जून२०११ "अलिप्त नग्नता" हे जाणीवा सदरात आलेले स्फुट )
लेखाचे नाव जरी "अलिप्त नग्नता" असले तरी समाजात जागोजागी भेटणारा ( समाज-लिप्त ) हा विषय आहे, हे दाखविण्यासाठी श्री.खांडेकर क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान एका मॉडेलने भारत जिंकला तर मी नागडी होईन असे म्हटले होते ह्या बातमीची आपल्याला आठवण करून देतात. योगायोगाने त्याच दिवशीच्या टाइम्स ऑफ इंडियातली अजून एक बातमीही ह्या विषयाची व्याप्ती अधोरेखित करणारी आहे. बातमी अशी :लंडनच्या वुरसेस्टर कॉलेजच्या लायब्ररीत म्हणे ४० मुलामुलींचा एक ब्रेकफास्ट क्लब आहे, जो दुपारी ३ ते ४ दरम्यान नग्नतेचा ( स्ट्रिपिंग ) प्रयोग करतात. त्यावर लायब्रेरीयनने बंदी घातली. कारण ह्याने इतरांचे लक्ष विचलित होते व हे विनापरवाना कृत्य आहे. त्यावर ह्या विद्यार्थ्यांचे म्हणणे की ही इथली परंपरा आहे व ह्याने कंटाळा टळतो व गर्मीपासून सुटका होते. वाद कसलाही असला तरी नग्नता हा विषय केवळ कल्पनेतला नसून सर्वव्याप्त आहे एवढे तरी ह्या बातमीने ठसते.
नग्नतेचे तात्विक चिंतन वा समर्थन करण्यासाठी श्री.खाडेकर ज्या फ्रेंच तत्ववेत्त्याचा ( जॅकस्‌ लाकान्‌ Jacques Lacan ) उल्लेख करतात ते संभ्रम निर्माण करणारे आहे. हे ह्या लाकान्‌ महाशयांच्या एकूण चरित्राला साजेसेच म्हणावे लागेल . ( कारण फ्रॉईडचे शिष्यत्व पत्करूनही त्यांना फ्रॉईडवाद्यांनी बहिष्कृतच केलेले होते.). खांडेकर म्हणतात तशा "गेझ"चे नव्हे तर "मिरर स्टेज"चा निर्देश लाकान्‌ करतो. तो नेणीव हेच वास्तव असे मत मांडणार्‍या फ्रॉईडचा शिष्य असला, तरी त्याला, ईगो हा एक भ्रम आहे, नेणीवेतून तयार झालेला आहे, असे "मिरर स्टेज"च्या उदाहरणाने दाखवायचे होते. मुलाच्या विकासातला महत्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा मूल स्वत:ला ओळखायला लागते तो. त्याच "मिरर स्टेज" बद्दल तो म्हणतो, की सहा महिन्याचे मूल, जेव्हा त्याचा त्याच्या शारिरिक अवयवांवर अधिकारही चालत नसतो, आणि ते जेव्हा आरशात पाहते व स्वत:ला त्या प्रतिबिंबात ओळखते तेव्हाच त्याची स्वत्वाची जाणीव ( ईगो ) निर्माण होते. प्रतिबिंब म्हणजे ते मूल नसते . तो त्याचा भ्रमच असतो असे लाकान्‌ आपल्याला सांगतो. त्याला तो "मिस-रेकॉग्निशन" असेही म्हणतो. हे असे का होते ह्याचे समर्थन तो नेणीव ही भाषाशास्त्राच्या अंगाने स्वची जाणीव करून घेते असे दाखवतो. ( पहा: आधुनिक समीक्षा-सिद्धान्त ले: मिलिंद मालशे, अशोक जोशी पृ.२२६ ते २२९ ) आणि इगो हा भ्रम आहे असे मानतो.
ह्याचा नग्नतेशी काय संबंध पोचतो असे कोणालाही वाटू शकते. कदाचित आपले शरीर म्हणजेच आपण, असे ईगोला वाटणे हेच ह्या नग्नतेच्या जाणीवेच्या मुळाशी असावे. एका गोष्टीने हे स्पष्ट करता येईल. गोष्ट अशी : एका नर्तिकेला गौतम बुद्धाची सेवा करावी असे मनात येते. तिचा पेशाच असल्याने कामुक नर्तन करणे एवढेच तिला अवगत होते. गौतम बुद्ध तयार होतात. ती त्यांच्या पुढ्यात नाच करू लागते. करता करता ती एकेक कपडा अनावृत्त करीत जाते ( म्हणजे स्ट्रिपिंग हो, ). संपूर्ण नग्नावस्थेत जाऊन नर्तन झाल्यावर ती थांबते. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की का थांबलीस ? ही जी तुझ्या शरीरावरची चामडी आहे तीही, कपडयासारखी उतरवून टाक ना ! आपल्या गीतेत नाही का सांगत की शरीर जीर्ण झाले की जुन्या कपडयासारखे आपला आत्मा ते बदलतो व नवीन शरीर धारण करतो. आपले शरीर म्हणजेच आपण, असे वाटणे हेच ह्या नग्नतेच्या जाणिवेच्या मुळाशी आहे, ते असे.
बाजारपेठेतला नग्नतेचा भाव व कदाचित त्या भावाचे घसरणे ह्या बद्दलचे विवेचन मात्र खांडेकरांचे अचूकच आहे. ह्या बद्दल माझा स्वत:चा एक अनुभव सांगण्यासारखा आहे. आज २० वर्षांपूर्वी मी नोकरीनिमित्त वेस्ट ईंडीज येथे चार वर्षे होतो. तिथे मुक्त अमेरिकन संस्कृती नांदत होती, व ५० टक्के लोक भारतीय वंशाचे होते. पण ते वेशभूषेत अगदी पाश्चात्यच असत. भारतातून नुकत्याच तिथे गेलेल्या आमच्या साडीतल्या बायका पाहून त्यांना खूपच गंमत वाटे. शरीराचा जो भाग भारतीय साडी झाकते तो त्यांच्या पोशाखात उघडा असे, तर ते जो भाग झाकीत ( साडीतला ओटीपोटाचा भाग, बेंबी वगैरे ) तो भारतीय साडी बिनदिक्कत उघडा ठेवी. हे त्यांना फारच सेक्सी वाटे. ह्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करू लागलो तेव्हा आमच्या बायकांनीही साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली. आता तो त्यांना नॉर्मल वाटू लागला. अगदी क्लीव्हेज दिसले तरी ! शेवटी सौंदर्य काय आणि नग्नता काय, ही पाहणार्‍याच्याच दृष्टीत वसते नाही का ? ( मी एकदा माझ्या दोन वर्षाच्या नातवाबरोबर गाण्याच्या सीडीज घेत होतो. चित्रात ऐश्वर्या राय हिची एक मादक पोज होती . माझी नजर, "जशी पाप्याची नजर वळावी, अनोळखीच्या वक्षावरूनी " फिरत होती, तेव्हाच माझा नातू मला दाखवत होता व त्याला तेव्हा अवगत असलेल्या शब्दात म्हणत होता, "अजोबा, नाईस दुदू नो ?").
असेच आपण कोणत्या वेळी कोणता दृष्टिकोण ठेवतो, त्यावरही नग्नतेची श्रेणी अवलंबून असते. ह्याचे उदाहरण असे : माझी मुलगी अमेरिकेत हायस्कूल ( आपल्याकडचे ज्युनिअर कॉलेज, १२ वी पर्यंत ) मध्ये सायन्स शिकवते. तिथल्या मुली अगदी तोकड्या अशा शॉर्टस्‌ घालून वर्गात येतात. वर्गात चाललेले असते शिक्षण व त्यात असा मादक पोशाख, हे माझ्या मुलीला योग्य वाटेना. तिने एक युक्ती केली. ती दुसर्‍या एका मुलीच्या हाती टेप देई व तिला उशीरा व तोकडी शॉर्ट घालून आलेल्या मुलीच्या शॉर्टची उंची मोजायला सांगे. समजा ५ इंच ( सगळ्या जगात जरी सेंटीमिटर्स मध्ये मोजमाप असले तरी अजून अमेरिकेत इंचच वापरतात ). आता ती त्या शॉर्टवाल्या मुलीला त्याचे सेंटिमिटर मध्ये रूपांतर करायला सांगे. अगदी कॅलक्युलेटर घेऊन. जर बरोबर आले, तर वर्गात बसू देई. नसता नाही. ह्याने परस्पर जरा लांब शॉर्ट घालावी हा संदेश जाई व वर्गात शॉर्ट पेक्षा गणिताचे, शिक्षणाचे, महत्वही ठसवल्या जाई.

--------------------------------------------------------------------------------

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Tuesday, May 31, 2011

-------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला---२१
हे असे करावे का ?
परवा पार्ल्याला एका भाषणादरम्यान मी श्री. भालचंद्र नेमाडेंवर एक आक्षेप घेतला की तुम्ही "हिंदू" चांगली खपावी म्हणून त्यात ब्राह्मणद्वेष पेरला आहे, संतांची टर उडविली आहे. त्यावर ते म्हणाले की अहो, मराठी पुस्तक खपून खपून किती खपणार व त्याच्या रॉयल्टीमधून असे किती मिळणार ? माझी सध्याची मिळणारी शिष्यवृत्तीच मुळी महिना ७० हजाराची आहे. तुम्हाला जर पुस्तक आवडले नसेल तर परत घेऊन या, मी पैसे परत देईन.
ज्या पुस्तकाचा एवढा गाजावाजा झाला, त्याच्या लेखकालाच जर त्यातून म्हणावे तितके पैसे मिळत नसतील, तर जे इतर हौशी लेखक असतात त्यांचे तर पुस्तकामागे स्वत:चेच पैसे जात असणार हे उघड आहे. जर लेखकाला पैसे मिळणे दुरापास्त असेल तर मग इतके लोक पुस्तके का काढतात, ती का छापतात, ती का विकतात ? लोकांनी आपण जे लिहिले आहे ते वाचावे त्याची प्रशंसा करावी हाच त्यांचा मुख्य हेतू असायला हवा.
मी अजूनही पायरेटेड पुस्तके हमखास घेतो. अगदी त्यांचे छुपे अड्डे असतात तिथे जाऊन घेतो. त्यात एक फायदा असा असतो की पुस्तक हमखास चांगले असते. वाईट पुस्तकासाठी पायरसी करण्याचे कोण अकारण कष्ट करणार ? आणि त्याच मजकूराचे किती कमी पैसे मोजावे लागतात, वाचण्यासाठी . जे इंग्रजी पुस्तक चारशेला घ्यायचे ते पायरेटेड मध्ये शंभरात मिळते. मुळात पुस्तके इतकी महाग का असावीत ? म्हणतात की पुस्तकाचा जेव्हढा खर्च येतो त्याच्या पाचपट विक्रीची किंमत ठेवावी लागते. पण लोकांनी वाचावे अशी लेखकाची प्रबळ इच्छा असते, तर प्रकाशकांनी किंमत ज्यास्त ठेवल्याने ती वाचू नयेत हा परिणाम/हकीकत होतो. मला प्रथम चेतन भगत त्याच्या भाषेसाठी नाही तर त्याच्या पुस्तके ९० रुपायात देण्यामुळे आवडला होता ( रूपा प्रकाशन, दिल्ली ). मी डॉ.नरेंद्र जाधवांच्या "आम्ही आणि आमचा बाप" ह्या पुस्तकाला प्रथम मानले ते, ते त्याच्या एकमेव पायरेटेड मराठी पुस्तक असल्याने. नंतर ग्रंथालीने त्याची जन-आवृत्ती अवघ्या ६० रुपायात काढली, तेही मला खूप भावले.
आता तर मला संगणकावर हवे ते नवे, जुने, पुस्तक फुकटच मिळवायचा नाद लागलाय. एक संकेत-स्थळ आहे : गटेनबर्ग.कॉम नावाचे. ह्यावर इंग्रजीतली लाखो पुस्तके फुकट उतरवून घेण्यासाठी आहेत. मेल्यानंतर ६०/७० वर्षांनी कोणत्याही लेखकाचे पुस्तक कोणीही, (कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन न करता), हे करू शकतो. आजकाल मराठीतही अशी पुस्तके संगणकावर फुकट मिळतात. अजून एक फारसे माहीत नसलेले एक संकेत-स्थळ आहे : लायब्ररी.एन्‌यू नावाचे. हे अमेरिकेतल्या एका विद्यापीठाचे स्थळ आहे. ह्याला लोक आपल्याकडची पुस्तके संगणकावरून पाठवतात व ती आपण फुकट उतरवून घेऊ शकतो. कितीतरी नवी कोरी, ताजी पुस्तके मी त्यातून घेतलेली आहेत.
आता आपले मराठी मन धास्तावायला सुरुवात होईल. हे बेकायदेशीर तर नाही ? हे करावे का ? तर ह्यावरचे "फेअर यूज" नावाचे एक कायद्याचे पुस्तक मी त्याच संकेतस्थळावरून ( फुकटच !) उतरवून घेतले. टीका, अभ्यास, प्रसार-माध्यमात मत मांडणे ह्या सर्व प्रकारासाठी कायदेशीर मुभा आहे असे हे पुस्तक सांगते. अमेरिकेत, विशेषत: गाण्यांसाठी, ह्यावर खूप खटले झालेत. शेवटी जी संकेत-स्थळे ही गाणी ठेवतात त्यांनाही वेठीस धरण्यात आले. आठ-दहा वर्षांच्या पोरांसोरांवरही खटले केले, प्रकाशक कंपन्यांनी. पण आजकाल हा प्रकार इतका बोकाळलाय की कायदेशीर काहीच कारवाई संभवनीय होत नाही. मजकूर नुस्ता उपलब्ध करून देणे हा काही गुन्हा होत नाही. शिवाय ह्यातून संकेतस्थळांना काही धंदा होत नाही. उलट साहित्याचा प्रसार करण्याचे उच्च कोटीचे काम आपसुक होते. एक डिजिटल कॅमेरा (किंवा मोबाईल) असेल तर फुकटात पुस्तकाची चित्रे ( सर्व पानांची ) काढून ती सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतात.
मला खूप दिवसांपासून विंदा करंदीकरांचे "एरिस्टॉटलचे काव्यशास्त्र" हे पुस्तक वाचायचे होते. मौजेचे प्रकाशन. कुठे मिळाले नाही. आयाआयटीतल्या काही विद्यार्थ्यांना हे पुस्तक अभ्यासासाठी हवे होते. त्यांना एक प्रत मिळाली. त्याची त्यांनी झेरॉक्स केली व त्याचबरोबर दोनशे रुपायात पीडीएफ फाइल झाली, जी आम्ही चारपाच जणांनी वाटून घेतली, तर केवळ ५० रुपायात पुस्तक पडले. आता मी हे एखाद्या संकेतस्थळावर ठेवले तर हजारो जण ते उतरवून घेऊ शकतील, फुकटात. कायद्याने पाहिले तर हे सगळे बेकायदेशीरच वाटेल . पण, श्रीपु किंवा सध्याचे मौजेचे मालक ह्यावर केस करण्यापेक्षा वाचणार्‍यांना प्रोत्साहन म्हणून धन्यवादच देतील. विंदांनीही हरकत घेतली नसती. ( आणि हे पुस्तक वाचून माझा असा काय धंदा झाला बरे ? ).
म्हणतात की जेव्हा चहा भारतात विकायला सुरुवात केली तेव्हा तो कोणी विशेष खरेदी करीत नसत. मग गावोगाव माणसे पगारी नेमली, जी त्या त्या ठिकाणी चहा बनवीत व लोकांना फुकट प्यायला देत. कालांतराने लोक चहानशीन झाले व चहाचा धंदा फळफळला. सध्याचा मराठी लेखक हा लेखनाच्या उत्पन्नावर जगूच शकत नाही, इतके ते नगण्य असते. तो अथवा त्याच्या प्रकाशकाला १०० ( समजा ) इंटरनेटवरून फुकटात पुस्तके घेणार्‍यांविरुद्ध खटले भरायचे म्हटले तर केव्हढा द्राविडी प्राणायाम ! त्यापेक्षा तो पुस्तक वाचणार्‍याला धन्यवादच देईल.
आणि मार्केटही हळू हळू बदलते आहे. वर्तमानपत्रे, मासिके, एरव्ही आपल्याला कोणी मोफत देत नाहीत . पण इंटरनेटवर हवे ते फुकट वाचता येते, उतरवून घेता येते. उलट त्यामुळे त्यांचा खप वाढतोच असे दिसून येते. आजकाल तर अमेरिकेत पुस्तक (रिलीज) प्रकाशित करताना त्याचबरोबर त्याची ई-बुक आवृत्तीही प्रकाशित करतात, ज्यामुळे छापील पुस्तक ज्यास्त खपते. फुकटात हे मिळाल्याने प्रकाशकाचा जर खर्चच होत नसेल व म्हणून नुकसान होत नसेल तर वाईट काय तर फक्त लेखकाची रॉयल्टी तेव्हढी बुडते. पण किती असते रॉयल्टी ? माझ्या वडिलांची पाच सहा पुस्तके (अगदी मौजेची ) होती. पण रॉयल्टी यायची अवघी १२३रु.५० पैसे. त्यांचे वाचणार्‍याला ती त्यांनी नक्कीच माफ केली असती .
हे असे करावे का ?

-------------------------------------------------------------------------------------

Tuesday, May 3, 2011

अरुणोदय झाला----२०
कवी का गीतकार ?
आपल्याकडे फारा दिवसांपासून एक वाद आहे की ग.दि.मा. वा जगदीश खेबुडकर ह्यांना कवी म्हणायचे की गीतकार ? कोण मोठा ? कवी का गीतकार ?
भाषाशास्त्रात "रेजिस्टर ऑफ लॅंग्वेज" नावाचा एक शैलीप्रकार आहे. जसे: समजा आपण कोणाला प्रेमपत्र लिहितो आहे तर त्याची भाषाशैली अगदीच वेगळी, मृदू, मुलायम, रोमॅंटिक, खाजगी अशी असते. आणि समजा एक वकील एक नोटीस लिहितो आहे, तर त्याच्यातली भाषाशैली ही खासच थेट वळणाची, नेमकी व कोरडी असते. आता कादंबरी, लघुकथा, कविता, गीते, निबंध, लघु-निबंध, संशोधनपर निबंध वगैरे साहित्याचे वेगवेगळे वाण आपण पाहतो. प्रत्येकाची शैली ही खास वेगळीच असते व ती त्या त्या वाङमयप्रकाराला साजेशीच असते, असावी लागते. ह्या पैकी आजच्या वादाला घेऊ : कविता आणि गीते.
गीते अर्थातच, गेय असावी लागतात. अर्थात एक अपवाद म्हणून कधी कधी अजिबात न गाता येणारी गीतेही गाजून जातात. पण ते अपवादच. ( वेस्ट-इंडीज येथे कॅलिप्सो गाण्यांची परंपरा आहे. दरवर्षी कार्निव्हलला स्पर्धा आयोजून ते एक कॅलिप्सो-किंग व कॅलिप्सो-क्वीन निवडतात. त्या गाण्यात एक चायनीज माणूस एक विचित्र गाणे, जे अजिबात गाता येत नव्हते, गायला. त्याला चायनीज कॅलिप्सो-किंग म्हणत लोकांनी प्रचंड हास्यकल्लोळ केला. गाता न येणारं गीत हा तसा विनोदच ! ). गीतात गेयतेसाठी छोटे छोटे शब्द, सोपा अर्थ असलेले शब्द, आणि यमके, अनुप्रास, असे आवाजी अलंकार ह्यांचे प्राबल्य असते. कित्येकवेळा केवळ गीतासाठी काही विचित्र आवाज असलेले शब्दही योजतात. जसे: किशोरकुमारचे डुडलींग--डिडली ए---या--हू--वगैरे. गीतांची योजना सिनेमात वा भावगीतात एक प्रकारचा मूड, भाव, वातावरण, निर्माण करण्यासाठी असते. त्यामुळे त्यात अगम्य शब्द, अर्थ न निघणारे शब्द, असून चालत नाही. शिवाय काही काही कठोर आवाजाचे शब्द वापरता येत नाहीत. वीरश्रीची गीते असतील तर त्यात वेगळेच साहस निर्माण करणारे शब्द वापरावे लागतात.
त्या मानाने कवितेला काही बंधने नसतात. कविता कशीही करू शकता. पूर्वी वृत्तात कविता करणे आवश्यक असे. किंवा भक्तिभावाच्या कविता अभंग वा ओवी ह्या वृत्तातच असत. आजकाल असे काही बंधन नसते. आजकाल बहुतेक कवितेचा मामला हा मुक्तछंदात कुठल्याही निर्बंधाविना असतो. शिवाय कवितेचा अर्थ समजलाच पाहिजे असे बंधनही नसते. किंबहुना जेवढी कविता दुर्बोध तेवढा तिचा दर्जा चांगला, असा सामान्यांचा संशय असतो. कवितेला मूड, भाव, वातावरण निर्मिती वगैरेचेही उत्तरदायीत्व नसते. कविता फक्त असावी लागते. कशी का असेना. ह्या वर्णनावरून सगळी गीते ही कविता ह्या प्रकारात मोडू शकतात पण सगळ्या कविता गीतात घेता येत नाहीत. काही मोजक्याच कवितांना गीतेही म्हणता येईल.
संगीतकाराच्या चाली बरहुकूम, ताल-लयाला धरून, गीते लिहिणे, हे सर्जन प्रक्रियेत खूपच कसबाचे काम आहे. त्यामानाने कविता जन्माला घालणे हे फारच सोपे काम असते. ( म्हणूनच कुठल्याही साहित्य-संमेलनात कवी व काव्य-वाचनवाले प्रचंड प्रमाणात असतात, दुसर्‍या कुठल्याही साहित्यप्रकाराच्या तुलनेत.). ते सगळ्यांनाच जमणे फार अवघड. तसेच गीते समजणे, त्यांचे रसग्रहण करणे हे जरा कौशल्याचे काम आहे. गेयतेचे अंग सगळ्याच ऐकणार्‍यांना असते, असे नाही. बहुसंख्यांना त्यात फारसे गम्य नसते.
साहित्याचे प्रयोजन तुम्हाला अभिव्यक्ती करू देण्याचे असते. तुम्ही तुम्हाला काय वाटते ते लिहू शकाल, ते साहित्य. गीते लिहिणे हे खूपच कसबाचे व कठिण काम खरेच, पण ते एका विशिष्ट हेतूपायी योजलेले सर्जन असते. ते कविते सारखे सहजी स्फुरलेले व सर्जकाला मुभा देणारे असत नाही. त्यामुळे ते अटी-तटी-चेच ठरवण्याचा सामान्यांचा कल असतो. पूर्वी मात्रा-वृत्तात कविता लिहिणे हे सर्जनापेक्षा कसबाला वाव देणारे असे. म्हणूनच ते आता बाद करण्यात आले आहे. चित्रकलेत सुद्धा हुबेहुब रेखाटण, हे ज्यास्त कुसरीचे काम आहे, ते दिसायलाही मोहक असते. पण आजकालच्या आधुनिक चित्रकलेत म्हणूनच त्याला मानाचे स्थान देत नाहीत. आडव्या-तिडव्या रेघा, रंगांचे वाट्‌टेल तसे पुंजके व मन मानेल तो विषय ( तोही समजेलच असा काही नेम नाही ), असे आजकालच्या चित्रकलेचे झाले आहे. ह्याच कला मुळे ( ट्रेंड ह्या अर्थी ), साहित्यात बंधने असलेले अविष्कार, आजकाल मान्यता पावत नाहीत. हे इतके टोकाला जाते की वाचकाला कधी कधी एखाद्या कलाकृतीला कथा म्हणावे, निबंध म्हणावे, का कादंबरी म्हणावे असा संभ्रम पडू शकतो.( जसे श्याम मनोहर यांच्या कादंबर्‍या ). पण ज्यांच्याकडे साहित्याची व्यवस्था सोपविलेली असते त्यांना ह्या संभ्रमापेक्षा सर्जकांच्या मुक्त आविष्काराचे ज्यास्त अप्रूप असते व महत्वही असते व त्याचीच तळी ते उचलून धरतात. ते त्यांच्या सोयीचे असते.
पण सुदैवाने साहित्य हा प्रकार अजून तरी कोणा एका गटाकडे गेलेला नाहीय. त्यामुळे आपल्याला वाखाणायचे तर आपण एखाद्या गीतकाराला अप्रतीम कवी म्हणू शकतो व तसा सन्मानही देऊ शकतो. तो तसा ग.दि.माडगूळकर व जगदीश खेबुडकर ह्यांना रसिकांनी दिलेला आहेच. साहित्याचे शास्त्र गुंडाळून ठेवून ! तर काय हे दोघेही फार मोठे गीतकार व कवी आहेतच !

--------------------------------------------------------------------------------------

Saturday, April 9, 2011

अरुणोदय झाला----१९
लिंगाचे बिंग
ह्या २०११ च्या जनगणनेत दर १००० पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत, त्याचे आकडे आले आहेत. त्यात भारताची सरासरी आहे दर १००० मागे ९४० स्त्रिया. तर महाराष्ट्रात हेच प्रमाण आहे दर १००० मागे ९२५ स्त्रिया . म्हणजे मराठी स्त्रिया, पुरुषांपेक्षा संख्येने इतक्या कमी आहेत. अमेरिकेत ह्या उलट ह्या वर्षी हा आकडा आहे १०२५. म्हणजे पुरुषांपेक्षा कितीतरी ज्यास्त.
मराठी भाषेत पुरुषवाचक शब्द किती व स्त्रीवाचक शब्द किती असे कोणी अजून मोजून पाहिलेले नाही. शब्दकोशात प्रत्येक शब्दाचे तो पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक, अशी नोंद कंसात दिलेली असते. जसे : १) सळ ( पु ): तलवारीचे म्यान; तिच्या मुठीला अडकवण्याची दोरी; घडीचा मोड, दुमड , सोन्याची लगड, पीक कापल्यानंतर उरणारा बुडखा २) सळई ( स्त्री ) : शलाका ; धातूची बारीक काडी; गणना करताना संख्या समजण्यासाठी काढून ठेवलेला भाग; लोखंडाचे कडे बसविल्यावाचून असलेले मुसळाचे लाकूड; जनानी मुकट्यावरच्या उभ्या रेघा.
वा.गो.आपटयांच्या "शब्दरत्नाकर" ह्या शब्दकोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत, पैकी स पासून सुरू होणार्‍या शब्दांचा गट हा सगळ्यात मोठा असून त्यात ५८८८ शब्द आहेत. आता ह्यापैकी पुरुषवाचक व स्त्रीवाचक शब्द मोजले ( एक मोठा नमुना म्हणून ) तर ते भरतात: पुरुषवाचक : १३३९ तर स्त्रीवाचक : ९३६. आता लिंगभेद जसा दर १०००वर मोजतात तसे स्त्रीवाचक शब्दांचे प्रमाण काढले तर ते भरते : दर १००० पुरुषवाचक शब्दांमागे : ६९९ स्त्रीवाचक शब्द. नशीब आपल्या भाषेचे नाव "मराठी" हे स्त्रीवाचक आहे व "भाषा" हेही स्त्रीवाचक आहे. तरीही स्त्रीवाचक शब्द ( हा मात्र पुरुषवाचक) असे कमी आहेत.
कधी कधी वाटते की शब्दकोशात काय, शब्द असतात भरपूर, पण आपण वापरतो त्यातले मोजकेच. तर मग त्यापैकी आपण किती पुरुषवाचक वापरतो व किती स्त्रीवाचक वापरतो हे रॅंडमली पहावे तर असे आढळून आले:
मंगला गोडबोले : पुस्तक "आडवळण"( पृ.३३ )--पु:३६;स्त्री:१९ ( दर १००० मागे ५२७ स्त्रीवाचक शब्द )
शांता शेळके : पुस्तक "सांगावेसे वाटले म्हणून" ( पृ.५७ ) पु:४३;स्त्री:२० ( दर १००० मागे ४५६ स्त्रीवाचक शब्द )
अशोक रा. केळकर : पुस्तक "वैखरी" ( पृ.९२ ) पु: २०; स्त्री: ५० ( दर १००० मागे २५०० स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "तुकाराम गाथा" ( पृ.११ ): पु: ८३; स्त्री: २२ ( दर १००० मागे २६५ स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "टीकास्वयंवर" ( पृ.३४ ) : पु: २६; स्त्री: २४ ( दर १००० मागे ९२३ स्त्रीवाचक शब्द )
ज्ञानेश्वर नाडकर्णी: पुस्तक "अश्वत्थाची सळसळ" ( पृ.३५ ) पु:२३; स्त्री: २३ ( दर १००० मागे १००० स्त्रीवाचक शब्द )
एक केळकरांचा अपवाद वगळला, तर स्त्रीवाचक शब्द आपण कितीतरी कमी वापरतो असे दिसते.
संपत्तीदर्शक, मालमत्तादर्शक असे शब्द जमा केले व त्यात स्त्रीवाचक किती हे पाहिले तर चित्र असे दिसते : खालील ७७ शब्दात पुरुषवाचक आहेत: १७, तर स्त्रीवाचक आहेत: ३७ ( नपुसक : २२) ( माल, संपत्ती, स्थावर, मिळकत, पैसा, रोकड, धन, मालमत्ता, वित्त, बंगला, गाडी, जमीन, शेती, शेत, प्लॉट, भूखंड, फ्लॅट, सदनिका, बॅंक, नोट, चिल्लर, कपडे, दागिने, अलंकार, सोने, वळी, हार, अंगठी, पाटली, बांगडी, जमा, फर्निचर, हिरा, चांदी, माणिक, मोती, कोठार, रत्न, वाडा, बंगली, देवडी, वस्त्र, मेजवानी, जहागीर, मोहरा, सिक्के, गोधन, स्त्रीधन, घर, शेअर्स, गुंतवणूक, भांडवल, पत, नगद, मान/मरातब, श्रीमंती/गरीबी, गडगंज, विपुल/ता, वाडी, कंपनी, उद्योग, उद्योगपती, उद्योजिका, खाते, आंदण, बक्षीस/सी, भेट, आहेर, मानपान, पगडी, जमा/डिपॉझिट, लाच/लुचपत, वास्तू, महाग, महागाई, दान, दाता )
लिंगाचे बिंग असे उघडे पडते, मराठी भाषेत !

---------------------------------------------------------------------------------------