Tuesday, February 19, 2013

भूमिका

------------
भूमिका
------------------
    भूमिका ह्या मराठी शब्दात हा पंजाबी गायक "मिका" का बरे घुसलाय ?
    संबंध दर्शवणारे, संबंधार्थक, संस्कृत प्रत्यय लागून मराठीत काही शब्द होतात. जसे : कायिक ( काये संबंधी); वाचिक ( वाचेसंबंधी ) ; मानसिक ( मानसासंबंधी ) ; मासिक ( मास-संबंधी) ; लौकिक ( लोकांसंबंधी ) ; धार्मिक ( धर्मासंबंधी ) ; वगैरे. आता असे भूमि संबंधी शब्द करायचा असेल तर तो होईल भूमिक . पण इथे वापरात आहे : भूमिका. असे का ने शेवट होणारे अक प्रत्यय लागलेले शब्द मराठीत आहेत . जसे: लेखक, वाचक , रक्षक, पाचक, मारक, गायक वगैरे. ह्या शब्दांत जी क्रिया आहे तो करणारा किंवा कर्तृवाचक हे शब्द होतात. ह्यांच्यातल्या काहींची स्त्रीलिंगी रूपे करताना जरूर त्यांचे लेखिका, रक्षिका, गायिका अशी रूपे होतात पण भूमिका हे केवळ स्त्री-पात्रांसाठी वापरलेले नसून ते दोन्ही प्रकारच्या नटांच्या करण्यासाठी वापरतात. त्यामुळे भूमिका हा शब्द स्त्रीलिंगी असला तरी तो स्त्रीवाचक नसावा. शिवाय लेखक, वाचक ...मध्ये जे कर्तृवाचकपणा आहे तो भूमि करणारा असे ठरवले तर नट वा कलाकार ऐवजी भूमि कसणारा असा वेगळाच अर्थ होईल. त्यामुळे भूमिका मधला "अका" हा प्रत्यय संबंध दर्शवणाराच असावा ( कर्तृवाचक नसावा ).
    कलाकार जे सोंग वठवतात त्यात "भूमि"चा काय बरे संबंध ? तर मोल्सवर्थच्या अर्थाप्रमाणे, भूमिका म्हणजे : The earth; Theatrical dress; the costume of a character represented on stage; Place of action; stage; theatre, arena; ground; footing; place of standing. आणि वाक्यात उपयोग असा : "आपण ह्या कर्मभूमिकेत आहों तोंपर्यंत सर्व कर्म केले पाहिजे."
    ह्या अर्थाप्रमाणे Place of action ह्या अर्थाने भूमि हे यथार्थ ठरते. नाहीतरी इंग्रजीत कलाकारांच्या भूमिकेला Cast म्हणतातच व त्यात "भूमि" असाच संदर्भ मिळतो. भूमिका ही नाट्यशास्त्रात खरेच नाट्याची जागा अथवा भूमि च आहे ! त्यावरच तर हा डोलारा उभा असतो ! तर अशी ही भूमिका !
-----------------------------------------

Sunday, February 17, 2013

वाचकांचा धाक !

----------------------------------------------------
अरुणोदय झाला---२९
-------------------
वाचकांचा धाक !
----------------------------
    तुम्ही जेव्हा एखादे नवे मासिक सुरू करता तेव्हा अगदी व्यवस्थापन-शास्त्राप्रमाणे मार्केट-सर्वे करता . वाचकांना काय हवे ते विचारता व त्याप्रमाणे त्या मासिकाला बेतता. आता वाचकांची आवड जर नवीन मासिक सुरू करण्यात एवढी महत्वाची असेल तर चालत्या मासिकातही वाचकांची बदलती अभिरुची तेव्हढीच महत्वाची मानली पाहिजे.
    कवितारती मासिक ( खरे तर अनियतकालिक ) पाहिले तर ते बा.भ.बोरकरांच्या स्मृतीत सुरू झाले होते अशी ठळक नोंद अजूनही त्या मासिकावर आढळेल. त्या मासिकात कविता आठ दहा पाने व तीस-चाळीस पाने समीक्षा असे रूप सुद्धा वाचकांच्या प्रतिसादावरूनच झाले असावे.
    चित्रकार दलाल ( व मुळगावकर)  हे एकेकाळी तमाम महाराष्ट्रातल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर असत. कारण त्यांची चित्रे लोकांना भावत. मग ती वाचकांची अभिरुची म्हणून समजा तशी संपादकांनी आपापल्या मासिकांवर छापली तर तो वाचकांच्या अभिरुचीचा मरातबच मानला पाहिजे. एका चित्राने नवभारत किंवा भाषा आणि जीवन ह्यांचा खप वाढणार असेल तर काय हरकत आहे ? वैशालीतही आज जे पदार्थ आहेत तेही गिर्‍याइकांच्या पसंदीनेच केव्हातरी रुजवलेले होते ना ?
    एकेकाळी लघुकथा प्रचंड लोकप्रिय होत्या. त्याप्रमाणे कित्येक मासिके त्या छापीत. आज बदलत्या अभिरुचीमुळे बरीच मासिके लघुकथा छापत नाहीत. तसेच राशी-भविष्यांचे दाखवता येईल. गिरीश कुबेर एरव्ही वैज्ञानिक आविर्भाव आणतात पण लोकसत्तेत अजून राशी-भविष्य येतेच ना ?
    माझी आजी, आई ह्या नऊवारी साड्या नेसत असत. त्यांच्या डोळ्यादेखत पाचवारी आल्या, गेल्या, पंजाबी ड्रेस आले, जीन्स आल्या. समाज अभिरुचीचा एवढा मान ठेवतो तर एका मासिकाने एवढे टोकाच्या भूमीकेचे का असावे ?
---------------------------------------

Sunday, March 18, 2012



अरुणोदय झाला--२८

पानसिंग तोमार,
बोलीचा खुमार !

    हिंदी सिनेमाचे एक चांगले असते की तो कोणाला कशासाठी आवडतो तर कोणाला कशासाठी !
    मला हा सिनेमा बोली भाषेच्या खुमारी साठी आवडला.
    पानसिंग तोमार हा सैन्यात जातो. खायला मुबलक मिळते म्हणून सैन्यातल्या स्पोर्टस्‌ मध्ये रनिंग मध्ये प्राविण्य मिळवतो. इकडे त्याची शेती बळकावल्या जाते म्हणून तो बागी बनतो. चंबळचा डाकू बनतो. सिनेमाची गोष्ट एका पत्रकाराच्या मुलाखतीने उलगडत जाते. हाडाचा स्पोर्टमन जसा शर्यत पूर्ण केल्याविना रहात नाही त्या प्रमाणे हा शेवटी शरण न येता पोलिसांशी लढताना प्राण ठेवतो. सिनेमा जे खेळाडू हलाखीने मेले त्यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे.
    आता बोली भाषेच्या खुमारी बद्दल. संवाद लेखकाने कमालीच्या प्रांजळपणाने संवाद थेट चंबळच्या बोलीतच ठेवले आहेत व इरफान ह्या नटाने त्याला त्याच्या नेहमीच्या तुसड्या फेकीने चांगलाच न्याय दिला आहे. एक साधे उदाहरण: मुलाखत घेणार्‍या पत्रकाराला तो मटण खाऊ देत नाही ( कारण पत्रकार मोटा असतो ) पण त्याला आइस-क्रीम विथ गुलाबजाम देतो. गरम गुलाबजाम आईसक्रीम बरोबर खाण्याच्या विदेशी लज्जतीचे बहारदार वर्णन करताना तोमार म्हणतो : एकै स्वाद है, लेकिन डबल मिजाज है !
    साध्या साध्या माणसांनाही विचारांचे गारूड कसे मोहवून अचाट कामे करून घेते तेही ह्या सिनेमात फार नजाकतीने दाखविले आहे. जसे सगळे जण पानसिंग तोमार ह्याला शेवटी शरणागती पत्कर असे सांगत असतात. पोलिटिकल करेक्टनेस प्रमाणे ते रास्तही ठरते. पण पानसिंग म्हणतो हम ठहरे पगबाधा रनर ( स्टीपल-चेस रेसचा रनर), हमार लक्ष्य फिनिश लाइन. भले जिते या हरे, रेस तो पूरी करनीही है ! एक साधे तत्व, पराकोटीच्या वेडेपणाला भाग पाडते !
    असेच सैन्याधिकारी त्याची चौकशी करीत असताना त्याला विचारतात की त्याच्यापैकी कोणाला पोलिसांनी कधी पकडलेले होते काय ? म्हणजे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ? तर पानसिंग कौतुकाने म्हणतो, पोलिस पकडही नही पाये ! म्हणजे पकडल्या जातो तो चोर व पकडल्या जात नाही तो नेता असाच जनमानसाचा कौल दिसतो !

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
----------------------------------------------------

Friday, January 27, 2012

अरुणोदय झाला---२७
पुरस्कार केव्हा मिळावेत ?
    विंदा करंदीकरांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा त्याच्या कितीतरी आधी त्यांनी कविता करायचे सोडले होते. जवळ जवळ जीवनाच्या शेवटालाच त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रात वसंत बापट, मंगेश पाडगावकर व विंदा करंदीकर ह्यांचे त्रिकूट एकेकाळी गावोगाव जाऊन काव्यगायनाचे कार्यक्रम करीत असत. खरे तर तेव्हढया एका कार्यासाठी, मराठी कविता व अभिरूचीच्या संगोपनासाठी, त्यांना दिले असते तितके पुरस्कार कमीच पडले असते, इतके ते मोलाचे काम होते. पण त्या वेळी हे तिन्ही कवी तरुण होते व त्यांची मस्ती, निर्मिती हाच त्यांना मोठा पुरस्कार वाटत असावा.
    कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या कॉलेजमध्ये असताना जीवनानुभवाच्या महत्तेपोटी शिक्षण सोडून दक्षिणेकडे गेले होते व आतंकवादी समजून त्यांना तुरुंगवासही तेव्हा झाला होता. पण त्या तरुण कवीला "महाराष्ट्र काव्य-भूषण" हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारने आत्ता चार-पाच वर्षापूर्वी दिला.
    कवी वसंत बापट कुठला पुरस्कार मिळण्याआधीच वारले.
    मागच्या वर्षी ठाण्याला एका कार्यक्रमात सगळे मान्यवर कवी रांकेत पहायला मिळाले. त्यात शंकर वैद्य दिसले. कोणी तरी त्यांची स्वाक्षरी मागत होते. वही, पेन, चष्मा, ह्या सगळ्या जामानिम्याला सांभाळत त्यांचा थरथरता हात कितीतरी वेळ स्वाक्षरी काढण्याचा प्रयत्न करीत होता. एके काळी दूरदर्शनवर काय अप्रतीम मुलाखती, काव्यगायन हा कवी करीत असे ते आठवून मन गहिवरून आले.
    ग.दि.माडगूळकर व शांताबाई शेळकेंना तर खास मानाचे असे पुरस्कार मिळायला खूपच उशीर झाला.
    कवी लोकांना जेव्हा आपण पुरस्कार देतो तेव्हा तो आपण त्यांच्या निर्मितीला केलेला एक सलाम असतो. तो आपण त्यांच्या निर्मितीच्या भरात असतानाच करायला हवा. निर्मितीची गात्रे गळित-गात्र झाल्यावर आपण त्यांना पुरस्कार देतो हा खरोखर त्यांच्यावरच्या आटलेल्या निर्मितीचा उपहासच नाही का ? प्रकृतीला न जुमानता जेव्हा कवी त्याला दिसणार्‍या वाटेने, आडवाटेने, चौखूर उधळत असतो तेव्हा आपण त्याच्या मार्गापासून दूरवर उभे राहतो व प्रकृती जेव्हा त्याचे सगळे निर्मिती-रस आटवते तेव्हा आपण त्याला मान देतो. हे आपले वागणे साहित्य-बाह्य लक्षणांना जोपासणारे आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------------

Tuesday, January 3, 2012



अरुणोदय झाला---२७

___" सह नौ टरक्‌तु !
सहवीर्यं डरवावहै ! "
  
    काल कानपूरला एक अफवा उठली आहे. अफवा अशी की तिथे भूकंप येऊ घातला आहे व तशात जे लोक बाहेर असतील, बाहेर झोपलेले असतील, त्यांची होईल, दगड आणि माती !
    क्षणभर हसू आले. पण जरा विचार केला तर आपली दगड आणि माती झाली आहे असेच दिसून आले. कशाचेच आता कौतुक नाहीय. कोणी अनाम पूर्वजांनी केव्हा तरी करुणा भाकली असेल की "माझ्या मना बन दगड !" आणि आपण आताशी दगडासारखे मख्ख झालेलो असू. हा कसला कंप आला आणि आपण बनलो दगड आणि माती ?
    समाजाचे राहू द्या, कुटुंबातली नाती सुद्धा व्हावी दगड आणि माती ? आणि पांगली किती माणसे ! आई-बाप इथे तर मुले तिथे परदेशी. देशात असली तरी परमुलुखात . प्रगती आणि सुधारणा म्हणजे, नेहमीचे बसकर सोडायचे व दुसरे शोधायचे, असेच का व्हावे ? आणि असे झाले म्हणून मनातले एकमेकांविषयी वाटणे, अनुकंपा, कमी का व्हावे ? ह्या अनुकंपेच्या न येण्यानेच होणार आहे का आपली दगड आणि माती ? का ह्या अनुकंपेपायी मोजावी लागणारी किंमत पाहूनच आपल्याला भीती वाटायला लागली आहे ? आताशी ह्या अंधाराची चीड येण्याऐवजी ह्याचा धाकच उदंड वाटतो आहे. हिंमतीने आणलेले पाणी बाळगणारी ओली जिवणीही अशी धाकाची रात्र कोरडी पडते आहे. मनाच्या ह्या खिंडारांवर आपण भीतीचा गाळ थापून काही डागडुजी करतो आहोत का ? ब्यूरोच्या बायका नेमल्या की झाले कर्तव्य, हीच का जनरीती होऊ लागलेली आहे ? हे भळभळणारे नात्यांचे रक्तस्त्राव लगेच थांबावेत म्हणून का आपण ह्या जनरीतींचा बर्फ त्यावर धरतो आहोत ? हे सगळे भयाण आहे . पण सगळीकडे असे भयाणतेचेच बुरुज दिसत आहेत. ह्या बुरुजांवरून शेवटची परवलीची शीळ येईल, जिच्या येण्याबरोबरच सगळे होईल दगड आणि माती ! ह्या शीळेलाच गिळू यात व मंत्र म्हणू यात __"सह नौ टरक्‌तु ! सहवीर्यं डरवावहै !"
    कानपूरला केव्हा बरे पोचले असतील मर्ढेकर ? कारण मर्ढेकरच म्हणाले होते :
            मनास पडली जर खिंडारें
            भकास, थापा गाळ भीतीचा,
            अन्‌ धमन्यांतिल धारांवरती
            बर्फ रचा मग जन-रीतीचा.
              
                अंधाराचा धाक उदंड,
                काळोखाची हाक अकल्पित,
                ओल्या जिवणीमधील पाणी
                पळविल ऐशी रात्र अशिल्पित;
              
                भयाणतेच्या बुरुजावरुनी
                येइल केव्हा शीळ अनामिक;
                गिळा तिला अन्‌ मंत्र आठवा
                मनातल्या पण मनांत, लौकिक:
          
            __"सह नौ टरक्‌तु !
            सहवीर्यं डरवावहै !"
( कवी : बा.सी. मर्ढेकर, १४, "काही कविता" मधून )
---------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
--------------------------------------------------------------------------------------

Friday, December 2, 2011

अरुणोदय झाला---२६

नाही हो नाही हो नाही......

    माणसाला ठामपणाचे खूप आकर्षण असते व आदर्श चांगला माणूस हा अगदी ठाम असाच असतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक माणूस बर्‍याच बाबतीत हो नाही च्या अध्येमध्येच घोटाळत असतो. सोनियांचा आजार लोकांना सांगावा का नाही ?  राहूलने व्हेनेझुएलिन मुलीशी लग्न करावे का नाही ? राहूलने आत्ता लगेच पंतप्रधान व्हावे का पुढच्या निवडणुकी नंतर ? का प्रियांकालाच पंतप्रधानपद द्यावे ? हे खरे तर भारताचे मोठ्ठे प्रश्न असायला हवेत. पण लोकांना पडलेत एफडीआय-रिटेल, लोकपाल, महागाई, काळे धन, लाल दिवे वगैरे क्षुल्लक प्रश्न...
    लोकपाल बिलात अगोदरच लोकसभेने तीन मुद्यांवर होकाराचा प्रस्ताव दिलेला आहे. म्हणून मग आता कशाला नाही म्हणता येत नाही का ? कोण लागून गेली आहे स्टॅंडिंग कमीटी ? खुद्द सम्राज्ञीला अमेरिकेला ऑपरेशनसाठी जावे लागले, हे खरे, पण कोणता आजार होता हे आम्ही सांगू शकलो का ? सांगितले का ? अभिषेक मनु सिंघवी आहेत खूप हुशार पण त्यांना सुद्धा आम्ही कॉंग्रेसच्या प्रवक्तेगिरीवरून एकदा काढून टाकलेच होते ना ? प्रणबदा आहेत खूप अनुभवी पण राजीवजींच्या काळात त्यांनासुद्धा आम्ही चांगले बदडले होते ना ? मग नक्की नक्की असे काय असते ? नक्की कशाचे नक्की नसतेच.
    आमच्या नाही नाही म्हणण्याचे एवढे काय घेऊन बसलात. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा "नेति नेति" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ! ).  अहो देवाची व्याख्या करताना सुद्धा भारतीय तत्वज्ञान म्हणून गेले आहे की "नेति नेति". मग आम्ही थोडे हो नाही, हो नाही, केले तर त्यात काय एवढे ? न, ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का? तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त,  "न करणे" ही असते. पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज "न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी "न-पदार्थ" अशी संबोधिली गेली आहे. "येथे"च्या उलट "तेथे" असे होते, पण "न येथे" म्हणजे काही "तेथे" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे "न येथे"! तसेच, "बोलणे" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने "ऐकणे" असे व्हावे. "न बोलणे " ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा "न"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री "बायनरी ऑपोजिशन" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.).
    साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, "वाया आणिका पंथा जाशी झणी" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात "असे करू नको", "तसे करू नको" किंवा बहुतेक पालक जसे "डोंट प्ले नाउ". "डोंट वेस्ट टाइम" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास "वाया जाणे" येतेच. मग सदगुरूला "बॅड पेरेंटिंग"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की "नो एंट्री" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.इंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो.
    मग काय समजलात ? लोकपाल आणणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    एफडीआय-रिटेल मागे घेणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    काळे धन माघारी आणणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    महागाई कमी होणार का नाही ?  उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    २-जी चे राजे सुटणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    राहूलच लग्न होणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    आमचेच राज्य परत येणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
( हे सगळे खरे समजायचे का ? नाही हो नाही हो नाही हो...........)
-------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------------

Tuesday, October 18, 2011

मु.पो.कुसुमाग्रज व भाषांतराचे पक्षी:
फारा वर्षानंतर एका अभिजात कार्यक्रमाला जायला मिळाले. दि.१५ आक्टोबरला ( २०११) यशवंतराव चव्हाण सभागृहात कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे कुसुमाग्रजांच्या कवितांवर कवी सौमित्र ( नट, किशोर कदम) व गुलजार ह्यांच्या कवितावाचनाचा हा कार्यक्रम होता. खालचे प्रेक्षागृह भरल्याने वरच्या बाल्कनीत बसावे लागले. अर्थात बाल्कनीही भरली हे या कार्यक्रमाचे दिसणारे यशच.म्हणतात की हा चौथाच कार्यक्रम होता आणि असे बरेच व्हावेत असे वाटावे इतका ह्रद्य !
स्टेजवर गुलजार व कुसुमाग्रजांचे भव्य चित्र, आणि दोन पोडियम्स इतकाच नेटका रंगमंच होता व तो फारच प्रभावी जाणवत होता. प्रेक्षकात डॉक्टर जब्बार पटेल, गुरू ठाकूर व मुंबईच्या धकाधकीतून निवांतपणा काढणारे रसिक होते. कवी सौमित्र कुसुमाग्रजांची कविता अतिशय भावोत्कटतेने वाचीत व नंतर गुलजार त्याचे हिंदी-उर्दूतले भाषांतर पेश करीत, काही स्पष्टिकरणेही देत. असे एका भाषेतले कवितेचे पक्षी मु.पो, कुसुमाग्रज ह्या कवीच्या गावाहून भरारी घेत गुलजार ह्यांच्या कवितेच्या गावी सुखेनैव पोंचत व दोन्हीही कवी किती प्रचंड ताकदीचे होते त्याचा प्रत्यय येई. मध्ये मध्ये सौमित्र त्यांना काही कविताविषयक, सृजनविषयक, तत्वज्ञानविषयक प्रश्न विचारीत व त्यांची चपखल उत्तरे तितक्याच लीलया गुलजार देत. असा मन खिळवून टाकणारा हा कार्यक्रम फारच वेधक झाला. अखेर गुलजार म्हणाले तसे, अनेक कवींचे मुशायरे टाळून एकाच कवीची कवने व तिची भाषांतरे ह्यांचा मरातब करणारी ही मराठी अभिरुची त्यांना तसेच प्रेक्षकांना अपार भावली.
कवितांच्या निवडीबद्दल सौमित्रांचे, अमृता सुभाष ह्यांचे अवश्य अभिनंदन करायला हवे. कारण कुसुमाग्रजांची आपल्या मनात असलेली प्रतिमा गर्जा जयजयकार, पृथ्वीचे प्रेमगीत, आगगाडी व जमीन, जालीयनवाला बाग, जा जरा पूर्वेकडे, वेडात मराठे वीर दौडले सात, टिळकांच्या पुतळ्याजवळ वगैरे शालेय जीवनात भेटलेल्या शिरवाडकरांना ( कुसुमाग्रज) दाट ओळखीची होती. त्यात समकालीन कवी जी जीवनावरची, नात्यांवरची, मृत्यूवरची तत्वज्ञानात्मक भाव-कवने रचतात तशाच कविता निवडून त्यांची भाषांतरे पेश करण्याने एका ज्ञानपीठ विजेत्या कवीची भारदस्त बाजू पहायला मिळाली. शिवाय मूळ कवितेचे लगेच भाषांतर पेश करण्याने ती कविता मनावर चांगली पक्की कोरल्या जायची हेही वाखाणण्यासारखे झाले. कविता वाचनाच्या निमित्ताने सृजनाचे व आयुष्याच्या तत्वज्ञानाचे जरा रंगतदार दर्शन झाले. मृत्यूबद्दल सौमित्रांनी विचारलेल्या प्रश्नावर गुलजारांनी एक काव्यमय कल्पना सांगितली. त्यांना मृत्यू आजाराने शय्येवर यायला नको आहे, क्षणात चिंध्या करणार्‍या अपघाताने यायला नको आहे, तर कविता लिहिता लिहिता पेनमधली शाई संपून जावी तसा यायला हवा आहे. कवी गुलजारांची भाषांतरे चपखल तर होतीच, शिवाय एका थोर कवीने दुसर्‍यासमोर किती प्रांजळपणे नतमस्तक व्हावे ह्याचा आदर्श दाखविणारी होती. त्यांच्या एका कवितेवर प्रेक्षकांची दाद आल्यावर ते म्हणाले की ही दाद मूळच्या कुसुमाग्रजांना आहे ! केव्हढी ही विनम्रता व किती देखणी !
आजकाल आपल्याच नात्यांबद्दल विमनस्क करणारी भावना दाखवणारी एक कविता मोठी बोलकी होती. कवीने मोठ्या मशागतीने रोप लावले आहे व त्याची निगराणी केली आहे. पण आता ते झाड उन्हपावसात बहरत असताना कवीला आता त्याच्याशी संबंध तुटल्यासारखा वाटतो आहे. आणि तरीही तो म्हणतो की हे बहरणे, निसर्गाचे कवतिक वगैरे त्या झाडाच्या मुळांतून जमीनीच्या कुशीत जाणारे आहे. आजकालच्या पोटच्या मुलांना अंतरणार्‍या पालकांना ह्या कवित्तेचे तत्वज्ञान क्षणभर हेलावून सोडते. तसेच म्हातारपणी एकटेपणाचे दु:ख सोसणार्‍या पुरुषांची व्यथा कवीने सात चमच्याच्या स्टॅंड ह्या हलक्या-फुलक्या वाटणार्‍या कवितेने छान रेखाटली आहे. घरची मालकीण असती तर तिच्या देखरेखीत सातवा चमचा हरवला नसता ह्या अगदी सोप्या, घरगुती निरिक्षणाला पुष्टी देत जेव्हा कवी म्हणतो की तर मग मीही हरवलो नसतो, तेव्हा एकटेपणाची हळहळ साक्षात समोर उभी राहते. ह्या कवितेच्या भाषांतरादरम्यान गुलजारांनी एक छान उत्तर दिले. सौमित्रांनी विचारले होते की तुम्हाला निसर्गाच्या रूपांचे सुचते कसे ? त्यावर गुलजार म्हणाले की निसर्गाचे सोडा, इथे कुसुमाग्रज तर निर्जीव अशा चमच्याच्या स्टॅंडला जिवंत करीत आहेत ! सृजनाला अजून वेगळी दाद ती काय असावी ? सृजनाबाबत एक कवी म्हणून सौमित्रांना कुतुहूल असणे स्वाभाविक. मग ते विचारतात की तुम्ही चालीवर गीते कशी लिहिता. ह्यावर ते सांगतात की दोनशे वर्षांपासून अशीच रीत चालत आली आहे. प्रक्रीया समजली नाही पण रीत अशीच हे उमगले.
कुसुमाग्रजांच्या ज्वलंत राजकीय उपरोधाची खूण पटविणारी एक कविता, महात्मा गांधींच्या सरकारी भिंतींवर टांगले असण्याची, नेहमीप्रमाणे भरघोस दाद मिळवती झाली. शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दु:खाची किंवा कंगालपणाची खिल्ली न उडवता त्याचा मानमरातब ( डिग्निटी ) कुसुमाग्रज "कलोजस" ह्या कवितेत कसा सांभाळतात ते गुलजारांनी कवितेच्या भाषांतरात अप्रतीमपणे बोलून दाखविले. कुर्ल्याच्या चाळीत एका बंदिस्त खोलीत त्या गरीबाला, कंदिलात, एका सूर्यनारायणाचे कसे दर्शन होते व तो कलोजस कसा घनगंभीर होतो हा अनोखा रसास्वाद गुलजार इथे आपल्याला शिकवून जातात. पुराने घर खचले तरीही उभारीने, ताठ कण्याने, लढणार्‍या शिष्यावरची कविता "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा" ह्यात गुलजार कुसुमाग्रजांचे नेमक्या व मोजक्या शब्दात चित्र उभारण्याचे कसब आवर्जून दाखवतात. "बायको मात्र वाचली" एवढे म्हणण्याने बाकीची हलाखी आपल्यापुढे साक्षात उभी राहते असे जेव्हा गुलजार निदर्शनास आणून देतात तेव्हा एका कवीचे रसग्रहण कसे असते त्याचा नमूनाच पहायला मिळतो.
कवी सौमित्र म्हणजेच कसलेले नट किशोर कदम व गुलजार हेही थेटर सिनेमातले, व कुसुमाग्रजही थोर नाटककार, तेव्हा नाटकावरची कविता नसती तर चुकचुकल्यासारखे झाले असते. "नट" नावाची एका नटाच्या अखेराची अप्रतीम कविता अशीच रंगते. रिकाम्या प्रेक्षागृहात रिकाम्या खुर्च्यांकडे प्रयोगाअंती पहात हा नट आशा करतो की जे प्रेक्षक माझी स्मृती घेऊन गेले आहेत त्यांच्यात अंशा अंशाने तरी मी वाटला गेलो आहे ह्याचे मला समाधान आहे. अशा कार्यक्रमानिमित्त धावपळीतल्या रसिकांना थोर कवींचे अंश अशाच रितीने आपल्यात झिरपले असावेत अशी सुखद जाणीव होते, जी "मु.पो.कुसुमाग्रज, भाषांतराचे पक्षी" ह्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मिळणारी पोचपावतीच आहे जणु.

------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव