Wednesday, August 31, 2016

---------------------------------------------------- सृजन आधी संपावे की जीवन ?

----------------------------------------------------
सृजन आधी संपावे की जीवन ?
---------------------------------------
कोणा एका कवीचे मागणे असे होते की पेन मधली शाई जशी लिहिता लिहिता संपावी, तसे जीवन जगताना सृजनाची शाई एका क्षणाला अलगद संपून जावी. म्हणजे शेवट तर येणारच. पण तो असा शेवटपर्यंत सृजन होत होत असणारा असावा. म्हणजेच सृजन शेवटपर्यंत टिकावे.
हे जरी कविकल्पनेप्रमाणे उदात्त, भव्य असले तरी प्रत्यक्षात असे होत नाही. शेवटची कित्येक वर्षे विंदा करंदीकर कविता करीत नव्हते. दुसरे काही लिहीत नव्हते. जणु काही सृजन आटलेच होते. थोडयाफार फरकाने बहुतेक कवींच्या लेखकांच्या वाटेला हे आटणे आधीच येते. थकणारे शरीर सृजनाचे झरेही बुझवीत राहते. सृजन आटल्यानंतरही कित्येक वर्षे शरीर ( वा लिहिलेली बाडे ) ढकलीत राहावे लागते. पाट्या टाकाव्या लागतात.
तसे पाहिले तर प्रत्येक लेखक-कवीची जशी एक स्वत:ची शैली असते, तसेच त्यांचे स्वत:चे ( हयातभराचे ) एक लाडके तत्व असते, जे ते आपल्या आविष्कारातून हयातभर व्यक्त करीत असतात. असे कलावंत फार विरळा की ज्यांची तत्वे इतकी अनेकांगी असतात की ती एका आयुष्यात सांगून होत नाहीत. कित्येक लेखकांचे तर असे होते की एकच ढब, एकच सांगणे, अनेक नंतरच्या कादंबर्‍यातून, कवितांतून ते परत परत सांगत राहतात. विशेषत: कवींचे असे फार होते. एखादा कवी ( जसे: ग्रेस) केवळ संध्याकाळ ह्या एकाच विषयाचे गाणे आयुष्यभर आळवत राहतो. त्यात चांगले वाईट असे जाऊ द्या, पण एका आयुष्यात जे सांगण्याचे असते ते केव्हाच त्याचे सृजनाच्या उर्मीसरशी सांगून झालेले असते. म्हणजे परिक्षेत जसे आपले एका परिच्छेदात उत्तर देऊन झालेले असते व आपण ते जरा भारदस्त करीत, त्याला पुरवण्या जोडत राहतो. मुद्दा केव्हाचाच संपलेला असतो.
ज्ञानेश्वरांचे तर हे सांगणे अवघ्या वयाच्या २० वर्षातच आटपून गेले होते व त्यावर त्यांनी सदेह समाधी घेतली होती. जे सांगायचे होते ते इतकेच, असे नेमकेपणे त्यांना वाटले असावे.
वाटते खरे की, सृजनाचा झरा कायम खळाळता राहावा. पण जीवनाचा स्त्रोत मंदावतांना तो तरी किती काळ खळाळेल ? पेन भरलेले असतानाच हात ढीले पडले तर त्या सृजनाच्या शाईचे काय होय ?
--------------------------------------------

Tuesday, August 30, 2016

कोण ठरवील ? स्मृतिपर्ण की खुणेरी ?

-----------------
कोण ठरवील ? स्मृतिपर्ण की खुणेरी ?
----------------------------
एखाद्या भाषेत एखादा नवीन शब्द कसा येतो, रुळतो व ते कोण ठरवते हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. आता एक उदाहरण घेऊयात, इंग्रजीतले "बुक-मार्क", म्हणजे पुस्तकातले खुणेचे पान जे वापरतात ते. मराठीतल्या पुस्तकातही हे पान वापरल्या जाते ( पूर्वीच्या जाड धार्मिक पुस्तकात एक रंगीत विणलेला दोरा ह्या कामी वापरत.) पण ह्या बुक-मार्कला मराठीत म्हणायचे काय ?
काही जणांनी वापरलेय स्मृतिपर्ण. कुठल्या पानापर्यंत वाचून झाले त्याची स्मृती ठेवण्यासाठी वापरलेले पान. छानच शब्द आहे. पण हा रुळेल ? कदाचित लोकांना तो संस्कृत-वाला वाटेल व साधे लोक तो दूरच ठेवतील.
इंग्रजीत मूळ शब्दाआधी प्रत्यय ( प्रिफिक्स ) व शब्दानंतर प्रत्यय ( सफिक्स ) लावून नवीन शब्द करायची पद्धत आहे. जसे: e-book ; pass-book ; log-book ; phone-book  वगैरे, किंवा book-mark ; book-store ; book-shelf ; book-bank ; वगैरे. ह्या शब्दांमध्ये कसे book हे मूळ आहे, तसे ह्याचे मराठीत करताना जर पुस्तक/ग्रंथ केले तर मग करावे लागेल book-mark साठी : ग्रंथ-खुण ; पुस्तक-खुण, वाचन-खुण ; पान-खुण; शलाका खुण वगैरे. आता हे सुटसुटीत वाटत नाहीत, त्यामुळे रुळतील अशी शक्यता कमीच.
आता "खूण" हे मूळ ठेवावे असे वाटून ( खुणगाठ सारखे, पूर्वी म्हणे लोक लक्षात ठेवण्यापायी धोतराला कडेला गाठी मारीत तसे ) पर्यायी शब्द होऊ शकतात असे : खुणपान, खुणपृष्ठ, खुणेचे पान, खूण-पीस, खुणेरी, खुणकरी ;  खुण-पान ; खुण-चट ;  खुण-पत्र ; खुणपत्रिका ; खुणपर्ण ;  खुणक ; खुणपे ; खुणकळ ; आठवचिठ्ठी ; (काही पुस्तकांना बुकमार्क म्हणून एक दोरा असतो. त्यासाठी : खुणसूत्र ; खुणदोर ; खुण-दोरा खुणधागा ;).
आता इतक्या पर्यायांपैकी किती लोकांना कोणता पर्याय रुचेल व ते कोणता पर्याय रुळवतील, हे ताडणे मोठे कठिण आहे.
-------------------------------------------

संस्कृतीची दुडकी चाल !

संस्कृतीची दुडकी चाल !

--------------------------------

आपल्याला वाटते खरे की कलाकृतीचा आपल्यावर काही ढिम्म परिणाम होत नाही. पण.....

आज ६०-६५ वर्षे झाली त्या गोष्टीला. मी आठ दहा वर्षांचा असेन. हैद्राबादला त्या काळी आमच्याकडे पंधरा वीस जण होते राहायला. त्यात ११चि एक क्रिकेट टीम विद्यार्थ्यांचीच होती. माझी आजी गं.भा. होती. म्हणजे केशवपन केलेली. लाल गुलाली नेसे. स्वयपाक सोवळ्यात करी. आपले जसे केस वाढत, तसे तिचेही वाढत. तिच्या गुलालीच्या डोक्यावरच्या पदरामधून ते बाहेर येत व त्यावर आम्ही हात फिरवला की ते हाताला गुदगुल्या करीत. तिचे वाढलेले केस कापायला न्हावी गुपचूप बोलावण्याचे काम माझ्याकडे असे. त्याला बोलावताना “बुढ्ढीके बाल काटने के है” असे म्हणताना मला एक अजीब शरम येई. आजीलाही गुपचूप सगळे मोरीत करून घेणे खूपच अवघड जाई व हे सगळ्यांना दिसत होते. पण हे दर महिन्याला भोगावे लागे. त्यानंतर बरीच वर्षे गेली...त्यानंतर आमच्या घरात कोणत्याच बाईला केशवपन करावे लागले नाही.

एक छोटीशीच गोष्ट...पण किती वर्ष जायला लागली. दरम्यान त्यावरच्या प्रथेवरचे कितीतरी साहित्य येउन गेले. दर क्षणाला थोडा थोडा करीत परिणाम तर झालाच. असेच सतीचे, नरभक्षक असण्याचे...

संस्कृतीची चाल दुडकी जरूर, पण कलाकृती थोडा थोडा परिणाम करतातच. पण कळते खूप वर्षांनी !

---------------------

Monday, August 29, 2016

किती जगावे ?

किती जगावे ?

---------------------- 

आजच्याच वर्तमानपत्रात एक बातमी आहे, सगळ्यात वयस्कर जिवंत माणूस कोण, त्यासंबंधी. आत्तापर्यंत १२२ वर्षाची एक बाई हे रेकोर्ड वागवून होती. आता तिला इंडोनेशिया इथल्या एका १४४ वर्षाच्या माणसाने मागे टाकले आहे. त्याचा जन्मच मुळी १८७० चा आहे. १८७० मध्ये म्हणजे किती किती मागे गेल्यासारखे वाटते ना !

महात्मा गांधीना म्हणतात की १२५ वर्षे जगायचे होते व त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. वयाची गंमत अशी की आपण ज्या वयाचे असतो त्यापेक्षा मोठी माणसे आपल्याला(च) दिसतात. जेव्हा आपण नुकतेच रिटायर होतो व संध्याकाळी बागेत फिरायला जातो तेव्हा आजूबाजूला सगळे ६०च्या पुढचे आहेत हे आपल्याला चक्क दिसतेच. आता मी ७५चा होतोय तर मला ८०-८५चे लोक आरामात दिसतातच. तसे माझ्यापेक्षा लहान असलेले मरताहेत हेही आहेच, पण ८५ हे तसे काही फार अवघड वय आहे असे आता वाटत नाहीय. जेव्हा ८५ला पोचेन तेव्हा कदाचित ९०च्या पुढचेही दिसायला लागतील. दमा दमाने वयाने वाढावे अशीच व्यवस्था दिसतेय.

का एव्हढे जगावे असे कोणी विचारले तर रास्त तर्क देणे अवघड आहे. पण वाढत्या वयात व ढासळत्या प्रकृतीत काय एन्जॉय करावे ते “टयूजडेज विथ मॉरी ” मध्ये तो ९०चा प्रोफेसर छान सांगतो. त्याला मस्क्युलर डीस्ट्रोफि हा स्नायूंचा रोग झालेला असतो त्यामुळे तो नुसता गोळा झालेला असतो. नर्स उचलून टॉयलेटला घेवून जाते, अशी गत. त्याची मुलाखत घ्यायला आलेली मुलगी विचारते की आता तुम्हाला कसे वाटतेय ? तो म्हणतो की खरे सांगू का,टॉयलेट झाल्यावर जे गरम पाण्यानी धुतले ना, तेव्हा खूप बरे वाटले ! काय सुख !

मध्ये मध्ये जेव्हा आपल्याला कंटाळा येतो व आपण कुठे तरी दूर दृष्टी लावून हरवतो, तेव्हा लोकांना वाटते, गेला कोमात ! ( पुणेकर जोमात ! ). कोण कोमात आहेत व कोण जोमात आहेत हे तपासायची काही तांत्रिक श्रेणी आहे का म्हणून तपास घेतला तर अशी एक ग्लासगो कोमा स्केल आहे म्हणतात. ह्यात आपण जर डोळे उघडले नाही तर ते सगळ्यात वाईट व त्याला मार्क ३. आपण जर काही बोललो नाही किंवा असंबद्ध बोललो तर तेही वाईट व त्याला मार्क ३. हात पायांची काही हालचाल नाही केली तर ते वाईट व त्याला मार्क ३. असे सगळे मिळून ९ मिळाले की आपण नापास व कोमात ! १५ ला पासिंग !

तेव्हा जोमात राहयचे तर उघडा डोळे, बडबडा काही, व हलवा हात पाय !

--------------------------------   

Sunday, August 28, 2016

मी च युगे युगे....

---------------------------------------
मी च युगे युगे...संभवा !
-----------------------------
युगे न्‌ युगे सगळी माणसे कशी सारखी असतात ! सगळी माणसे लग्ने करतात, संसार करतात, घरे बांधतात, घरे सोडून जातात, घडया बसवतात, घडया विस्कटतात, मळलेली वाट तुडवतात, नवी वाट करतात ! सगळे कसे एकासारखेच दुसरे ! जणु मीच आहे त्यांच्यात !

फरक एवढाच की तीनशे खोल्यातून जिथे प्रतिभाताईंचा "मी" मराठीत बोले, तिथे आता प्रणवदांचा "मी" बंगालीत बोलतोय ! राहूलचा "मी" जिथे मुस्लिमांची सलगी करू पाहतोय, तिथे मोदींचा "मी" मशीदी दुरुस्त करून देऊ का म्हणू पाहात आहे.
मी-मराठी लोकांची मुले लग्ने झाली की वेगळी राहायला लागत तशीच, आजकाल मी-गुज्जूंची मुलेही वेगळी पडताहेत.
अमेरिकेतली "मी"मंडळीही इथल्याचसारखी बाळंतपणाला सुनेच्या आईवडिलांना बोलवीत आहेत, व नंतर मुलाचे आईवडील जाऊन वाढलेल्या नातवाचे कौतुक करीत आहेत. ह्या सारखेपणाचा कंटाळा येऊन इथला कोणी "मी"आयुष्य उधळून देतोय, तसेच तिथला कोणी "मी" हातात बंदूक घेऊन प्रहार करीत आहे. सारखा असलेलाही मी आणि बंडखोरी करणाराही मीच्‌ !
युगे न्‌ युगे हा मीच सगळीकडे संभवतो आहे. संभवामि युगे युगे !
-----------------------------------------------------

जाणिवेचे तग धरणे

जाणिवेचे तग धरणे

--------------------- 

मानव प्रजातीला एक प्रकारची जाणीव ( कॉन्शसनेस ) असते. ही इंद्रियांकडून कळण्यापल्याडची जाणीव असते. आजकाल तर ही जाणीव झाडांना, कीटकांना वगैरे सूक्ष्म जीवांनाही असते असे मान्यता पावले आहे.  

ह्याच जाणीवेच्या असण्याने आपल्याला आसमंताची ओळख होते व त्यात अनुभवाने वावरायला सोपे जाते. ह्यातच शिकण्याचा, कळवण्याचा, एक भाग म्हणून भाषा आपण वापरतो खरे, पण भाषेतले शब्दांचे अर्थ हे नेमके नसून मोघम ( धूसर ) असतात व अॅबस्ट्रॅक्टच असावेत असे आता भाषाशास्त्र सांगायला लागले आहे. ( जसे : “चांगला” म्हणजे नेमके किती चांगला हे धूसर असल्याने आपली किती सोय होते ना ? ).

कदाचित् माणसाला तग धरण्यासाठी ( सर्व्हाईव्हल ) ही “जाणीव असणे”, मदत करीत असेल. जसे जेव्हा आपण झाडांवर राहात होतो तेव्हा “फांदी सळसळली”, ही जाणीव झाली, पण त्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केले, ते जगले नाहीत व ज्यांना त्या सळसळण्याने “शत्रू जवळ आलाय” हे “जाणवले” ते तगले.

जाणीवेच्या सबंध क्षेत्रात कार्यकारण भाव कदाचित शक्यतेतला नसेल. पण कार्यकारण समजायला जाणीव असणे मात्र आवश्यकच असते.

त्यामुळे मुळात आपण अर्थच का शोधतो, ह्याचे संभाव्य कारण उत्क्रांती व तग धरून राहायची वृत्ती हेच असावे !

-----------------    

Friday, August 26, 2016

बीभत्स गाळावा : २

बीभत्स गाळावा : २

-----------------------------

कला आणि नीती ह्यांचा काही संबंध असावा असे वाटणाऱ्यांचा एक पक्ष असू शकतो तर काहींना कला ही फक्त कलामूल्यांवरच जोखली जावी असे वाटू शकते.

एक ताजे उदाहरण पाहू. ओरिसा राज्यात एका गरीब माणसाची बायको मेली. क्रिया कर्म करण्यासाठी त्याला हॉस्पिटल पासून ६० मैल दूर जावे लागणार होते. त्याच्याकडे शव अॅम्बुलन्सने न्यायचे पैसे नव्हते. त्याने ते शव चक्क खांद्यावरून नेले. १० मैल. काही वार्ताहरांच्या प्रयत्नांनी नंतर त्याला सोय मिळाली.

आता ही झाली बातमी. जर्नालिझम ने आपल्याला सविस्तर माहिती दिली.

एका चित्रकाराने ह्यावर एक रेखाटन केले. आता त्याच्या रेखांमध्ये अॅनॉटोमी शास्त्राबरहुकूम शवाच्या रेखाटनात कलामूल्य आहे का, rigor mortis सेट झाल्याने शवाचे मोटे सारखे दिसणे आहे का ह्या कलानिकषावर ही कलाकृती निकृष्ट का श्रेष्ठ ठरवणे हा झाला एक प्रकार व दुसरा हे रेखाटन पाहिल्यावर अनुकंपा पाहणाऱ्याच्या मनात जागते का हा. अनुकंपाच चित्रकाराला वाटायला पाहिजे वा त्याने तसे न वाटताही अनुकम्पाच दाखवायला पाहिजे असा काही नियम नाही. एखाद्याला शवाचे उघडे नागडे स्वरूप दाखवावे वाटले तरी त्याला मुभाच आहे. पण नीती शास्त्राने चित्रातून अनुकंपा दिसली तर कलेचा आणि नीतीचा दाट व योग्य संबंध आला असे आपल्याला वाटणे गैर ठरू नये. ह्या उलट शवाचे चित्र पाहून उद्वेग आला, किळस आली, तर तो बीभत्सपणा काय कामाचा व त्यात कसली कला ?

ज्ञात अज्ञात चित्रकर्त्यांची क्षमा मागून ( परवानगी न घेतल्याने ) खालील चित्रे पहा व ठरवा की बीभत्स गाळावा ?

--------------------