Friday, April 29, 2016

एकनिष्ठतेचे सगेसोयरे

एकनिष्ठतेचे सगेसोयरे !
१)    त्या काळी फॅमीली कोर्ट नुकतेच आले होते व आम्हाला एम बी ए ला एका न्याय-विषयात त्याचा अभ्यास होता . सौ पाटील ह्या खरे तर गणिताच्या प्राध्यापिका पण त्या डीन असल्याने त्यांना वाटले की आम्ही प्रत्यक्ष कुटुंब न्यायालयात जाऊन एक केस स्टडी करावी . नेमकी एक विचित्र केस माझ्या वाट्याला आली होती. एक मराठी नवरा बायको होते. साधारण साठीच्या आसपासचे. मुले मोठी झाली होती, त्यांची लग्नेही झालेली होती व आता त्यांना घटस्फोट हवा होता.  कारण काय तर म्हणाले की त्यांना जेव्हा कळाले की त्यांचे पटत नाही तोवर दोन मुले झाली होती. त्यांनी ठरवले की आपण आत्ता जर वेगळे झालो तर मुलांचे नुकसान होईल. तर त्यांनी तडजोड म्हणून असे नक्की केले होते की मुले मोठी झाली की घटस्फोट घ्यायचा व त्याप्रमाणे आता त्यांना वेगळे व्हायचे आहे. आता ही केस वर्गात चर्चा करताना बहुमताने त्यांना घटस्फोट देऊ नये असा निर्णय झाला, कारण Incompatability ( अनुरूप स्वभाव नसणे ) इथे न दिसता उलट एक कमीटमेंटच दिसत होती. ( सहा महिन्यांनी आम्ही नक्की काय झाले त्याचा तपास केला असता त्यांना घटस्फोट मिळाला नाही असे कळले ).
तर बऱ्याच वेळा इतर कौटुंबिक नडीपायी एकनिष्ठता अशी वरपांगी वसून असते.
२)    लोकलज्जा व एकनिष्ठता
आज ४० वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक मद्रासी कुटुंब होते. त्या काळी मुंबईत मद्रासी खूप होते व ते जसे चौकोनी असतात तसेच हे कुटुंब होते. नवरा नुकताच निवृत्त झाला होता पण बाई अजून नोकरीत होत्या. त्यांच्याकडे एक फाकडू बाई घरकामाला होती. ( अशांनाच अशा बायका बऱ्या मिळतात ! ). तिच्या दिसण्यावरून व एकंदर असूयेपायी आजूबाजूच्या बायका तिच्याविषयी अनेक कथा रचून सांगत असत. अशावेळी जशा सगळ्या पुरुषांच्या मनात येते तसेच त्या नवर्याच्या मनात आले व त्याने जरा धीर करून....आणि मग खूपच बोभाटा झाला. त्या बाईने आरडओरड केली, लोक गोळा झाले वगैरे. त्याकाळी ह्या गोष्टींचे इतके कायदे नसल्याने पोलीस वगैरे भानगडी झाल्या नाही, पण गडी अगदी डिप्रेस्ड झाला व आधीच निवृत्तीने गळ्हाटला होता त्यात ही बदनामी. नंतर दोन चार वर्षातच बिचारा वारला. त्याचे हे असे झालेले पाहून शेजारच्या तमाम पुरुषांना ही फारच जोखीम आहे ह्याचे भान झाले व ते एकनिष्ठच राहिले.
तर कित्येक वेळा लोकलज्जेपायी एकनिष्ठता वाढीस लागते !
३)    एकनिष्ठतेचे सगेसोयरे ---वार्धक्य
आर्तः देवान् नमस्यन्ति, तप: कुर्वन्ति रोगीण |
निर्धना: दानं इच्छन्ति, वृद्धा: नारी पतिव्रता ||
( दुःखात किंवा संकटात पडलेली माणसे देवांना नमस्कार करतात, रोगी लोक पथ्यपाणी तप करतात, दरिद्री माणसे दान करू इच्छितात आणि वृद्ध स्त्री ही पतिव्रता असते. वृद्ध स्त्री कोणाला आकर्षक वाटत नसल्याने ती पतिव्रता असते.
आमच्या ओळखीच्या एक बाई आहेत. ६५ च्या. पण तरुणपणी सुंदरच असाव्यात कारण अजूनही चांगल्याच दिसतात. नवर्याने छळले, धंदा बुडीत गेल्याने त्रासला होता व तशात त्याने एकदा जे घराबाहेर काढले ते त्यानंतर त्या परत गेल्याच नाहीत. नंतर नवराही वारला. नंतर दिरांनी मदत केली, नोकरी केली, मुले आज डॉक्टर झाली आहेत व ह्या बाई आता एकट्याच राहतात. मनमानी करतात. मनात आले तर दादरला गोमंतक मध्ये जेवायला जातात, नाटक सिनेमे पाहतात, पर्यटन करतात वगैरे. खरे तर ह्यांचा  स्वभाव पाहता  त्यांनी उच्छ्रंखल असायला हवे. पण आता ह्या वयात परत संसाराची कीटकीट त्यांना नको वाटते. त्यामुळे त्या नसलेल्या नवर्याला एकनिष्ठ राहतात.
खरे तर वरच्या संस्कृत श्लोकात जे वृद्ध स्त्री बद्दल म्हटले आहे ते अनुदार आहे पण प्रत्यक्षात वृद्ध स्त्रिया पतिव्रता होतात !
-----------------                        


Sunday, April 10, 2016

पनामा कावा

पनामा कावा का कालवाकालव
जे कोपऱ्यावरून जाते तेच परत येत असते अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. त्यावरून हे “पनामा पेपर्स” असे मधेच कसे उपटले ह्याचे एक गूढच वाटत होते. आणि ह्यात सगळेच कसे ओवळे निघत आहेत त्याचेही आश्चर्यच वाटत होते. शेवटी निकराने शोधाशोध केली आणि सापडले गौड-बंगाल.
मागे विकीलीक्स प्रकरण झाले तेव्हा त्याच्या बातम्या केवळ “हिंदू”त येत, तेव्हा कळले की त्यांनी प्रचंड पैसे खर्चून त्या विकत घेतल्या होत्या. तर मग आज हे “पनामा पेपर्स”चे कारनामे केवळ इंडियन एक्स्प्रेस मध्येच कसे येतात ? तर असे आढळले की एक ICIJ नावाची शोध पत्रकारांची एक अमेरिकेत संस्था आहे त्याच्याशी एक्स्प्रेस संबंधित आहेत. काय करते ही संस्था ?
सगळ्या प्रगत जगात अॅसबेस्टॉस वर बंदी आहे कारण त्याने फुफ्फुसांचा कर्क रोग होतो. अमेरिकेत ह्याची एव्हढी प्रकरणे झाली की ह्यासंबंधीत उद्योग तर बंद झालेच शिवाय जी नुकसान भरपाई त्यांना द्यावी लागली त्याने विमा कंपन्याही बुडीत आल्या. पण रशिया, ब्राझील, कॅनडा इथे हे उद्योग आजही खूप जोरात आहेत व त्याला तिथले सरकार संरक्षण देते. चीन व भारत हे ह्या अॅसबेस्टॉसचे जगातले मोट्ठे ग्राहक आहे. अॅसबेस्टॉसच्या खाणी रशियात प्रचंड प्रमाणात आहेत व पुतीन त्यांना संरक्षण देण्यात आग्रही आहेत.
सीएनएन वरची अमान्पोर हीही ह्या संस्थेशी निगडीत होती. फोर्ड फौंडेशन, रॉकफेल्रर व जॉर्ज सोरोस हेही ह्या संस्थेत कार्यरत आहेत व त्यांना सध्या रशिया सिरीयात जी चढाई करीत आहे त्याला लगाम घालायचा आहे व त्याला काही मुस्लीम राज्ये मदत करीत आहेत त्यांनाही वठणीवर आणायचे आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या विरुद्ध खुन्नसने अॅसबेस्टॉस विरोधी संशोधन करताना जी  माहिती हाती लागले होती त्याचा आता बोभाटा केला तर ह्या धोरणाने हे सगळे प्रकरण बाहेर येत आहे. गरीब देशांना अॅसबेस्टॉसचे पत्रे छत म्हणून हवे आहेत तर ते ह्या कर्क रोगापायी वापरू नयेत असा चांगला हेतूही त्यामागे आहे.
आणि ह्याच मुळे ह्या पनामा पेपर्स मध्ये अमेरिकन नावे नाहीत. कर भरला तर ज्यांची नावे आलीत त्यांना काही डर नाही. पण मुख्य भर रशियाच्या पुतीन ह्यांना अडचणीत आणणे मात्र ह्याने चांगले साधते आहे !

--------------------------------------------- 

Wednesday, March 23, 2016

चला “वेगळे” होऊ या !
सगळ्यांच्या रंगात एकरंग होऊन झाले की मग आपला रंग “वेगळा” असावा असे वाटायला लागते. हे म्हणजे एक प्रकारे लपाछपी खेळल्यासारखे आहे. लपायचे असले की आजूबाजूच्या रंगात मिसळून जायचे व कंटाळा आला, जेलस्  झाले  की “वेगळे” व्हायचे.
“वेगळा” हा शब्दच वेगळा आहे. ह्यात गळ्यात गळे घालून एकत्र नांदणे दर्शविणारे “गळा” आहे, तर झटक्यासरशी वेगळे कसे व्हावे हे सांगणारा “वेग” आहे. शिवाय “वे” ह्या संस्कृत अक्षराने वेणीची वीण वा वेणीचे पेड हे कसे एकमेकात गुंतलेले असतात ( वेगळे नसतात ) तसे हे गळ्याशी कसे गुंतलेले आहे ते दाखवणारे एकजीवपण आहे. आणि तरी हे “वेगळे”पण आहे !
मराठवाडा पहिल्यांदा निझामाच्या हैद्राबाद राज्यात होता. तिथे तेलुगु, कानडी व उर्दू ह्यांची चलती. मराठी लोकही नेहमी उर्दू बोलत. मराठीला लपून राहावे लागे. मग महाराष्ट्रातल्या मराठीची जेलसी वाटायला लागली, हे लोक कसे मराठी नाटके बघतात, मराठी कार्यक्रम करतात वगैरेचे आकर्षण वाटू लागले, हैद्राबाद पासून वेगळे व्हावे असे वाटू लागले.
झालो वेगळे, तर काय गंमत इथली वऱ्हाडी मराठी वेगळी, पुण्या-मुंबईची मराठी वेगळी असे बारकावे आता ठळक जाणवू लागले, त्यांची प्रगती डोळ्यात खुपू लागली, जेलसी वाटू लागली. त्यांच्याबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलो खरे, पण हाती काही लागले नाही, असे दिसो आले. आता वाटायलय, नग, वायलच बर !
बा म्हणायचा ब्रिटीषच बरा होता. तर मग आता त्यानं स्वातंत्र्य सैनिक बनून आणलेलं स्वातंत्र्य परत कराव का ? आणावं का पारतंत्र्य ? पारतंत्र्यात निदान मला पारतंत्र्य-सैनिकाची पेन्शन तरी गावल !
तसच, परत जावं का निझामाच्या राज्यात ? नकोच हे इथलं विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व त्यांची प्रगती. आंध्र व तेलंगण काय टपलेले आहेतच. सहज घेतील एव्हढे पाच जिल्हे ! उर्दू तर आपल्याला येतेच !
चला “वेगळे” होऊ या !

--------------------------------------  

Saturday, March 19, 2016

जयंती, मयंती
मुळात “जय” होण्यात “ज” का असावा ? खरे तर नुसते “ज” म्हणजे “जन्मणे”. कुसुम च्या आधी जन्मलेला म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ तो “कुसुमाग्रज” मध्ये नाही का नुसते “ज” म्हणजे जन्मणे होते. एखाद्या गोष्टीचा जन्म होणे हाच “जय” आहे हा विचारच मोठा रम्य आहे.
जयंती किंवा जयंत मध्ये हे “अंत” का असेल ? अंत ह्याचा सर्वसामान्यपणे माहीत असलेला अर्थ म्हणजे शेवट.
आता अंत ही जोडणी लागलेले काही शब्द पहा : बाळंत, खंत, अनंत, सुखांत, भ्रांत, प्रांत, संत, वसंत, बुंत, जंत, दंत, पंत, वांत, शांत, हंत, कांत, धादांत, पसंत, श्रीमंत, श्रांत, अशांत, अत्यंत, सुमंत, क्रुदंत, एकदंत, दिगंत, आकांत, आसमंत, सामंत, नखशिखांत, पर्यंत, उसंत, दृष्टांत.....वगैरे.
बाळंत म्हणजे प्रसूत झालेली स्त्री किंवा बाळ झालेली स्त्री. इथे कोणाचा अंत आहे ? बाळाचा तर नक्कीच नाही. मग इथे अंतचा अर्थ कसा लावायचा ? बाळ झाल्याने जिच्या गर्भारपणाचा अंत झाला अशी ती बाळंत, असे होऊ शकते. किंवा जिची स्थीती बाळाने अंत पावली आहे ती बाळंत असे होऊ शकते. असेच ख म्हणजे आकाश व आकाशाएवढ्या व्यापाने/काळजीने ज्याचा अंत ती खंत असे होऊ शकेल ? अनंत मध्ये अन्‌ म्हणजे अन्य ने अंत होणारे ते अनंत असे धरू शकतो ? सुखाने ज्याचा अंत होतो ते नक्कीच सुखांत होते. भ्र म्हणजे भ्रमणने ज्याचा अंत होईल ती भ्रांत ? प्र म्हणजे प्रदेशाने ज्याची सीमा/शेवट तो प्रांत ? बु म्हणजे मूर्ती व तिचा अंत म्हणजे बुंत ( बुरखा ) असे होईल ? अति ने ज्याचा अंत ते अत्यंत ? नखापासून शेंडीत ज्याचा अंत ते नखशिखांत ?
ह्या धर्तीवर जयंती म्हणजे ज्याचा शेवट जयाने झाला आहे असा तो दिवस किंवा ज्याचा शेवट जन्माने झाला आहे तो दिवस.
आता मय म्हणजे कशाशी तरी एकरूप होणे. जसे शांततामय. मेल्यावर आपण ब्रह्मात विलीन होतो, ब्रह्ममय होतो असे धरले तर पुण्यतिथीला मयंती म्हणता येईल. किंवा मरंती म्हणजे पुण्यतिथी असे होऊ शकेल !

------------------------------- 
 

Friday, February 26, 2016

There are NO Free Lunches !
There is something very wrong at University Of Hyderabad. Just have a look of List of ineligible candidates ( a total of 661 students) that is put up on the website of UoH. (Link to this list is : http://www.uohyd.ac.in/images/pdf/ineligible_list_230115.pdf    ).
You will find that out of these 661 students who have partaken a Free-Lunch at the University only 141 are from General Category and rest are from SC,ST, OBC. That is huge majority of Free-Lunchers there ! One SC/ST guy owes Rs.51,360 to the mess and unless these dues are paid his registration for the Jan-June Semester is withheld.
The same University teaches in their Management Studies that there are NO FREE LUNCHES IN LIFE. But in University, not only subsidised but Free Lunches are available. JNU Boys & Girls please invite your Azadi Guest for a free lunch too !
-----------------

फुकट्यांचे फावणे !
जिथे रोहित वेमुला ह्याने आत्महत्या केली त्या हैद्राबाद विद्यापीठात काही तरी गडबड चाललेली दिसते. त्यांच्या संकेत स्थळावर एक ६६१ विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे ज्यांनी मेसचे पैसे भरलेले नाहीत व त्यामुळे त्यांचे नवीन सेमेस्टरचे रेजिस्त्रेशन मना केलेले आहे. ह्या यादीत फक्त १४१ जनरल विद्यार्थी असून बाकीचे सगळे एस सी / एस टी / ओ बि सि आहेत. एका एस सी मुलाचे तर ५१,३६० रुपये बाकी आहेत.
विद्यापीठ शिकवते की जीवनात जेवण फुकट नसते व इथे ?




Thursday, December 31, 2015




अरे तुरे
अरे हा काही शब्दकोशातला शब्द नाही . पण शब्दाच्या व्याख्ये प्रमाणे त्याचा अर्थ होतो, संबोधनार्थ व आपण आजही अहो जाहो च्या विरुद्ध जवळीक किंवा एकेरी दाखवण्यासाठी अरे हे संबोधन वापरतो. इंग्रज लोक,  विशेषतः खलाशी , Ahoy, अशी आरोळी ठोकीत व त्याचेच पुढे Hey झाले असे म्हणतात. असेच इथे तुकाराम महाराज अरे असे संबोधत आहेत.
Phonology ह्या शास्त्रात असे दिले आहे की आपल्याला काही आवाज हे सहजी अथवा मोठ्याने ऐकू येतात व असे मोठ्याने ऐकू येणाऱ्या आवाजांची ते एक श्रेणीच देतात. ह्या श्रेणी बरहुकूम आपल्याला स्वर ( अ, आ, इ, ई ....) मोठ्याने ऐकू येतात असे पाहिले आहे. त्यानंतर य र ल व हे द्रव्य व त्यानंतर अनुनासिके अशी उतरंड आहे . कदाचित ह्या व्यवस्थेमुळे आपण कोणाला हाका मारताना शेवटी स्वर येतील अशी हमखास युक्ती करतो. कारण त्या माणसाला ऐकू जाणे हा उद्देश असतो.
तर अशी युक्ती वापरून तुकाराम महाराजांनी खालील अभंगात अरे हा शब्द आवर्जून वापरला आहे व तो परिणामकारक होतो. बघा :

व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥
कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥
कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥२॥
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥३॥
धन्य त्या गौळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥१॥
अरे कृष्णा इंद्र अमर इच्छिती । कोण तयांप्रति येइल आतां ॥२॥
तुका म्हणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासों लागे ॥३॥
एक म्हणति तुमचें अरे पोट तें किती । मागों गाई म्हैसी घोडे रे धन संपत्ति हित्त ।
तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं ।
अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥
उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हि†या ऐसी केवीं गारगोटी 1॥
 मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूतिऩ ॥ध्रु.॥
 काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥2॥
 तुका ह्मणे पुढें दिसतसे घात । करितों फजित ह्मणउनी ॥3॥
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥1॥
तुह्मांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥
सेवेच्या अभिलाषे । मन बहु जालें पिसें ॥2॥
अरे भक्तपराधीना । तुका ह्मणे नारायणा ॥3॥
अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥1॥
नव्हों गांढे आळसी । जो तूं आह्मांपुढें जासी ॥1॥
 अरे दिलें आह्मां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥
 धरोनियां वाट। जालों शिरोमणि थोंट ॥2॥
 तुका ह्मणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥3॥
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी (कुढी ) बुद्धि ॥1॥
ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥
कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥2॥
तुका ह्मणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥3॥
शूद्रवंशी जन्मलों । ह्मणोनि दंभें मोकलिलों ॥1॥
अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥
घोकाया अक्षर। मज नाहीं अधिकार ॥2॥
सर्वभावें दीन । तुका ह्मणे यातिहीन ॥3॥
राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥
 न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहनिऩशी ॥ध्रु.॥
 देवाब्राह्मणासी जाइऩना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥
 सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें॥3॥
 तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥
घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥1॥
 आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥
 सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥2॥
 तुका ह्मणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥3॥
धडकला अिग्न आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥1॥
 अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥
 अरे कृष्णा तुझें नाम बिळवंत । होय कृपावंत राख आतां ॥2॥
 तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥3॥

 अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥1॥ अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥ वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥2॥ तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वणिऩती सकळ नारायणा ॥3॥
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥1॥ अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥ध्रु.॥ गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥2॥ तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥3॥

Friday, December 18, 2015

जनांचा प्रवाहो !
मराठीच्या तिसरी चौथीत असेल जेव्हा कुसुमाग्रजांची कविता होती तेव्हा मास्तर आवर्जून सांगायचे की कुसुमच्या आधी ( अग्र ), ज म्हणजे जन्मलेला, म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ, ते वि.वा. शिरवाडकर. तेव्हा केवळ ज वरून जन्मणे ओळखायचे हे जरा स्मार्टपणाचे वाटे. जरी आजकालचे भाषाशास्त्र मानत असले की शब्दांचे अर्थ हे कोणत्याही व्यवस्थेने न येता केवळ यदृछेने ( आरबीट्ररी ) येतात तरी अभिनव गुप्तांचे तंत्रशास्त्र हे आवाजांना अर्थ असतात ह्या मताचे आहे व प्रत्येक अक्षराला त्याचा अर्थ असणारे एक दैवत असते असे म्हणते. त्या तंत्रशास्त्राप्रमाणे ज ह्या अक्षराचे दैवत आहे तन्मात्र, म्हणजे पंचमहाभूतांचे सूक्ष्म रूप. ह्याचा पडताळा म्हणून ज अक्षरापासून सुरू होणारे एकून १४३६ शब्द घेतले तर त्यातले २१५ म्हणजे १५% टक्के शब्द जन्मणे ह्या अर्थाचे दिसून येतात. ( हे चांगलेच परिणामकारी मानतात.).
जन्माला येणारे ते जन. खरे तर सगळी सृष्टीच जन्मते, जन्माला घालते. हे कधीच न संपणारे आहे. आपल्याला हवेतला ऑक्सिजन कमी होतोय असे जाणवते खरे पण त्याचा अर्थ सृष्टीचा कधी ना कधी नायनाट होईल असे नाही. कारण २.४ बिलियन वर्षापूर्वी म्हणतात की वातावरणात ऑक्सिजन नव्हता, केवळ बर्फ होता. त्यातल्या पाण्याचे हैड्रोजन व ऑक्सिजन असे विघटन व्हायला लागले व काही ऑक्सिजन वातावरणात साचू लागला. पुढे सृष्टीत असे काही जीव झाले ( जसे वनस्पती ) जे सूर्यप्रकाशापासून ऑक्सिजन निर्माण करू लागले व ऑक्सिजनचा साठा वाढू लागला. आज मितीस तो जेवढा आहे त्यावर आपले प्राण तगू लागले. पण उद्या जर हा साठा जरी कमी झाला तरी सृष्टी त्यावरही तगणारे प्राणी निर्माण करील.
हां, तेव्हा आपल्याला माणूस ऐवजी त्या प्राण्यांचा जन्म घ्यावा लागेल व ह्या सगळ्या प्रकाराला कैक बिलियन वर्षे लागतील. तेव्हढे थांबावे लागेल ! जनांचा प्रवाहो चालूच राहील !

------------------------