Tuesday, January 17, 2017

स्त्रिया, आया, बाया...

स्त्रिया, आया, बाया, ह्या खरेच अनेकवचनी आहेत ?
अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात : स्त्री-स्त्रिया, बी-बिया . नदी-नद्या, काठी-काठ्या, भाकरी-भाकर्या , लेखणी-लेखण्या, ( अपवाद आहेत : दासी, दृष्टी )
जोडपे , त्रिकूट , पंचक , आठवडा , डझन , शत , सहस्त्र , लक्ष , कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच   वापरतो. आता ह्याच वळणाने “आया” पहा. त्यात हिंदू आया, मुसलमान आया , ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच “आया” मध्ये येतात. त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत. पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का ? त्या अर्थाने आया हा एक गटच होतो. अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या ! पण त्यांचे बित्व किती एकसारखे !  असेच नद्या , काठ्या लाठ्या, भाकर्या , वगैरे. वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे !  प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त, पण “फिया” म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार ! जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण “या” म्हणतो आहोत !

Monday, January 16, 2017

स्त्रिया, आया, बाया, ह्या खरेच अनेकवचनी आहेत ?
अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात : स्त्री-स्त्रिया, बी-बिया . नदी-नद्या, काठी-काठ्या, भाकरी-भाकर्या , लेखणी-लेखण्या, ( अपवाद आहेत : दासी, दृष्टी )

जोडपे , त्रिकूट , पंचक , आठवडा , डझन , शत , सहस्त्र , लक्ष , कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच   वापरतो. आता ह्याच वळणाने “आया” पहा. त्यात हिंदू आया, मुसलमान आया , ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच “आया” मध्ये येतात. त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत. पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का ? त्या अर्थाने आया हा एक गटच होतो. अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या ! पण त्यांचे बित्व किती एकसारखे !  असेच नद्या , काठ्या लाठ्या, भाकर्या , वगैरे. वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे !  प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त, पण “फिया” म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार ! जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण “या” म्हणतो आहोत !

Friday, January 13, 2017

तिळ गुळाची भाषा ! 
आज संक्रांतीचे आपण मराठी लोक आवर्जून म्हणतो की “तिळगुळ घ्या, गोड बोला ”. आणि तरीही आपण मराठी जाणल्या जातो ते आपल्या रोखठोक-पणाने, आपल्या रांगड्या भाषेने ! हे काय गूढ आहे ?
गोड बोलण्याचे आज आपण काय प्रतीक देतो आहोत ? तर तिळ व गुळ. तिळ पाहताच आपल्याला जाणवतो तो तिळाचा लहानपणा. ( एवढा एक लहान तिळ म्हणे पांडवांनी सात जणात वाटून खाल्ला होता, हे एक गूढच, हिंदी गूढ/गुळ नव्हे मराठी गूढ !.).म्हणजे हे छोटे प्रतीक जणू आपल्याला खुणावते आहे, मित-भाषी व्हा !
गुळात आयर्न, लोह, चांगल्या प्रमाणात असते म्हणे. म्हणजे गोड बोलणे हे लोखंडासारखे कडक झाले की ! कदाचित त्यामुळेच गुळासारखे गोड असूनही मराठी माणसांचे बोलणे गुळातल्या लोहासारखे कडक, रोखठोक होते ! शिवाय त्यातला गोड अर्थ गुल होण्यामागे व्युत्पत्तीशास्त्र कारणीभूत असावे. कारण गुळ हा शब्द संस्कृत गुल वरून आला आहे म्हणतात. ( अर्थात संस्कृतात गुलचा अर्थ कच्ची साखर असाच आहे ). तेव्हा आपल्या गुळ ह्या प्रतीकातला गोडपणा गुल झाला तर तो दोष मराठी माणसांचा नसून व्युत्पत्तीचा आहे !
तेव्हा तिळगुळ घ्या व तरी गोड बोला ! 
---------------------------

Friday, December 30, 2016

धाकड २०१६

धाकड २०१६

काल “दंगल” पाहिला तेव्हा त्याच्यातल्या हरियाणवी बोलीची काही वैशिष्ट्ये चांगलीच लक्षात राहिली. त्यात धाकटी मुलगी पतियाळाच्या क्रीडा संकुलासंबंधी बोलतांना म्हणते की तिथे तर सगळ्या “धाकड”च मुली येत असतील ना ? धाक देणाऱ्या धाकड. किंवा मराठीत आपण ज्यांना धडधाकट म्हणतो तशा. ह्याच अर्थाच्या वळणाने गेले वर्ष २०१६ तसे धाकडच म्हणावे लागेल !

सबंध गेले वर्षभर भरवशाच्या म्हशिंनी टोणगे दिले, तेही जगभर ! हिलरी बाई येता येता हरल्या, तेही ट्रम्पसारख्या टोणग्या कडून. ब्रिटनसारख्या भरवशाच्या देशाने युरो सोडले. काश्मिरात दंगल माजली. अतिरेक्यांनी कहर केला. भारताने सीमेपार जावून चोप दिला. आणि सरतेशेवटी जगात कुठे झाली नसेल अशी नोटबंदी झाली !

वर्ष तसे धाकातच गेले !

--------------------------

 

Monday, December 26, 2016

श्रेष्ठ मौखिक

श्रेष्ठ मौखिक

साहित्यात श्रेष्ठता जर लोकप्रियतेवरून ठरवायची तर अनेक लोकांना जे मुखोद्गत ( पाठ ) आहे त्यावरून ठरवू गेले तर आजचे बहुतेक साहित्यिक बादच होतील. चांगले चांगले मान्यवर साहित्यिक हे त्यांच्या मृत्यू पश्चात केवळ आठ दहा वर्षेच लोकांच्या लक्षात राहतात. त्यांचे साहित्य ( कथा, कविता, लेख वगैरे ) तर फारच थोडे दिवस लोकांच्या ध्यानात राहते. ते पाठ तर नसतेच.

त्याउलट “शुभम् करोति कल्याणं” हे काव्य कोणाचे आहे, ते मूळ संस्कृत आहे का मराठी, हे आपल्या काही लक्षात नसते, पण काव्य पाठ असते. तशाच काही कविता व लोकगीते. आपण आपल्या साहित्य वाचनात अनेक प्रकार वाचतो, पण नेमके हेच कसे पाठ राहते ? अनेकांच्या अनेक वर्षे लक्षात राहणे, टिकणे हा निकष लावला तर हे काव्य प्रकार श्रेष्ठ नाहीत का ?

आजही वारकरी पंढरपूरला वारीला जातात हे दृश्य त्यातल्या भक्तीभावापेक्षा त्यांच्या पाठ असलेल्या तुकारामाच्या अभंग म्हणण्याने, एका वेगळ्याच, उच्च कोटीतले वाटतात. हे अभंग मग इतके वर्षे टिकून आहेत, ते असे म्हटल्या गेल्यानेच ना ?

ज्ञानपीठ वा अकादमी पुरस्कारापेक्षा आपली कविता वर्षानुवर्षे लोकांनी म्हणत राहावी असे कोणत्या कवीला वाटणार नाही बरे ? हीच मौखिकाची श्रेष्ठता !

----------------------

Thursday, November 3, 2016

अडानी भाषा : ३

अडानी भाषा : ३  

--------------------

प्रमाण भाषा ही बहुतांशी शिकलेल्यांची भाषा असते. त्या भाषेत अनेक संस्कार होऊन बदललेले शब्द असतात. पण हे काही मूळ शब्द नसतात. मूळ समाजच जेव्हा अडानी होता तेव्हा त्यांची मूळ भाषा अडाणीच असणार. आजची प्रमाण भाषा चांगली व मुळच्या अडाण्यांची भाषा हलक्या प्रतीची असे भाषेचा अभ्यास करणारे मानीत नाहीत. उलट अडाणी शब्द हेच मूळचे शब्द असल्याने अर्थाचा शोध घेताना अपार महत्वाचे असतात. तर चला अडाणी भाषा शिकू या.

३ : गेल्तो = गेलो होतो  

आलो होतो, गेलो होतो, असे जरा अवघड वळणाचे बोलण्यापेक्षा आल्तो, गेल्तो हे कसे सुटसुटीत होते. जा किंवा जाणे हे मूळ क्रियापद व गेला हे त्याचे भूतकाळी रूप. काही जण “ तो जाएल हाये” असेही बोलतात. “मी जातो”चे “मी गेलो ” असे न करता आपण “मी गेलो होतो” असे व्याकरणात ओळखायला अवघड असे रूप का करीत असू ? कदाचित तमिळ मध्ये जसे “चेल” म्हणजे जाणे आहे त्यावरून “गेल्” असे तर हे करीत नसतील व मग गेल्तो ?

-----------------------

Tuesday, November 1, 2016

र चा रेटा

जय हो-मराठी-२०: र चा रेटा
------------------------------
"र"चा रेटा !
--------------------------------
    "र" ह्या वर्णाला मराठी वर्णमालेत अर्ध-स्वर ( सेमी व्हॉवेल ) असे मानतात. जीभ तयार न झाल्यामुळे लहान बालके बोबडे बोलतात हे आपण जाणतोच. तेव्हा सगळ्यात अवघड वर्ण "र" हाच असतो. हे ह्यामुळे होत असावे की "र" हे मूर्धन्य प्रकारात मोडते ( म्हणजे टाळूच्या वर जीभ लावून हा आवाज काढावा लागतो, ज्यासाठी जिभेचे वळणे तयार व्हावे लागते .). तसेच फोनोलॉजी शास्त्रातल्या, सोनोरिटी स्केल मध्ये जे वर्ण सगळ्यात मोठेपणे आपल्याला ऐकू येतात असे शोधून काढलेले आहे, त्यात स्वरानंतर सगळ्यात ज्यास्त मोठेपणी ऐकू येणारे वर्ण दिले आहेत : य, र, ल, व. त्यामुळे "र" ह्या वर्णाची योजना आपण सहजी स्पष्टपणे ऐकू येणार्‍या शब्दांसाठी करत असू, असे अनुमान निघते. त्यामुळे एखाद्या शब्दात "र"ची योजना असेल तर तो ठळक होतो असा परिणाम साधल्या जातो. ह्या पार्श्वभूमीवर शब्दकोशातल्या "र"पासून सुरू होणार्‍या एकूण २०६८ शब्दांची तपासणी केली तर हे सर्वच शब्द ठळकपणा आणणारे, महत्वाचा अर्थ असणारे दिसतात. ( एकूण २०६८ पैकी ५२५ शब्द महत्वाचे अर्थ असणारे, ठळकपणा आणणारे आढळतील. वानगीदाखल पहा: रक्त, रखडपटटी,रंजक, रंजलेगांजले, रटाळ, रडका, रंडी, रण, रत्न,रद्दी, रसाळ, रहाटगाडगे, राई, राकट, राग, रांजण,राजतिलक, राजबिंडा, रानदांडगा, रामराज्य, राष्ट्र,राक्षस, रुका, रुपया, रुग्ण, रुद्र, रुचिर, रुसणे, रूप,रौद्र, वगैरे.).  सामान्यापासून मोठेपण देणारा "राजा", कपाळावरच्या गंधात ठळकपणा आणणारा "राजतिलक", लहान पदार्थात स्पष्टपणे लहान असलेला पदार्थ "राई", नापसंतीच्या शब्दात प्रभावी असते:"अरेरे", छोट्यामोठ्या लढाया, युद्धे ह्यात स्पष्टपणे मोठे युद्ध म्हणजे "रण", मौल्यवान वस्तूत जादा मोल असलेले "रत्न", वगैरे. र-पासून सुरू होत असलेले बहुतेक शब्द असे हे त्यांच्या त्यांच्या प्रकारात मोठेपण, ठळकपण दाखवतात असेच दिसते. हाच "र"चा रेटा !
---------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------