Monday, August 8, 2016

कशी असावी कविता?

कशी असावी कविता ?
समीक्षकातही असा समज आहे की जी कविता सहजस्फूर्त असते ती चांगली आणि जी कविता “पाडलेली” ( म्हणजे “र”ला “ट” जोडून केलेली ) असते ती कम-अस्सल ! पूर्वी तर काही कवी कवितेखाली ती कुठे, केव्हा केलेली आहे त्याचा तपशीलही देत असत. म्हणजे समजा महाबळेश्वरला केलेली कविता असेल तर ती जास्त उंचीची ! ना. सी . फडक्यांवर त्यांच्या पत्नीच्या बहिणीने ( इंदिरा संत ) केलेली कविता असेल ( “केशराचा मळा ” अशी,) तर ती फारच तोला-मोलाची ! ह्याच न्यायाने कोणी कमोडवर बसून केलेली असेल कविता, तर ती घाणेरडीच ! पडलेली !
ह्या सगळ्या गोष्टी कविता-बाह्य असल्याने समीक्षेत त्याला काहीच महत्व नसावे. पण असे म्हणणारे म. वा. धोंड सर सुद्धा मर्ढेकरांनी कोणती कविता कोणत्या पार्श्वभूमीवर केलेली आहे त्यावर प्रचंड खल करतात. कारण जनतेसाठी एक नियम, तर थोरा-मोठ्यांसाठी दुसरा, असा पंक्ती-प्रपंच होतोच.
कवी ग्रेस ह्यांना सुद्धा ह्या पंक्ती-प्रपंचाचा फायदा झालेला होता. कारण त्यांच्या कवितेत काय आहे, त्यापेक्षा त्या त्यांना कशा रात्री अपरात्री होत असत, ह्याचाच बोलबोला समीक्षक करतात. त्यांचे अनुनायी तर करतातच. रात्री अप-रात्री होणाऱ्या कवितात वर्ल्ड-रेकोर्ड आहे कवी कॉलेरीज ह्यांच्या “कुब्ला खान ” ह्या शंभर ओळीच्या कवितेचे. ही कविता म्हणे त्यांना  शीर्षकासकट दिसलेली होती. गंगाधर पाटील म्हणून एक प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक आहेत. त्यानी तर पु. शि. रेगे हे उशाशी कसे कागद पेन घेउन झोपत व स्वप्नात कविता दिसली की लागलीच कशी उतरवून घेत त्याचे “समीक्षा” म्हणून कौतुक केलेले आहे. हे म्हणजे अंध-श्रद्धा निर्मूलनवाल्या दाभोलकरांच्या आत्म्याला प्लान्चेतने बोलावण्यासारखेच आहे. ह्या प्रकारात सर्वात उंचीचे उदाहरण आहे “कुराण” ह्या मोह्मदाला झालेल्या कवितेचे. ह्या कविता तर त्याला न समजणाऱ्या भाषेत होत होत्या. पण आज कोणाची मजाल की त्यावर कोणी बोलेल ? वेदही असेच अ-पौरुषेय ! 
कवितेत काय आहे त्यापेक्षा ती कुठे, केव्हा, कोणी, कशी  केलेली आहे हे गौणत्वाचेच ठरायला हवे !
-----------------------------------------------------

No comments:

Post a Comment